मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याबाबत हिंसक वक्तव्ये करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची शनिवारी राजभवनावर भेट घेऊन केली. विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याने ते अस्वस्थ असून त्यांना तातडीने मदत द्यावी, असे निवेदन राज्यपालांना देण्यात आले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेत्यांचा समावेश होता. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असून त्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस दिले जाईल, असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी तर जिभेला चटके देण्याचे वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण एखाद्याच्या जिवाला धोका निर्माण करणे व हिंसेला प्रवृत्त करणे, हे कायद्याविरोधात असून काँग्रेसने आंदोलन केल्यावर गुन्हे दाखल झाले, मात्र या नेत्यांना अटक झालेली नाही. धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सत्ताधारी पक्षांचे नेते करीत आहेत. पण त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. बदलापूरमध्ये शाळकरी मुली व राज्यभरात महिलांवर अत्याचारांच्या घटना घडलेल्या आहेत आणि शासन आरोपींना पाठीशी घालत आहे, याबाबत काँग्रेस नेत्यांनी चिंता व्यक्त केली.