यवतमाळ – दिग्रस मतदारसंघात शिवसेना उबाठाने शनिवारी जाहीर केलेली उमेदवारी १२ तासात मागे घेवून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला. आता येथून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असले तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हानांचे डोंगर आहे.

२००४ नंतर माणिकराव ठाकरे प्रथमच विधानसभा निवडणुकीस सामोरे जात आहे. त्यांच्याविरोधात दिग्रस विधानसभा मतदारसंघावर पकड असलेले शिवसेनेचे संजय राठोड यांचे आव्हान आहे. दारव्हा विधानसभा मतदारसंघातून संजय राठोड यांनी माणिकराव ठाकरे यांचा पराभव करीत २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा गाठली होती. पूर्वीचा दारव्हा विधानसभा मतदारसंघ आता दिग्रस विधानसभेत समाविष्ट आहे. या २० वर्षांत या मतदारसंघात बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. बंजाराबहुल असलेल्या या मतदारसंघात संजय राठोड यांचे प्रस्थ निर्माण झाले आहे. मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचयात समिती, नगर परिषद, ग्रामपंचायतींमध्ये संजय राठोड यांचे एकहाती वर्चस्व आहे. गेल्या २० वर्षांत माणिकराव ठाकरे राज्याच्या राजकारणात रमले. विधानपरिषदेवर गेले. सात वर्षे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. विविध राज्यात निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले. तेलंगणात निवडणूक प्रभारी असताना या राज्यात काँग्रेसच्या विजयात त्यांनी मोलाची भूमिका वठवली. राज्य व केंद्रात राजकारण करताना माणिकराव ठाकरे यांनी दिग्रस, दारव्हा, नेर मतदारसंघाकडे फार लक्ष दिले नाही, अशी ओरड आहे. येथे त्यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल ठाकरे हे सक्रिय होते. यावेळी दिग्रस मतदारसंघातून पूत्र राहूल यांना उमेदवारी मिळावी म्हणून माणिकराव ठाकरे आग्रही होते.

हेही वाचा >>>मेळघाटातून काँग्रेसचा नवा डाव; जनाधार पुन्हा मिळवण्याचे आव्हान

लोकसभेत येथे महाविकास आघाडील मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसचा विश्वास वाढला आहे. मात्र येथील महाविकास आघाडीचे खासदार संजय देशमुख यांनी दिग्रस विधानसभेत शिवसेना उबाठाचे पवन जयस्वाल यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणली. त्यामुळे शनिवारी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. खासदार संजय देशमुख यांनी विश्वासघात केल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांत निर्माण झाली. माणिकराव ठाकरे यांनी दिग्रसची उमेदवारी हा प्रतिष्ठेचा विषय केल्याने अखेर शिवसेना उबाठाला आपला उमेदवार मागे घेण्याची वेळ आली. काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांनीच लढावे अशा सूचना देत त्यांचे नाव जाहीर केल्याने दिग्रस मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

संजय राठोड यांचे मतदारसंघात प्राबल्य असले तरी माणिकराव ठाकरे हे विरोधात असल्याने संजय राठोड यांच्यासाठीही निवडणूक सोपी राहिलेली नाही. जातीय समिकरणांत बंजारा समाजाची ८३ हजारांवर मते मतदारसंघात आहेत. तर कुणबी, मराठा समाजाची ४०-४५  हजारांवर मते आहेत. मात्र गेल्याच आठवड्यात सकल कुणबी समाजाने संजय राठोड यांना समर्थन जाहीर केल्याने, आता हा समाज काय निर्णय घेतो, हेही महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>“पार्सल उमेदवार नको,” भाजपच्या दोन माजी आमदारांचा देवराव भोंगळे यांना विरोध

गेल्या काही वर्षांत दारव्हा, दिग्रस, नेरमध्ये काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याने अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत गेले होते. लोकसभेच्या काळात अनेकांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली. आता माणिकराव ठाकरे २० वर्षांनंतर विधानसभेच्या मैदानात उतरल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मात्र संजय राठोड यांनी सामाजिक कार्य, विकासकामे आणि जनसंपर्काच्या जोरावर मतदारसंघावर ठेवलेली पकड बघता, सध्यातरी विजयाची खात्री काँग्रेसमध्ये कोणीही देवू शकत नसल्याचे चित्र आहे. राजकारणातील दोन तुल्यबळ उमेदवार एकमेकांविरोधात उभे असल्याने राज्यातील एक महत्वपूर्ण लढत म्हणून दिग्रस मतदारसंघाकडे जनतेसह राजकीय वर्तुळाच्या नजराही लागल्या आहेत.