लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : जिल्ह्याच्या राजकारणावर भाजप आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतानाच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची मर्जी सांभाळण्याचे आव्हान नवीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर आहे. राज्याचे महसूलमंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर व अमरावती या मोठ्या जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. पण, जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळू शकले नाही. भाजपचे सहयोगी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा हे मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून होते, पण त्यांना थांबण्यास सांगण्यात आले. त्यांनी त्याविषयी आपली नाराजी अनेकवळा उघड केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण पोटे आणि राणा यांच्यातील संघर्ष अनेकवेळा दिसून आला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदार सुलभा खोडके आणि राणा यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. अशा परिस्थितीत भाजपमधील अंतर्गत गटबाजी रोखण्यासोबतच महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम चंद्रशेखर बावनकुळे यांना करावे लागणार आहे.

आणखी वाचा-नव्या पालकमंत्र्यास समतुल्य सहकारी सांभाळण्याचेच आव्हान

पालकमंत्रिपद हे एखाद्या जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने या पदावरील व्यक्तीकडे येणारे अधिकार जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरतात. याआधी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले आहे. नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो किंवा लोकोपयोगी कोणतेही काम असो, किंवा अगदी शासकीय समारंभ असोत, पालकमंत्री या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो. लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा धागा म्हणूनही पालकमंत्रिपदाकडे पाहिले जाते.

जिल्हा विकास निधी यावर पालकमंत्र्यांचे नियंत्रण असल्याने अनेकवेळा जिल्हा नियोजन समित्यांच्या बैठकांमध्ये निधी वाटपाचा मुद्दा गाजतो. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर हेही एक आव्हान असणार आहे. मंत्रिपद न मिळाल्याने रवी राणा हे नाराज असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत, अशी इच्छा रवी राणा यांनी काही दिवसांपुर्वी व्यक्त केली होती.

आणखी वाचा-धनंजय मुंडे यांना धक्का, पंकजा मुंडेंसमोर जालन्यात आव्हान

अमरावती जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पाचा प्रश्न, औद्योगिक मागासलेपण, पायाभूत सुविधा याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांना अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यावर बावनकुळे यांनी अमरावती जिल्ह्यात रोजगार आणि उद्योग तसेच पायाभूत सुविधा निर्माण करू, असे म्हटले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आपण जनता दरबार भरूवू. सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना कोणती समस्या भेडसावत आहे याचा अभ्यास करून उद्योगाला चालना देऊ असे त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या कृषी कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करून शेतकरी व तरुणांना ताकद देऊ, तसेच महसूल व्यवस्था मजबूत करण्यासाठी तालुका भेटी देणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge for new guardian minister chandrashekhar bawankule is to maintain goodwill of leaders of constituent parties in mahayuti print politics news mrj