सांगली : येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि महायुतीतील भाजपला आपले संख्याबळ वाढविण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्याबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यात जिल्हा नेतृत्वासाठीही चढाओढ पाहण्यास मिळणार आहे. जिल्ह्यात संख्याबळानुसार राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे सर्वाधिक म्हणजे तीन आमदार आहेत.

सांगली व मिरज हे दोन शहरी मतदार संघ भाजपकडे आहेत. तर जत, पलूस-कडेगाव हे दोन मतदार संघ काँग्रेसकडे आणि शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ आणि इस्लामपूर हे  मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडे आहेत. तर खानापूर मतदार संघातील आमदार अनिल बाबर यांच्या आकस्मिक मृत्यूने ही जागा रिक्त असली तरी वारसदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे निवडणूक रिंगणात उतरत आहेत.

हेही वाचा >>> हसन मुश्रीफ – समरजीत घाटगे यांच्यातील वादाने टोक गाठले

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर याचा परिणाम जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटावर फारसा झालेला नसला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात आपले बस्तान बसविण्याचा आणि गटाला ताकद देण्याचे हेतूता प्रयत्न केले. महापालिकेतील विकास कामांना  १०० कोटींचा निधी देउन महापालिकेत आपला गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आमदार जयंत पाटील यांचे विरोधक म्हणून कार्यरत असलेल्या माजी महापौर इद्रिस नायकवाडी यांना आपल्या पक्षाचे प्रदेश अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष करून आता विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. अल्पसंख्याक चेहरा या निकषावर नायकवडी यांची नियुक्त अजितदादांनी केली असली तरी खरा निकष हा आमदार पाटील यांच्या विरोधकांना ताकद देण्याचा मानला जात आहे. यामुळे राज्यभर मुस्लिम मतदारांना आपल्या पक्षाकडे वळविण्याचही प्रयत्न असू शकतो. तथापि, जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या गटाची मजबूत बांधणी करणे आणि या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा पाया भक्कम करणे हाही हेतू यामागे असू शकतो.

हेही वाचा >>> साकोलीतील वर्चस्व अबाधित राखण्यासाठी फुकेंची धडपड; मर्जीतील उमेदवार देण्यासाठी खटाटोप

इस्लामपूर, शिराळा आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील जागा कायम राखण्याबरोबरच वाढली तर एखादी जागा वाढविण्याचा आमदार जयंत पाटील याचा जसा प्रयत्न आहे तसाच प्रयत्न काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांचाही आहे. जर एखादी जागा वाढली तर राज्य स्तरावर राजकीय वजन वाढण्याबरोबरच जिल्ह्याचे नेतृत्वही हाती येईल हा होरा दोघांचा आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष मैदानात उतरलेले खा. विशाल पाटील यांना ताकद देण्याचे काम आमदार कदम यांनी केले, तर आमदार पाटील हे महाविकास आघाडी धर्माचे पालन करत असल्याचे सांगत या चुरशीत बाजूला राहण्याच्या प्रयत्नात होते. अखेरच्या क्षणी मविआचे चंद्रहार पाटील विजयाप्रत पोहचू शकत नाहीत  हे लक्षात येताच त्यांनी प्रचारातून बाजूला होत अप्रत्यक्ष भाजपच्या संजयकाका पाटील यांना मदतीचा हात दिला असल्याची चर्चा आहे. खा. विशाल पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले असून दिल्ली दरबारी आमदार कदम यांचे वजन वाढले आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात आमदारांची संख्या वाढविणे हेही त्यांचे लक्ष्य आहे. आमदार पाटील व आमदार कदम यांना जिल्ह्यात आमदारांची संख्या वाढविण्यासाठी केवळ सांगली, मिरज आणि खानापूर हे तीनच मतदार तसे विरोधकांचे मतदार संघ आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांना जत वगळता अन्य पाचही मतदार संघात मताधिक्य मिळाले. यामुळे काँग्रेसच्या जागा वाढीला बळ मिळत असले तरी जागा वाटपात कोणाला या जागा मिळतात यावर पुढचे भवितव्य अवलंबून असणार आहे. खानापूरसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीच लक्ष घातले असून या ठिकाणी या गटाला ही जागा मिळाली तर बाबर गटाची काँग्रेसशी असलेली जवळीक विस्ताराला आडकाठी ठरू शकते. यामुळे महाविकास आघाडीत वर्चस्वासाठी सुरू असलेला हा सुप्त संघर्ष कोणत्या टोकाला जातो हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.