छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाईल असे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून जरांगे यांनी लिहून घ्यावे आणि त्यांना मदत करावी असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तर भाजपला मतदान करणाऱ्या अ श्रेणीवरच्या मतदान केंद्रावर १० टक्के मतदान वाढवून आणि अन्य ‘ब’ व ‘क’ मतदान केंद्रावर भाजपचे मतदान वाढवले तर कितीही आंदोलने हाेऊ द्या, भाजपच निवडून येईल असे वक्तव्य अमित शहा यांनी केल्यामुळे ‘ओबीसीतून मराठा आरक्षण’आंदोलनाकडे भाजप आता आव्हान म्हणून पाहत असल्याचे संकेत बुधवारी देण्यात आले. महाराष्ट्रावरची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्यातील ३० जागांवर विजय मिळवू शकतो असा विश्वास निर्माण करण्यासाठी अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे भाषण केले. मात्र, भाजपच्या दोन्ही नेत्यांच्या भाषणात जरांगे यांच्या आंदोलनाचे उल्लेख आवर्जून होते. जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला छुपा पाठिंबा दिला होता. आरक्षणाच्या या प्रश्नासह सोयाबीन व कापसाच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता ही नाराजी दूर होत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. भावांतर योजनेची ४००० कोटींची रक्कम आता खात्यात जमा होणे सुरू झाले आहे. यामध्ये आखणी १६०० कोटीचा हप्ता खात्यात जमा होईल. नव्याने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यामुळे सोयाबीनचे भाव आता ४७०० रुपयांपर्यंत गेले आहेत. ते पुढे पाच हजार रुपयांपर्यंत जातील. हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याने ती नाराजी कमी झाली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण असे असले तरी भाजपचा कार्यकर्ता अपराधबोध भावनेत वावरत आहे. सत्तेमध्ये असताना ५० टक्के निर्णय होतात पण उरलेले ५० टक्के निर्णय आम्हीच करू शकतो, ही भावना जनतेमध्ये निर्माण करण्यात भाजपचे कार्यकर्ते कमी पडत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

हे ही वाचा…पुण्यात ठाकरे गटामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

मराठवाड्यातील लोकसभेतील पराभवाच्या विश्लेषणात जरांगे यांच्या प्रभावातील मते याचा उल्लेख मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भाषणात वारंवार होत होता. मराठा आंदोलन असले तरी निवडून येता येते, असेच जणू अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सूचविले. ते म्हणाले, २०१७ मध्ये पटेल आंदोलन टीपेला होते. तेव्हाही गावोगावी आम्हाला कोणी येऊ देत नव्हते. पण तरीही आम्ही ती निवडणूक जिंकली. त्याचे कारण ज्या पक्षाकडे कमी मतदान आहे त्या पक्षाने आपले १०० टक्के मतदान करवून घ्यायचे असते. तसे झाले तर अधिक मतदान बाजूने असणारा पक्षही हरतो. मात्र, हे करवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.

हे ही वाचा…‘संपुआ’ सरकारच्या स्थिरतेत येचुरींचे योगदान महत्त्वाचे; शरद पवार यांच्याकडून आठवणींना उजाळा

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून त्यांची सत्ता आली तर ओबीसीतून आरक्षण देऊ असे लिहून घ्यावे आणि मग जरांगे यांनी त्यांना खुशाला पाठिंबा द्यावा, असे आव्हान फडणवीस यांनी दिला. त्यावर जरांगे हे कोणती भूमिका घेतात, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहेत.

हे ही वाचा…विधानसभेचे पूर्वरंग: आरक्षणावरून असंतोष की ‘लाडकी बहीण’?

आरक्षण प्रश्नी सर्व पक्षीय बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवार यांचीही स्वाक्षरी असल्याचा कागद सरकारकडे असल्याचा दावा फडणवीस यांनी कार्यकर्त्यांसमोर केला. ते खोटे कथन करतात. त्यांनी केलेल्या खोट्या नेरेटिव्हला भाजपचे कार्यकर्ते उत्तर देत नाहीत. १९८२ साली मराठा आरक्षण प्रश्न बलिदान देणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांची मागणी कॉग्रेस आणि शरद पवार यांनी कधी पूर्ण केली नाही. पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. पण ही मागणी भाजपने पूर्ण केली. आरक्षण टिकवले. त्यातून अनेकांना आता नोकऱ्या लागू लागल्या आहेत. तरी देखील घेतलेले निर्णय भाजपचे कार्यकर्ते सांगत नाहीत. आजही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ असे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याकडून लिहून घ्यावे आणि जरांगे यांनी मग त्यांना मदत करावी, असे फडणवीस म्हणाले. वेगवेगळे पक्ष घेत असलेल्या भूमिका पुन्हा ‘ एक्सपोज ’ केल्या जात आहेत. पुढेही हे काम होईल. पण शरद पवार हे नेहमी दुटप्पी भूमिका घेतात. ती बाब सर्व सामांन्यासमोर आणायला हवी असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केली.