लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा दिसून येत असला तरी शहरातील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या काही जागांवरील मराठी पट्ट्यात शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही शिवसेनेत जोरदार लढाई झाल्याचे स्पष्ट होत आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी, वरळी या मराठी बहुल मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मताधिक्य मिळविले असले तरी या दोन्ही मतदारसंघात शिंदे सेनेच्या उमेदवाराला मिळालेली लक्षणिय मते भविष्यात उद्धव सेनेसाठीही चिंतेचा विषय ठरली आहेत. याशिवाय दक्षिण मध्य मतदारसंघात बहुचर्चित माहिम, वडाळा या मराठी बहुल पट्ट्यात राहुल शेवाळे यांनी मिळविलेले मताधिक्य चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात थेट लढत झाल्याचे पाहायला मिळाले. यापैकी सात मतदार संघात शिंदे सेनेने तर सहा मतदारसंघात उद्धव सेनेने विजय मिळविला. असे असले तरी मुंबई, ठाण्याचा गड कोणाच्या बाजूने राहील याविषयी राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता होती. निकालानंतर ठाण्याने शिंदे यांना तर मुंबईने ठाकरे यांच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात तीन जागांवर लढले. यापैकी दोन जागांवर उद्धव सेनेचा तर एका जागेवर शिंदे सेनेचा अगदी तुरळक मतांनी विजय झाला. मुंबई ठाकरेंचीच असल्याचा निष्कर्ष या निमित्ताने काढला गेला असला तरी मराठी बहुल पट्ट्यांमध्ये दोन्ही सेनेमध्ये निकराची लढाई झाल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा – उरणमध्ये १५ गावांना पुराचा धोका, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा जाहीर

दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने विजय मिळविला. यापूर्वी एकसंघ शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या माहिम विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे राहुल शेवाळे यांनी १३ हजार ९५० मतांची आघाडी घेतल्याने उद्धव सेनेसाठी दादर माहिमच्या घरच्या मैदानातच धोक्याची घंटा वाजू लागली आहे. सध्या या ठिकाणी सदा सरवणकर हे शिंदे सेनेचे आमदार आहेत. महिम पाठोपाठ वडाळा मतदारसंघात राहुल शेवाळे यांना ५९ हजार ७४० तर अनिल देसाई यांना ४९ हजार ११४ अशी मते मिळाली. भाजपचे कालिदास कोळंबकर हे या मतदारसंघाचे आमदार असून येथील मराठी पट्ट्यांमध्ये दोन्ही शिवसेनेत घासून लढाई झाल्याचे चित्र आहे. दक्षिण मुंबईतही शिवडी आणि वरळी या मराठी बहुल मतदारसंघात दोन्ही सेनेत अटीतटीची लढाई झाल्याचे दिसते. उद्धव सेनेचे आमदार असलेले अजय चौधरी यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या शिवडी विधानसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांना सुमारे १७ हजार मतांची आघाडी मिळाली असली तरी येथेही यामिनी जाधव यांनी ५९ हजार १५० मते घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात सावंत यांना ६४ हजार ८४४ तर जाधव यांना ५८ हजार १२९ अशी मते मिळाली. आदित्य यांच्या मतदारसंघातच जेमतेम सहा हजार मतांचे मताधिक्य सावंत यांना मिळाले आहे.

हेही वाचा – उरणमधून महाविकास आघाडीला मताधिक्य, निकालातून विधानसभेची नांदी

मुस्लिम वस्त्यांनी उद्धव सेनेला तारले

दक्षिण मुंबईत भायखळा आणि मुंबादेवी या मुस्लिम बहुल मतदारसंघात सावंत यांना अनुक्रमे ४६ हजार ०६६ आणि ४० हजार ७७६ इतके मताधिक्य मिळाले. यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघात आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एमआयएम या ठिकाणी मतविभाजनाचा फायदा जाधव यांना मिळाला होता. परंतु यावेळी एकास एक लढत झाल्याने त्याचा फटका आपल्या घरच्या मैदानातच जाधव ४६ हजार ०६६ इतक्या मतांनी पिछाडीवर पडल्या. दक्षिण मध्य मुंबईत अनुशक्तीनगर आणि धारावी या बहुजनांची वस्ती असलेल्या मतदारसंघात अनिल देसाई यांना ६० हजारांचे मताधिक्य मिळाले. देसाई यांच्या विजयात हेच मताधिक्य निर्णायक ठरले.