पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वा खासदार संजय राऊत, कोणाचीही भीडभाड ठेवायची नाही हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वभाव. काँग्रेसमध्ये डावलले जात असल्याची भावना झाल्याने नाना पटोले २००९च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले. तेथे आमदार व नंतर खासदार झाले. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. मोदींचा करिष्मा काही औरच होता तेव्हा. संसदेच्या उपाहारगृहात मोदी दुपारी भोजनासाठी गेले, तेव्हा त्यांच्या शेजारी नाना पटोले बसले होते. मग काय स्वारी एकदमच हवेत गेली. वृत्तवाहिन्यांना नानांनी मोदींच्या भोजनाचे रसभरीत वर्णन सांगितले. त्या दिवशी नाना राष्ट्रीय पातळीवर चमकले. भाजप आणि काँग्रेसमधील फरक बहुधा नानांना कळलाच नाही. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत कृषी क्षेत्रावर बोलू दिले नाही म्हणून नानांनी निषेधाचा सूर लावला. झाले भाजपने नानांवर फुल्ली मारली. नानानीही मध्येच लोकसभा खासदारकीचा राजीनामा देऊन टाकला. नाना काँग्रेसमध्ये परतले. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नाही, मग त्यांची निवड विधानसभा अध्यक्षपदी करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदापेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद नानांना अधिक आकर्षक वाटले. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. (नानांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अध्यक्ष म्हणून नानांना अधिकार गाजविता आला असता) जागावाटपात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असता त्याला नाना पटोले यांनीच आक्षेप घेतला. नाना आणि संजय राऊत यांच्यातील वाद वाढत गेला. शेवटी नाना जागावाटपात नको, अशी भूमिका शिवसेनेला घ्यावी लागली. लोकसभेतील काँग्रेसच्या यशानंतर ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून नानांचा उल्लेख होऊ लागला. नानाही सुखावले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणाऱ्या यशावर नानांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.

हेही वाचा >>> भाजपविरोधात बंडखोरांना शिंदेंकडून आर्थिक रसद; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप

दोस्त दोस्त ना रहा….‘काय डोंगर, 

काय झाडी, काय हाटिल..एकदम ओक्केमंदी’ या खास माणदेशी शैलीत संवाद साधून अनेक दिवस प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अॅड. शहाजीबापू पाटील हे आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी शेकापपेक्षा आपल्या मित्रामुळे हैराण झाले आहेत. त्यांचे मित्र म्हणजे माजी विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शेकापच्या विरोधात राष्ट्रवादीच्या परस्पर उमेदवारी भरली होती. आश्चर्य म्हणजे त्यांना राष्ट्रवादीचे चिन्हही मिळाले होते. पक्षादेश डावलून त्यांनी सांगोला विधानसभेची जागा लढविणे शिवसेनेच्या शहाजीबापूंच्या पथ्यावर पडले होते. त्यातून त्यांची मैत्री इतकी झाली की दोघेही आमदारकीचे भागीदार झाल्याचे म्हटले गेले. तसे पाहता सत्ताकारणात दीपक साळुंखे हे एवढे भाग्यवान समजले जातात. अनेक वर्षे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर निष्ठा वाहून जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकेत संधी मिळविली. तिकडे शरद पवार यांच्यावर निष्ठा वाहून विधान परिषद पदरात पाडून घेतली. बहिणीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लावून घेतली. सांगोल्यात शेकापशीही मैत्री करून नगर परिषदेत सत्तेची भागीदारी ठरलेली. या अर्थाने दीपक साळुंखे खरोखरच भाग्यवान. शहाजीबापूंचे एवढे जवळचे दोस्त मानले गेलेले साळुंखे अचानक ‘मातोश्री’वर दाखल झाले. शिवसेनेने (ठाकरे) त्यांना सांगोल्यातून उमेदवारीही जाहीर केली. ज्याला मदत केली तोच विरोधात गेला, अशी म्हणण्याची पाळी शहाजीबापूंवर आली. तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो याची उत्सुकता आहे.