ठाणे, पालघर, कल्याण इत्यादी मतदारसंघात भाजपा खासदारकी लढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला लागले असताना आगामी लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच जिंकून येतील असा एल्गार शिवदूत मेळाव्यात शिवसेनेचे विभागीय संपर्क प्रमुख नरेश मस्के यांनी केला. त्यामुळे निवडणुकीबाबत सत्ताधारी पक्षांमध्ये वाटाघाटी होण्यापूर्वीच शिवसेनेने लोकसभेसाठी आपला इरादा स्पष्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१८ मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सन २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केले होते. या निवडणुकीत ते विजयी झाल्यानंतर सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांनी ही निवडणूक शिवसेनेतून लढली. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी शिंदे गटाचा मार्ग पत्करला.

हेही वाचा : राम मंदिर आंदोलनात देशभरात चर्चा, आता वृंदावनमध्ये स्थायिक; कोण आहेत साध्वी ऋतंभरा ज्यांची अमित शाहांनी घेतली भेट!

दरम्यानच्या काळात भाजपाने पूर्वपार आपल्याकडे असलेली पालघरची जागा परत मिळावी म्हणून पक्ष बांधणी सुरू केली असून विधानसभा निहाय तसेच लोकसभा संपर्क कार्यालय सुरू करून क्रियाशील केले आहे. त्यांनी तीन- चार संभाव्य उमेदवारांना संघटनात्मक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन केंद्रीय अथवा राज्याच्या मंत्री किंवा पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्या दरम्यान संभाव्य उमेदवारांना व्यासपीठावर स्थान देत, त्यांना कार्यकर्त्यांसमोर पुढे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

एकीकडे पालघर जिल्ह्यातील काही स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सह शिवसेनेचे काही खासदार भाजपाच्या तिकिटावर लढण्यासाठी उत्सुक असल्याचा मतप्रवाह पुढे आला असल्याने राजकीय तर्क वितर्कला उधाण आले होते. पालघरची लोकसभा जागा लढवण्यास शिवसेनेला संधी नाकारण्यात आली तर पुढे येणाऱ्या विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम होईल अशी शक्यता आहे.

हेही वाचा : कोल्हापूरच्या हद्दवाढीचे राजकारण तापले

याच पार्श्वभूमीवर पालघर विधानसभा क्षेत्रातील ५४ बूथच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांसाठी चिंचणी जवळ आयोजित शिवदूत मेळाव्यात नरेश म्हस्के यांनी पालघर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत इरादा स्पष्ट केला. पालघर जिल्ह्यातील नागरिक व शिवसैनिकांची नावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळली असल्याचे सांगत मुख्यमंत्री यांनी त्यांच्या कार्यकाळात पालघरसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचे सांगितले. शासकीय योजना व हाती घेतलेल्या प्रकल्पांची माहिती तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे सांगत अलीकडे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील शिवसेनेच्या अपयशाबाबत पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याचे सांगितले.

पक्षाने आपल्याला पद दिले, मान सन्मान दिला, परिसरातील योजना दिल्या असे सांगताना आपण पक्षासाठी काय केले हा प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे सांगत शिवसेनेत गटबाजी चालणार नाही व पक्षविरोधी कारवायांना संधी दिल्यानंतर त्यांची भूमिका बदलली नाहीतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येईल असाही त्यांनी इशारा दिला. पक्षाच्या शाखा पदाधिकाऱ्यांपुरत्या मर्यादित न ठेवता सैन्य गोळा करा, कार्यकर्ते निर्माण करा, एकत्रित येऊन काम करा असाही त्यांनी सल्ला दिला.

हेही वाचा : मराठा-कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचे काम ठप्प

या मेळाव्यात पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक पक्षांशी संसार केल्याचे सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांचा उल्लेख करत भाजपा असा उल्लेख करून त्यांनी त्यानंतर अल्प विराम घेत विषयांतर केल्याने त्यांच्या वक्तव्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde shivsena claims palghar lok sabha seat after bjp prepared to contenst palghar lok sabha print politics news css