छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील जागावाटपाची महायुतीची बोलणी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होती. जागावाटपाचे सूत्र ठरले का, जागा वाटपाच्या बोलणीतील नक्की काय झाले याचे तपशील बाहेर आले नाहीत. रात्री पावणे एकच्या दरम्यान अजित पवार पहिल्यांदा चर्चेनंतर बाहेर पडले. चर्चा समन्वयाने सुरू आहे. योग्य ते निर्णय झाल्यावर त्याची माहिती दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दीडच्या सुमारास माध्यमांना विमानतळावर सांगितले.

महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या बोलणीमध्ये अजित पवार यांना तसेच शिवसेनेला किती जागा द्यावयाच्या यावरुन बराच खल सुरू आहे. अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्यापासून भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी किती जागांचा दावा केला हे समजू शकले नाही. या बैठकीस भाजपचे नेते अमित शहा, भुपेंद्रसिंह यादव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.

हेही वाचा – पुण्यात ठाकरे गटामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

किमान ५० ते ६० जागा निवडून आल्या तर आणि तरच सत्तेतील वाट्याची बोलणी करण्याचा मार्ग मोकळा असू शकतो, याची कल्पना महायुतीमधील राष्ट्रवादींच्या नेत्यांना असल्याने त्यांनी अनेक जागांवर दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, महायुतीमध्ये राष्ट्रवादीला जागा किती यावर बराच खल सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जागा वाटपात मुंबई, मराठवाडा व कोकणात शिवसेनेचा हिस्सा जास्त असू शकतो, असे सांगण्यात येत आहे. मात्र, सुरू असणाऱ्या बोलणीत समन्वय असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

हेही वाचा – मराठवाड्यात भाजपसमोर आव्हान कायम

मराठवाड्यातील ४६ पैकी ३० जागांवर महायुतीचा विजय होईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. पण किती जागा कोणत्या पक्षाला याची बोलणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय कळविले जातील, असे सांगण्यात येत आहे.