चिपळूण : विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी चार जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या. मात्र चिपळूणची एकमेव जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली. त्यामुळे ३४ वर्षानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदार संघातून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह हद्दपार झाले आहे.

शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली. १९९० च्या निवडणुकीत बापूसाहेब खेडेकर चिपळूण मधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून येणारे पहिले आमदार ठरले. १९९५ आणि १९९९ मध्ये शिवसेनेचे नेते भास्कर जाधव धनुष्यबाण या चिन्हावर चिपळूण मधून विधानसभेवर निवडून गेले. २००४ मध्ये भास्कर जाधव यांना डावलून मुंबई महानगरपालिकेतील तत्कालीन सभागृहनेते प्रभाग शिंदे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हा भास्कर जाधव यांच्यासह मतदारसंघातील शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. प्रभाकर शिंदे यांनी साडेपाच हजार मते मिळवून चिपळूणमध्ये धनुष्यबाणाचे अस्तित्व कायम ठेवले. तेव्हा चिपळूण मधून राष्ट्रवादीचे रमेश कदम निवडून आले होते. चिपळूणची जागा राष्ट्रवादीला पहिल्यांदा मिळाली. २००४ नंतर चिपळूण मधील शिवसेनेचे अस्तित्व नगण्य होते. सदानंद चव्हाण यांनी पक्षाची धुरा हाती घेतली. अतिशय कष्टाने संघटना उभी केली आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले. २०१४ मध्येही ते धनुष्यबाण या चिन्हावर पुन्हा आमदार झाले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे शेखर निकम निवडून आले. २०१९ मध्ये राज्यात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. सुरुवातीला सदानंद चव्हाण महाविकास आघाडीचे घटक होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. यंदा भाजपच्या मदतीने धनुष्यबाण या चिन्हावर सदानंद चव्हाण विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चिपळूणचे आमदार शेखर निकमही शरद पवारांना सोडून भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. महायुतीने बहुतांशी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे चिपळूण मधून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले सदानंद चव्हाण यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे १९९० ते २०२४ या ३४ वर्षात झालेल्या सात विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह होते. मात्र यावर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच चिपळूण मधील मतदान यंत्रावर शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी नसणार आहे.

हेही वाचा >>>Morshi Assembly Constituency: मोर्शीत भाजप आणि राष्‍ट्रवादी अजित पवार गट आमने-सामने; देवेंद्र भुयार राष्‍ट्रवादीकडून लढणार

माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना महामंडळ किंवा चिपळूण मधून उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यांना पक्षाच्या उपनेते पदावर समाधान मानावे लागले.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर चिपळूण मधून शिवसेना सर्व अर्थाने संपली होती. ग्रामीण भागातील शाखांचे फलक ही काढण्यात आले होते. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेनेचा भगवा झेंडा ग्रामीण भागात कुठेही दिसत नव्हता. त्याही परिस्थितीमध्ये शिवसेना वाढवण्याचे शिवधनुष्य मी हाती घेतले आणि पुन्हा शिवसेना वाढवली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेली महाविकास आघाडी मला रुचली नाही. मतदारसंघातील पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मी महायुतीमध्ये सामील झालो होतो. चिपळूण ची जागा राष्ट्रवादीला मिळाली याचे दुःख नाही. मित्र पक्षाचा आमदार निवडून आल्यानंतर तो त्याचा पक्ष वाढवणार. मतदार संघात भविष्यात शिवसेना कशी वाढवू हा माझा समोर प्रश्न आहे आणि ही बाब मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे.- सदानंद चव्हाण, शिवसेना उपनेते