अलिबाग – रायगड जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत सुरूच आहे. रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील यांच्या पाठोपाठ स्नेहल जगतापही काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे. ६ मे रोजी महाड येथे होणाऱ्या सभेत त्या शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे प्रबळ राजकीय पक्ष म्हणून ओळखले जायचे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याच दोन पक्षांत थेट लढत व्हायची. मात्र गेल्या काही वर्षांत दोन्ही पक्षांचा जनाधार घटल्याचे दिसून येत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेस आणि शेकापचा एकही उमेदवार जिल्ह्यातून निवडून येऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील काँग्रेसची परिस्थिती तर मात्र खूपच बिकट झाली आहे.
त्यामुळे पक्षाची वाताहत सुरू आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीपूर्वी रविशेठ पाटील भाजपमध्ये गेले होते. मधुकर ठाकूर आणि माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर काँग्रेसला जिल्ह्यात एकसंघ ठेऊ शकेल असे नेतृत्वच राहिले नव्हते. या काळात प्रदेश पातळीवरूनही पक्ष संघटना टिकून रहावी यासाठी फारसे प्रयत्न झाले नव्हते. त्यामुळे उरले सुरले नेतेही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

हेही वाचा – मुकुल रॉय पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर? रॉय यांचा मुलगा म्हणतो, “त्यांच्या डोक्यावर…”

माथेरान काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यादेखील पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. येत्या ६ मे रोजी त्या शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचे रायगडातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूर यांच्या भाजप प्रवेशानंतर पनवेल विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची वाताहत झाली होती. रविशेठ पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर पेण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अस्तित्व संपुष्ठात आले होते. मधूकर ठाकूर यांच्या पश्चात सक्षम नेतृत्व न मिळाल्याने अलिबाग मतदारसंघातील काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली होती. अशा वेळी स्व. माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप यांच्याकडे महाड मतदारसंघातील काँग्रेसचा चेहरा म्हणून बघितले जात होते. आता त्यांचा शिवसेना ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झाल्याने, महाड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अस्तित्व संपुष्ठात येणार आहे.

हेही वाचा – “एके काळी इतरांमध्ये दहशत पसरवणारे आज स्वतः दहशतीखाली आहेत,” योगी आदित्यनाथांचा माफियांना इशारा!

कोण आहेत स्नेहल जगताप ?

स्नेहल जगताप या काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर पक्षाची संघटना मतदारसंघात टिकवून ठेवण्यात स्नेहल जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महाड नगर परिषदेच्या तरुण तडफदार नगराध्यक्षा म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. पक्षांतर्गत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय

स्नेहल जगताप यांच्याकडे महाड विधानसभा मतदारसंघाच्या पुढील उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे येथील परिस्थिती बदलली आहे. पण सध्या हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे आगामी काळातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली तरी महाडची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला जाऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन स्नेहल जगताप यांनी काँग्रेस सोडून शिवसेना ठाकरे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या त्या महाड मतदारसंघातून आगामी काळात विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress continues to lose ground in raigad district print politics news ssb
Show comments