‘अरे त्या एकनाथास चांगले उमेदवार कोणी हवेत की नको..’, या पत्रकारमहर्षीच्या प्रश्नावर या महाराष्ट्रातील समस्त राजकीय पक्ष पॉवरफुल धक्क्याने हादरले. कारण प्रश्न विचारणारी व्यक्ती कोणी साधीसुधी असामी नव्हती. देशातल्या आयटी उद्योगाची तारणहार, ज्याच्या हातून प्रणब रॉय इत्यादींनी ‘सेफॉलॉजी’चे धडे गिरवले आणि ज्यांच्या केवळ उपस्थितीने काही दूरचित्रवाणी वाहिन्यांचा आणि त्यामुळे मराठी पत्रकारितेचा उद्धार झाला अशी ही असामी ! भाजपच्या दबावाखाली पिचलेल्या आणि अजितदादांच्या ‘राष्ट्रवादी’ शेजाऱ्याने कावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साह्यास जाण्याचा या पत्रमहर्षीचा विचार ऐकून शिंदेच्या गोटातही दाणादाण उडाली. शिंदेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या फडणवीसांनी तर घाबरून डोळे गच्च मिटून घेतले आणि रामाचा (अयोध्येतल्या) धावा सुरू केला. न जाणो हे पत्रमहर्षी आपणासही विचारायचे.. भाजपस कोणी अभ्यासू, विद्वान, युगप्रवर्तक इत्यादी उमेदवार हवेत की नकोत? हा प्रश्न समजा दिल्लीतल्या दोघांपैकी एकाच्या कानावर गेला आणि त्यांनी नारायण राणे, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील अशा मान्यवरांप्रमाणे या पत्रमहर्षीनाही आपल्या पक्षात घेतलं तर उद्या आपलाच बाजार उठायचा अशी भीती फडणवीसांना चाटून गेली. हा प्रश्न ऐकून त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचाही शांतपणा ढळला. उद्या यांना उमेदवारी दिली तर मुख्यमंत्रिपदाचे तेच दावेदार व्हायचे.. अशी चिंता निर्माण होऊन ते चि. श्रीकांत, रा.रा. उदय सामंत.. गेला बाजार ते ‘काय झाडी, काय डोंगार.’वाले शहाजीबापू कुठे दिसतात का मदतीला म्हणून घाबरेघुबरे झाले. त्यांनी हाक दिली.. कोण आहे रे तिकडे? भाईंचा आवाज ऐकून दरवाजाबाहेर स्टुलावर पेंगणारे म्हस्के धावत आत आले. त्यांना पाहताच शिंदेनी आदेश दिला.. ठरलं तर मग.. ठाणे मतदारसंघ आपण लढवायचा नाही..! पत्रमहर्षीसाठी आपण आवळा द्यायचो आणि त्या बदल्यात आपला कोथळा निघायचा. म्हस्क्यांनी लगेच चुक दुरूस्त केली..कोहळा म्हणायचंय का आपल्याला? तेच ते.. मुख्यमंत्री म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 अशा तऱ्हेने शिंदे यांनी पत्रमहर्षीच्या धक्क्याने ठाणे न लढवण्याचा निर्णय घेतला. आणि एकनाथांचा ‘उदय’ न उगवताच मावळला.

आता सदर पत्रमहर्षी.. ‘डेमॉक्रॅटिक पक्षाला कोणी चांगले उमेदवार हवेत की नको’ असा प्रश्न जो बायडेन यांना विचारतायत अशी माहिती सूत्रांकडून मिळते.

हेही वाचा >>> ‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

साखरपुडा ते घटस्फोट..

सांगलीच्या जागेसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चढाओढ आता टोकाला  पोहचली आहे. या चढाओढीत ना ठाकरे शिवसेना ना विशाल पाटील कुणीही माघार घ्यायला तयार होतील असे सध्या तरी वाटत नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा संयुक्त मेळावा शिवसेनेने आयोजित केला होता. या मेळाव्याला घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. आता निवडणूक म्हटलं की रूसवे-फुगवे असणारच. यानुसार हे रूसवे फुगवे चालत राहतील असे समजून शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी आम्ही आग्रहाने सर्व मित्र पक्षांना संयुक्त बैठकीस बोलावले आहे. आता निवडणूक म्हणजे एक लग्न सोहळाच. त्यामुळे आम्ही नवरीकडची मंडळी असल्याने जरा पडतीच बाजू घेत आहोत असे आवर्जून सांगितले. मात्र, साखरपुडया पासूनच सुरू असलेले पेच-डावपेच घटिका भरत आली तरी घटस्फोटाच्या दिशेने चालले आहेत. आता या लग्नाचा करेक्ट कार्यक्रम करणारा मध्यस्थी कोण, असा प्रश्न वधू-वरांच्या जाणत्यांना पडला आहे.

सारे काही प्रसिद्धीसाठी

लोकसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीचा मोठा उत्सव म्हटले जाते. या उत्सवात प्रमुख बलदंड राजकीय पक्षांसह इतर छोटे पक्ष, अपक्ष उमेदवार रिंगणात उतरतात. तर बरीच हौशी, गवशी मंडळी पुढे सरसावली असतात. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारांची भाऊगर्दी झाली असून यात एक उमेदवार चक्क यमराजाच्या वेशभूषेत रेडयावर बसून निवडणूक अधिकारी कार्यालयात दाखल झाला. तेव्हा सर्वांचे लक्ष वेधले. परंतु हा यमराज येताना उमेदवारी अर्जच विसरला होता. त्यामुळे अर्ज न भरताच माघारी जावे लागले. दुसऱ्या एका घटनेत अंगभर सोन्याचे अलंकार घालून फिरणाऱ्या एका ‘गोल्डन वूमन’ने सोलापूरचा विकास फाटला आहे, हे दर्शविण्यासाठी अंगावर चक्क फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज दाखल केला. येताना ती एका आलिशान मोटारीत आल्यामुळे तिचा फाटक्या विकासाचा दाव्यावर पाणी फिरले. माढयातून उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेल्या एका प्राध्यापकाने महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले. उमेदवारांच्या अशा वेगवेगळया क्लुप्तयांनी प्रसिद्धीचा फंडा समोर आला.

छगन भुजबळ, उदय सामंत समदु:खी

राज्य मंत्रिमंडळातील छगन भुजबळ आणि उदय सामंत हे दोघेही समदुखी आहेत. उभयतांनी लोकसभा निवडणुकीची सारी तयारी केली होती. सामंत यांनी तर आपल्या भावासाठी वर्षभर आधीच नियोजन करण्यास सुरुवात केले होते. भाऊ रिंगणात असेल तरच रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा निवडून येईल, अशी कुजबूज सामंत यांच्या गोटातून सुरू झाली होती. नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आली तेव्हाच राणे लोकसभा लढतील हे स्पष्ट झाले होते. पण सामंत हे शेवटपर्यंत आशावादी होते. पण भाजपने ऐकले नाही व शिवसेनेकडील ही जागा बळकावली. नाशिकमध्ये भुजबळांनाही आपण लोकसभा लढवावी, असे वाटत होते. त्यांनी नाशिकमध्ये हवा निर्माण करण्यास सुरुवात केली. पण शेवटी त्यांचाही हिरमोड झाला. भुजबळ किंवा सामंत या दोघांनाही माघार घेत असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे लागले.  भाजपच्या दबावाच्या राजकारणापुढे मित्र पक्षांचे काही चालत नाही हेच महायुतीत मतदारसंघ आणि उमेदवारांच्या निवडीत अनुभवास आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi maharashtra political crisis maharashtra politics news maharashtra politics political chaos in maharashtra zws 70
Show comments