मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपात २५०हून अधिक जागांवर एकमत झाल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र सर्वकाही आलबेल नाही. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यात जागावाटपावरून मतभेद सुरू आहेत. शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेला असून यात उद्धव ठाकरे यांनीही मध्यस्थी केली आहे. जागांबाबत खेचाखेची होते, पण तुटेपर्यंत ताणू नये हे लक्षात ठेवले पाहिजे, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप सुरू असून ३०-३५ जागांवर रस्सीखेच सुरू आहे. विशेषत: विदर्भातील जागांवरून हा वाद आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की नाना पटोले असतील तर यापुढे जागावाटपाची बैठकच होणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने (ठाकरे) घेतली. विशेषत: संजय राऊत आणि नाना पटोले वाद झाला असून उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारले असता, एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटले तरी जागांबाबत थोडी खेचाखेची होते, पण तुटेपर्यंत ताणायचे नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवले पाहिजे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. फार मोठा वाद झाला नसल्याचे सांगताना माझ्या कानावर येईल, तेव्हा बोलेन दोन-तीन दिवसांत किंवा उद्या जागावाटप संपू शकतो. तो विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळा आहे. याआधी आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत. लोकसभेला जागा कमी होत्या, विधानसभेला जास्त होत्या. त्यामुळे जागावाटपाबाबत चर्चा होईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>विधान परिषदेच्या पाच माजी आमदारांना विधानसभेचे वेध, वेगवेगळ्या पक्षांकडून तयारी सुरू

संजय राऊत नाना पटोले यांच्यात वाक्युद्ध

● संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत बोलताना २०० पेक्षा अधिक जागांवर आमची सहमती आहे. उरलेल्या जागांचा पेच निर्माण झाला आहे.

● या संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाळ तसेच काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशीही आपण आज चर्चा केली. राहुल गांधीशीही चर्चा करणार असल्याचे सांगितले.

● काँग्रेसला यादी दिल्लीला पाठवावी लागते. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत, असा टोला राऊत यांनी पटोले यांना लगावला.

● विदर्भ स्वतंत्र संस्थान नसून अमरावती, रामटेकची जागा काँग्रेसला दिली आता आमच्याही अपेक्षा असल्याचे सांगितले.

● याला प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांनी संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे असतील. त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर बोलावेच लागत नाही. त्यांनी केलेला निर्णय अंतिम असेल, पण आमच्या पक्षात राजशिष्टाचार आहे. आमचे वरिष्ठ दिल्लीत आहेत, त्यांना सगळी माहिती द्यावी लागते, असा खोचक टोला लगावला.