नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपणास काही काळ आराम करायचा असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सामाजिक कार्याची जबाबदारी मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी घ्यावी, राजकारणात स्वत:च्या निर्णय क्षमतेवर पुढे जावे, असे आवाहनही केल्याने भुजबळ हे खरोखर गंभीर आहेत की निवडणुकीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे भावनिक साद मतदारांना घातली, याची चर्चा रंगली आहे.

घरातील एखादा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यास छगन भुजबळ हे कायमच मतदारांच्या भावनिकतेला हात घालतात. त्याचाच अनुभव नांदगाव येथे समीर भुजबळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा आला. शिवसेनेच्या (शिंदे गट) ताब्यातील नांदगाव मतदारसंघात यापूर्वी भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी सलग दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या जागेवर भुजबळ यांच्याकडून पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ यांना मैदानात उतरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याच कारणास्तव समीर यांचा वाढदिवस भुजबळ कुटुंबीयांनी नांदगाव मतदारसंघात साजरा केला.

राज्यासह नाशिक जिल्ह्याची तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. उभयतांनी सामाजिक कार्य पुढे न्यावे. काहीही करण्यापूर्वी आपणास विचारण्याची गरज नाही. आपणास काही काळ आराम करायचा आहे, असे नमूद केले. या भावनिक आवाहनातून भुजबळांना नांदगावमध्ये पुन्हा जम बसवायचाय की राजकारणातून निवृत्त व्हायचे आहे, याचे ठोकताळे राजकीय वर्तुळात मांडले जात आहेत.

हेही वाचा :अंशत: अनुदानित शाळांना २० टक्के वाढीव अनुदान मंजूर

लोकसभा निवडणुकीपासून भुजबळ हे नाराज असल्याचे मानले जाते. मात्र, आता ते येवल्यात विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. मागील दोन दशकांपासून या मतदारसंघावर त्यांचे एकखांबी वर्चस्व आहे. निवृत्तीच्या संकेतामुळे या मतदारसंघाची जबाबदारी ते कुणाकडे देतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र येवल्यात भुजबळ हेच स्वत: उमेदवार असतील.

नांदगावमध्ये पुतण्या समीरला पाय रोवता यावेत म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे मतदारांना भावनिक साद घातल्याचे मानले जाते. समीर भुजबळ हे २००९ मध्ये नाशिकमधून लोकसभेत पोहोचले होते. या निवडणुकीवेळी मराठा-ओबीसी वाद उफाळून आला होता. तेव्हाही छगन भुजबळांनी आपला पुतण्या तुमच्या पदरात टाकत आहे, त्याला सांभाळून घ्यावे, असे आवाहन नाशिककरांना केले होते.

छगन भुजबळांची राजकीय कारकिर्द नेहमीच आक्रमकतेकडे झुकलेली असते. परंतु, जेव्हा काही वेगळे प्रसंग उद्भवतात, तेव्हा भुजबळ हे नेहमीच भावनिक आधारांवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी आक्रमतेला मुरड घालतात. निवडणुकीत त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांना फायदाच मिळतो. आगामी निवडणुकीत तशी परिस्थिती असल्याने नम्रतेकडे झुकून भावनिक आधार त्यांनी घेतला असावा. – संदीप डोळस, सामाजिक विश्लेषक