नवी दिल्ली: शहरी भागातील मतदारांमधील निरुत्साहाबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र तसेच झारखंडमध्ये मतदानाच्या तारखा आठवड्याच्या मध्यात ठेवण्यात आल्या आहेत. याचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी हा आहे. मुंबई तसेच पुण्यात कमी मतदान होत असल्याचा मुद्दा आयोगाने सातत्याने उपस्थित केला आहे. ही टक्केवारी वाढावी यासाठी आयोगाने जनजागृती अभियान हाती घेतल्याचे राजीवकुमार यांनी नमूद केेले. गुरगाव, फरिदाबाद तसेच हैदराबादमधील ज्युबिली हिल्स तसेच दक्षिण बंगळूरु, मुंबईतील कुलाबा, गुजरातमधील गांधीनगर तसेच पुणे व ठाण्यात मतदानाची टक्केवारी राज्याच्या तुलनेत कमी राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. २०१९ मध्ये शहरी भागात सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते. मात्र राज्याच्या तुलनेत ते कमीच होते. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत उच्चभ्रू भागात राज्यातील सरासरीपेक्षा २० टक्के कमीच मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>निवडणुका आणि मन:पूत विषयांतर: महाराष्ट्रातील मतदारांनी जागे राहावे!

● २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात ६०.५६ टक्के मतदान झाले होते. पण, १५ शहरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राज्यातील सरासरीपेक्षा कमी म्हणजे ४० ते ४५ टक्के इतकेच मतदान झाले होते. यामध्ये कुलाबा (४०.१० टक्के), डोंबिवली (४०.८० टक्के), कल्याण-पश्चिम (४१.९ टक्के), वर्सोवा (४२.४० टक्के), अंबरनाथ (४२.५० टक्के), ऐरोली (४२.६० टक्के), ओवळा-माजिवाडा (४३.१० टक्के), पुणे कॅन्टॉन्मेंट (४३.४० टक्के), अंधेरी-पश्चिम (४२.५० टक्के), कल्याण-पूर्व (४३.७० टक्के), वांद्रे-पूर्व (४४ टक्के), शिवाजीनगर (४४.१० टक्के), मुंबादेवी (४४.४० टक्के), कुर्ला (४४.९० टक्के) व बेलापूर (४५.२० टक्के) या मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतील मतदारसंघांचा समावेश आहे.

● २०१९ मध्ये ६४ शहरी मतदारसंघांपैकी ६२ मतदारसंघामध्ये राज्यातील सरासरी मतदानापेक्षा कमी मतदान झाले.

● ग्रामीण भागांमध्ये जळगाव (४५.४० टक्के), भुसावळ (४८.९० टक्के) व नालासोपारा (५१.८० टक्के) या मतदारसंघांमध्ये सर्वांत कमी मतदान झाले होते.

● २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही कल्याण, पुणे, ठाणे, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण-मध्य या १० पैकी ६ शहरी मतदारसंघांमध्ये नीचांकी मतदान झाले होते.

हेही वाचा >>>स्थगिती नसल्यानेच आमदारांच्या नियुक्त्या; राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका

मतदारांसाठी सुविधा

● लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील काही मतदारकेंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तेथे मतदारांसाठी बसण्याची सुविधा पुरवण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारकेंद्रांवर बसण्यासाठी खुर्च्यांची सुविधा दिली जाणार आहे.

● ८५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील मतदारांना घरातच मतदान करता येऊ शकेल. निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतदारांच्या घरी जातील. यावेळी गोपनीयतेची पूर्ण दक्षता घेतली जाईल. मतदानावेळी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनाही हजर राहता येईल.

● प्रचारादरम्यान वा मतदानाच्या दिवशी कुठलाही गैरप्रकार होणार नाही. कुठल्याही स्वरूपाची आमिषे दिली जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. असे गैरप्रकार रोखण्यामध्ये हयगय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.