नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तराखंड राज्यामध्ये खाते उघडण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. राज्यातील पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. उत्तराखंडमध्ये आपले काय चुकते आहे, याचे विश्लेषण उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीने (UPCC) केले आहे. पक्षाच्या नेत्यांमधील समन्वय, सुसंवाद आणि ताळमेळ यांच्या अभावामुळेच राज्यातील पाचही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पक्षाने काढला आहे. उत्तराखंडमधील पक्षाच्या कामगिरीचे योग्य ते मूल्यांकन करण्याचे आदेश अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) उत्तराखंडमधील पक्षाचे वरिष्ठ नेते पी. एल. पुनिया यांना दिले आहेत. उत्तराखंडमध्ये १० जुलै रोजी बद्रीनाथ आणि मंगलौर या विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर पुनिया पक्षाच्या कामगिरीचे मूल्यांकन करतील, अशी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : फडणवीस यांच्या कानपिचक्यानंतर तरी शिंदे, अजित पवार गटातील कुरघोडी थांबणार ?

उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात आलेले मूल्यांकन उत्तराखंडचे माजी मंत्री नव प्रभात यांच्या नेतृत्वाखालील शिस्तपालन समितीकडून करण्यात आले. उत्तराखंडमधील पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा सलग तिसऱ्यांदा विजयी ठरली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये २०१७ व २०२२ अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले आहे. मात्र, अलीकडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा फक्त पराभवच झालेला नाही; तर मतटक्काही प्रचंड घसरला आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ३८ टक्के मते मिळवली होती. या लोकसभा निवडणुकीमध्ये हा मतटक्का ३२.८३ टक्क्यांवर घसरला आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकूण ७० विधानसभा जागांपैकी १९ जागांवर विजय मिळविता आला होता. मात्र, याहून गंभीर बाब अशी आहे की, या लोकसभा निवडणुकीमध्ये २०२२ मध्ये जिंकलेल्या १९ विधानसभा जागांमधील १४ जागांवर काँग्रेस पिछाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तराखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांच्या बाजपूर विधानसभा मतदारसंघामध्येही ही पिछाडी दिसून आली आहे. तसेच, चकराता विधानसभा मतदारसंघामध्येही काँग्रेस पक्ष पिछाडीवर राहिला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह आमदार आहेत. या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे एकूण विधानसभा मतदारसंघांच्या पार्श्वभूमीवर विश्लेषण केले, तर ७० पैकी ६३ मतदारसंघांमध्ये काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे दिसून येते. नव प्रभात यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले, “राज्याचा दौरा केल्यानंतर पक्षसंघटनेमधील समन्वय, सुसंवाद व ताळमेळ यांच्या अभावाचा परिणाम या निकालावर किती प्रमाणात झाला आहे, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. दोन जिल्ह्यांमध्ये दौरा केल्यानंतर स्थानिक लोकांनी मला सांगितले की, इथे सुसंवादाचा प्रचंड अभाव आहे आणि एकमेकांबद्दल आदराची भावना नाही. त्यामुळे आपापसांतील वाद मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.”

ते म्हणाले की, पक्षाने इतकी खराब कामगिरी का केली, याची कारणे ते शोधत आहेत. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीआधी कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजेत, याबाबत ते लोकांशी सल्लामसलतही करीत आहेत. राज्याचे प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मथुरा दत्त जोशी यांनी म्हटले की, नव प्रभात यांना संपूर्ण राज्याचा दौरा करून लोकसभा निवडणुकीच्या पराभवामागची कारणमीमांसा करण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने येत्या विधानसभा आणि पंचायत निवडणुकीसाठीचे बदल आणि रणनीती ठरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. दुसऱ्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, अशा प्रकारची मूल्यांकने याआधीही झाली आहेत. २०१४ व २०१९ या लोकसभा निवडणुकांतील पराभव तसेच २०१७ व २०२२ या विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर हीच प्रक्रिया राबवण्यात आली होती. या मूल्यांकनातून ज्या त्रुटी सापडल्या, त्यावर काम करून त्या दूर करण्याचे पुरेसे प्रयत्न मात्र झालेले नाहीत. उदाहरणार्थ- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी, पक्षाने स्थानिक पक्ष कार्यकारिणीला प्रत्येक बूथ कमिटीमध्ये २१ ते ५१ लोकांना समाविष्ट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष मैदानात ही सूचना किती पाळली गेली, याबाबत काहीही आढावा घेतला गेलेला नाही.

हेही वाचा : कारण राजकारण: आदित्य ठाकरेंसाठी वरळी यंदा कठीण?

दुसऱ्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, जर माजी मुख्यमंत्री हरीश रावत, प्रीतम सिंह व विरोधी पक्षनेते आर्य यांनी ही निवडणूक लढवली असती, तर कदाचित काँग्रेसला काही जागा प्राप्त करता आल्या असत्या. “पक्षाने त्यांना याबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांनी विविध कारणे देत नकार दिला”, असेही या नेत्याने म्हटले. हरीश रावत हे उत्तराखंड काँग्रेसमधील महत्त्वाचा चेहरा आहेत. मात्र, या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी फक्त हरिद्वार लोकसभा मतदारसंघापुरतेच लक्ष दिले. या मतदारसंघामध्ये त्यांचे सुपुत्र वीरेंद्र यांनी निवडणूक लढवली होती. वीरेंद्र यांचा १.६४ लाख मतांनी पराभव झाला असून, त्यांनी फक्त ३७.६ टक्के मते प्राप्त केली होती. भाजपाचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या जागेवरून विजय मिळवला. “जर हरीश रावत यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली असती, तर ही लढत थेट दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये झाली असती. मग काँग्रेसला कदाचित विजय मिळालाही असता”, असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले. टिहरी गढवाल लोकसभा मतदारसंघामध्ये जोत सिंह गुनसोला यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांना दिलेली उमेदवारी पसंत पडलेली नव्हती. गुनसोला यांना फक्त २२ टक्के मते मिळाली. नैनिताल लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला ३४.६१ टक्के; तर अलमोरा मतदारसंघामध्ये २९.१८ टक्के मते मिळाली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress post mortem on uttarakhand debacle in loksabha election 2024 vsh
Show comments