राज्यात एका टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखण्याचे महायुतीपुढे कडवे आव्हान असताना कोणत्याही परिस्थितीत सत्ता परिवर्तन घडवायचेच हा निर्धार करून महाविकास आघाडी रिंगणात उतरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. ही निवडणूक सत्ताधारी महायुती तसचे विरोधी महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे, हरियाणाच्या निकालाने महायुतीत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. कारण लोकसभा निवडणुकीत हरियाणात भाजपला मोठा फटका बसला होता. पण विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. यामुळेच लोकसभेच्या निकालाचा परिणाम जाणवणार नाही, असा ठाम दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

हेही वाचा – बंजारा समाजाच्या मतपेढीवर डोळा ठेवूनच भाजपची महंत बाबुसिंग महाराज राठोड यांना आमदारकी !

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदा राजकीय पक्षांची संख्या वाढली आहे. १९९० च्या निवडणुकीपासून राज्यात बहुपक्षीय पद्धत सुरू झाली. १९९९ पासून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना असे चार प्रमुख पक्ष होते. यंदा शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन पक्षांची भर पडली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, शेकाप, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, रिपाई, बसपा असे विविध छोटे पक्षही रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३०, महायुतीचे १७ तर एक अपक्ष निवडून आले होते. विधानसभा मतदारंसघनिहाय आढावा घेतल्यास महाविकास आघाडीला १६०च्या आसपास मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. तर महायुती १२५ मतदारसंघांमध्ये आघाडीवर होती. यामुळेच महाविकास आघाडीला यशाची खात्री वाटते.

महायुती किंवा महाविकास आघाडीत अजूनही जागावाटपाची रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक पक्षाला अधिकच्या जागा हव्या आहेत. दोन्ही आघाड्यांच्या पातळीवर बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाचा घोळ घातला जाण्याची चिन्हे आहेत. लोकसभेत सर्वाधिक १३ जागा जिंकल्याने काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा हव्या आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्याची शिवसेनेची मागणी आहे. महायुतीत भाजप १५० पेक्षा अधिक जागा लढविण्यावर ठाम आहे. शिवसेनेला (शिंदे) ९० ते १०० जागा हव्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ६० जागांची मागणी केली आहे. या सर्व दाव्यांमुळे महायुती व महाविकास आघाडीत सहमती होणे कठीण जात आहे.

हेही वाचा – मीरा भाईंदर या भाजपच्या बालेकिल्यावर शिवसेनेचा दावा

१९९० पासून राज्यात कोणत्याही एका पक्षाला १४४ चा जादुई आकडा गाठणे शक्य झालेले नाही. यंदाही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होणारी लढत लक्षात घेता कोणत्याही एका पक्षाला सत्ता मिळणे कठीण आहे. सत्तेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत तुल्यबळ लढती होण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge ahead of mahayuti to retain power in maharashtra assembly elections mahavikas aghadi is determined to bring power change print politics news ssb