भाजपने ‘चारसो पार’ म्हणजेच ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा नारा दिल्याने त्याची वेगळी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. ४०० पेक्षा अधिक जागा आल्यावर भाजप घटना दुरुस्ती करणार, अशा चर्चा वेगाने पसरली. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचा खुलासा करावा लागला. नाही म्हटले तरी समाजातील एका वर्गावर त्याचा परिणाम होतोच. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने भाजपशी हातमिळवणी केली असली तरी आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो. अन्यथा शरद पवार गट लगेचच त्याचा फायदा उठवायचा ही भीती वेगळी. महायुतीत लोकसभेच्या चार जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादीने मोठया थाटामाटात जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. पक्ष जरी चार जागा लढवीत असला तरी आंतरराष्ट्रीय ते गल्लीपर्यंतच्या विविध प्रश्नांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. जाहीरनाम्याच्या दुसऱ्याच पानावर ‘आमचा मूलमंत्र’ म्हणून भारताच्या संविधानाची उद्देशिका छापण्यात आली आहे. घटना दुरुस्तीची चर्चा सुरू असल्यानेच आम्ही घटनेला बांधील आहोत हे दाखविण्यासाठी हा सारा खटाटोप केल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला.

पुन्हा मारुती चौक

सांगलीचा मारुती चौक म्हणजे एकेकाळी प्रस्थापितांना जोरदार धक्का देणारा राजकीय अड्डा. याच ठिकाणाहून १९९० मध्ये राज्याचे नेतृत्व करणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देण्याचे नियोजन झाले होते. राजकारणात अगदी नवखा असलेले पैलवान संभाजी पवार यांनी साखर कारखानदारीत दिग्गज असलेले स्व. वसंतदादा पाटील यांचे राजकीय वारसदार पुतणे विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव करण्यासाठी याच चौकात विरोधाची मुहूर्तमेढ रोवली होती. या राजकीय जुळणीला रसद मात्र, इस्लामपूरची होती. यामुळे सांगलीच्या प्रस्थापितांच्या गर्दीत पैलवान आप्पासारखा बिजली मल्ल राजकीय आखाडयात चमकला. आताही एका मल्लाच्या म्हणजेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी मारुती चौकातूनच प्रारंभ करण्यात आला. आणि ३४ वर्षांनंतर पुन्हा एकदा मारुती चौकातील राजकीय जुळणी कट्टा पुन्हा चर्चेत आला. आता या वेळी इस्लामपूरकरांनीच परिवर्तनाची हाक दिली आहे. यासाठी लागणारी कुमकही पुरविण्याची हमी देताना सांगितले, मी नाही, त्यातला.

हेही वाचा >>> वडील विरुद्ध मुलगा

हाडाची काडं.. जिवाचं रान

लोकसभा निवडणुकीचा ज्वर तापत चालला आहे तसे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाषणाची लय उंचावत चालली आहे. घणाघाती वक्तृत्वाच्या जोडीला ठेवणीतील म्हणी, वाक्प्रचार याचा दणकेबाज वापर केला जात आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण त्यांच्या प्रकृतीला साजेशेच दणकट. एरवीही त्यांच्या भाषणात ते कोणाच्याही मागे साधेसुधे नव्हे तर थेट हिमालयाप्रमाणे उभे राहतात. आता निवडणूक काळात कार्यकर्त्यांनी अहोरात्र प्रचाराची धुरा वाहावी यासाठी ते ‘रक्ताचं पाणी हाडाची काडं’ करावीत या वाक्प्रचाराचा हमखास वापर करतातच. अर्थात मुश्रीफ असे करतात म्हटल्यावर कागलच्या दुसरे प्रतिपक्षाचे असलेले संजय घाटगे मागे कसे राहतील?. मुश्रीफ – घाटगे एकाच महाविद्यालयातील आणि क्रिकेट संघातील भिडू. ठाकरे सेनेत असलेले माजी आमदार संजय घाटगे आपल्या भाषणात ‘रात्रीचा दिवस आणि जिवाचे रान’ असा उल्लेख करीतच उमेदवार विजयी करावा, असे आवाहन करतात.

एक पस्तीसचा मुहूर्त..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी महायुतीची निर्धार सभा पार पडली. या सभेसाठी महायुतीचे डझनभर नेतेही उपस्थित होते. सभेला सर्वांनाच संबोधित करण्याची इच्छा होती. मात्र तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक वाजून पस्तीस मिनिटांचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे सर्व वक्त्यांना आपली भाषणे आटोपशीर घेण्याचा सल्ला देण्यात आला. कारण वक्त्यांची भाषणे लांबली तर मुहूर्त चुकण्याची शक्यता होती. त्यामुळे सव्वा वाजताच निर्धार सभा संपविण्यात आली. एक वाजून ३० मिनिटांनी तटकरे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी ठरलेल्या मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

(संकलन : संतोष प्रधान, हर्षद कशाळकर, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे)

Story img Loader