जयपूर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसने सुनील शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या या उमेदवारीवर आता काँग्रेसमधील नेत्यांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सुनील शर्मा हे ‘द जयपूर डायलॉग’ या यूट्यूब चॅनेलशी संबंधित आहेत. ही उजव्या विचारसरणीची संस्था आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता विविध राजकीय चर्चांनीही उधाण आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, काँग्रेसने जयपूरमधून सुनील शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शर्मा यांचे कुटुंब दीर्घकाळापासून काँग्रेसशी संबंधित आहे. तसेच सुनील शर्मा हे सुरेश ज्ञान विहार विद्यापीठाचे (SGVU) अध्यक्षसुद्धा आहेत. सुनील शर्मा हे ‘द जयपूर डायलॉग’ या यूट्यूब चॅनेलशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. ही उजव्या विचारसरणीची संस्था आहे; ज्याची सुरुवात २०१६ मध्ये निवृत्त आयएस अधिकारी संजय दीक्षित यांनी केली होती.

हेही वाचा – लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

सुनील शर्मा यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पक्षाने त्यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा विचार करावा, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनीही शर्मा यांच्या उमेदवारीनंतर एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करीत नाराजी व्यक्त केली आहे.

शशी थरूर म्हणाले की, २४, अकबर रोडच्या (काँग्रेस मुख्यालय) वाटेवर जाताना त्यांना हा साक्षात्कार झालेला असू शकतो. त्यांनी त्याच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरून अनेकदा माझ्यावर टीका केली आहे. हे त्याचेच एक उदाहरण आहे; ज्यात “शशी थरूर म्हणजे दुसरे राहुल गांधीच आहेत. फरक इतकाच की, ग्रंथालयातून बाहेर पडताना त्यांनी शब्दव्युत्पत्ती संज्ञाकोशच चोरला”, असे म्हटले आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने सुनील शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र, काही वेळातच त्यांनी एक निवेदन जारी करून आपण फार पूर्वीच जयपूर डायलॉग्सपासून दूर झाल्याचा दावा केला. ” ‘द जयपूर डायलॉग’ यूट्यूब चॅनेलच्या व्यवस्थापनाशी माझा काहीही संबंध नाही. मला अनेकदा न्यूज चॅनेल आणि यूट्यूब चॅनेलवर पॅनेल लिस्ट म्हणून चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले जाते. तिथे मी काँग्रेसची बाजू मांडत असतो. त्यानुसारच ‘द जयपूर डायलॉग’ यूट्यूब चॅनेलने मला विविध सामाजिक, धार्मिक विषयांवर बोलण्यासाठी निमंत्रित केले होते. तिथेही मी देशातील धार्मिक ध्रुवीकरणाला कडाडून विरोध केला होता”, असे ते म्हणाले. “मी फार पूर्वीच ‘द जयपूर डायलॉग’च्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, काही लोक स्वत:च्या निहित स्वार्थांमुळे अफवा पसरवीत आहेत,” असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा – Loksabha Elections 2024 : अखेर ओडिशात भाजपा स्वबळावर लढणार, बीजेडीबरोबर युती फिस्कटण्याचे कारण काय?

दरम्यान, झौबा क्रॉप या वेबसाइटनुसार सुनील शर्मा अजूनही ‘द जयपूर डायलॉग’च्या पाच संचालकांपैकी एक आहेत. त्यांची नियुक्ती सप्टेंबर २०१९ मध्ये करण्यात आली होती. एसजीव्हीयूच्या वेबसाइटनुसार, सुनील शर्मा यांनी राजस्थान विद्यापीठातून १९८४ मध्ये वाणिज्य शाखेची व १९८७ मध्ये कायद्याची पदवी प्राप्त केली. तसेच त्यांनी दोन दशकांपेक्षा जास्त काळ कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले होते.

शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे कुटुंब १९३० पासून काँग्रेसशी संबंधित आहे. त्यांचे वडील काँग्रेस सोशालिस्ट पार्टीचे सरचिटणीस होते. तसेच ते स्वातंत्र्यलढ्यादरम्यान तुरुंगातही गेले होते. त्यांचे भाऊ दिवंगत सुरेश शर्मा हेदेखील काँग्रेसचे जयपूर जिल्ह्याध्यक्ष होते. त्यांनी १९९० च्या दशकात जयपूरमधून विधानसभा निवडणूकही लढवली होती. “माझ्या कुटुंबाने त्यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसची सेवा करण्यात घालवले. मीसुद्धा १९८१ पासून आजपर्यंत काँग्रेस पक्षासाठी काम करतो आहे. या काळात मला पक्षात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress critic sunil sharma get ticket of congress party shashi tharoor raised question spb