कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ऊस हंगामापूर्वी आंदोलने छेडून शेतकऱ्यांची सहानभूती मिळवण्याच्या शेतकरी संघटनांच्या मनसुब्यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. प्रशासनाने रस्त्यावरील आंदोलनांना परवानगी दिली जाणार नाही अशी भूमिका घेतली असल्याने यंदा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी संघटनांना आंदोलनांना मुरड घालावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या आंदोलनाची हवा तापण्याची चिन्हे आहेत.

दसऱ्याच्या सुमारास ऊस गळीत हंगाम सुरू होत असतो. याच दरम्यान ऊस दरावरून शेतकरी संघटनांचे आंदोलने सुरू होतात. पश्चिम महाराष्ट्रात ही आंदोलने चांगलीच भडकलेली असतात. उसाच्या गाड्या फोडणे, वाहनांची जाळपोळ, वाहन चालकांना मारहाण असे हिंसक प्रकार घडत असतात. या प्रकाराला यावर्षी अटकाव लागणार असे दिसू लागले आहे.

हेही वाचा – पालघरमध्ये आमदार श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी टांगणीवर

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. शिवाय, १५ नोव्हेंबर पूर्वी गाळप सुरू केल्यास कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. यामागेही मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या मतपेढीचे राजकारण आहे. या भागातील ऊसतोड कामगार हा प्रामुख्याने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारा आहे. मुंडे परिवारावर निष्ठा व्यक्त करणारा बहुतांशी ऊसतोड मजूर हा भाजपशी निगडित असल्याचे मानले जाते. अशी ही हक्काची मतपेढी मतदान काळामध्ये बाहेरगावी जाऊ नये याची दक्षता घेण्याचे हे पडद्यामागील राजकारण आहे.

कारखानदार निवडणुकीत

ऊसतोड कामगार आल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करणे सर्वस्वी अशक्य आहे. शिवाय, सहकारी – खाजगी साखर कारखानदार हे निम्म्या मतदारसंघात उमेदवार तरी आहेत किंवा उमेदवाराचे पक्के समर्थक आहेत. ही सारी मंडळी प्रचार करण्यामध्ये आकंठ गुंतले असल्याने त्यांचाही तसा कारखाने सुरू करण्याकडे कानाडोळा आहे. परिणामी, ऊस दराचे आदोलन हाती घेणे शेतकरी संघटनांना कठीण होऊन बसले आहे. खरे तर यावर्षी ऊस आंदोलन सुरू होण्यापूर्वी महिनाभर पूर्वीच गेल्या हंगामातील उसाचे अधिकचे प्रति टन १०० शंभर रुपये मिळवण्यात शेतकरी संघटनांना यश आले आहे. याच्या जोरावर चालू हंगामात ऊस दर आंदोलन तापवण्याचे नियोजन शेतकरी संघटनांनी केले होते. मागील वर्षाच्या उसाला प्रति टन ३५०० हजार रुपये आणि यावर्षीच्या ऊसाला ४ हजार रुपये दर मिळाले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी लावून धरली आहे. पण आचारसंहितेमुळे या आंदोलनाला परवानगी मिळणार नसल्याने शेतकरी संघटनांना मुरड घालावी लागल्याने आंदोलकांचीच कोंडी झाली आहे.

आचारसंहितेमुळे ऊस दराचे आंदोलने महिनाभर तरी करता येणार नाही. यामुळे शेतकरी संघटनांची अडचण होणार यात तथ्य आहे. याबाबत आता कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय उद्या शुक्रवारी जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये संघटनेचे नेते राजू शेट्टी याबाबतची भूमिका स्पष्ट करतील. – प्रा. जालिंदर पाटील, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

हेही वाचा – पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या पदरी निराशाच !

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांना इथेनॉल, साखर, उपपदार्थ दरवाढीमुळे चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे कारखान्यांनी या हंगामात आमच्या मागणीप्रमाणे ऊस दरवाढ केली पाहिजे. मतमोजणी झाल्यानंतर आम्ही आंदोलनाला सुरुवात करू
. – धनाजी चुडूमुंगे, अध्यक्ष, आंदोलन अंकुश शेतकरी संघटना.