शहर भाजपने खांदेपालट केले असून नवीन शहराध्यक्ष म्हणून माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नेमणूक केली आहे. ‘कसब्या’च्या धड्याने शहाणे झालेल्या भाजपने शहराध्यक्ष निवडताना पुन्हा तीच चूक होणार नाही, याची खबरदारी घेत ‘योग्य’ निवड केली. मात्र, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन घाटे यांच्यापुढे नवनवीन आव्हाने आतापासूनच उभी राहिली आहेत. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर प्रामुख्याने शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याने महापालिकेत पुन्हा एकदा एकहाती सत्तेचा नारा द्यायचा की, महायुतीला सत्तेत वाटेकरी करून घेतले जाणार, ही भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. तसेच नवीन कार्यकारणी जाहीर करताना पक्षांतर्गत कलह रोखण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपने यापूर्वी महापालिकेत एक हाती सत्ता घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर हे स्वप्न अधुरे झाले आहे. भाजपच्या शहर पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे वाटते. मात्र महायुती म्हणून निवडणूक लढविली जाण्याच्या शक्यतेने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांची तयारी करताना घाटे यांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवायची की स्वतंत्रपणे, याबाबतचा निर्णय राज्य पातळीवर होणार असला तरी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी घाटे यांना कोणती तरी एक भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

हेही वाचा – संसदेत आज विरोधक काळा रंग दाखवून सरकारचा निषेध करणार; तर पंतप्रधान मोदी राजस्थान-गुजरातच्या दौऱ्यावर

माजी आमदार जगदीश मुळीक यांचा कार्यकाळ संपल्यानंतर घाटे यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या पदासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते गणेश बिडकर आदींची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपने घाटे यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे पक्षाअंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. पक्षाअंतर्गत नाराजीबरोबरच आगामी महापालिका निवडणुका विचारात घेता महापालिका निवडणुका ‘एकला चालो रे’ अशी हाक देऊन लढवायची की, महायुतीला सोबत घेऊन याबाबत कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्था दूर करावी लागणार आहे. त्यामुळे घाटे यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आगामी महापालिका निवडणुका भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्रित लढविल्यास भाजपच्या वाट्याच्या कमी जागा मिळणार आहेत. त्यामुळे भाजपचे महापालिकेत एकहाती सत्ता स्थापनेचे स्वप्नही धूसर झाले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शहरातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघांत विजय मिळाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला ९८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपची महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकहाती सत्ता आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला ४२ जागा, तर शिवसेनेला नऊ जागांवर समाधान मानावे लागले होते. सद्य:स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात ताकद आहे. मात्र, शिवसेना शिंदे गट कमकुवत आहे. सत्तेत या दोन मित्र पक्षांना सहभागी करून घ्यावे लागण्याची शक्यता असल्याने भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नाराजीचे सूर काढले जाऊ लागले आहेत.

हेही वाचा – धाराशिवमध्ये राजकीय ‘चिखलफेक’!

आगामी निवडणुकीत भाजपने ११० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणाही केली होती. मात्र, बदललेल्या राजकारणानंतर भाजपची अडचण झाली आहे. यातून मार्ग काढताना घाटे यांची दमछाक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. घाटे यांना आता शहर कार्यकारिणी आणि मंडलनिहाय कार्यकारणी जाहीर करावी लागणार आहे. त्यावेळी सर्वांना सामावून घेण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर भाजपमधील नाराजी उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाअंतर्गत कलह रोखण्यासाठी घाटे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City bjp has appointed former house leader dheeraj ghate as the new city president after learning lesson from kasba print politics news ssb