एजाज हुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : सोलापूर विमानसेवेच्या प्रश्नावर सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी पाडून टाकण्याचा आणि ५२ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेला सिध्देश्वर साखर कारखाना बंद पाडण्याचा डाव आखण्यात आला आहे. या माध्यमातून कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असताना आता काडादी यांच्या पाठीशी ताकद उभी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कुटुंबीयही धावून आले आहे. या घडामोडींमागे आगामी सोलापूर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची समीकरणे दडली आहेत, असे मानले जाते.

होटगी रस्त्यावरील जुन्या आणि आकाराने खूपच छोट्या अशा विमानतळाच्या शेजारची सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना गेली ५२ वर्षे कार्यरत आहे. तेथेच कारखान्याच्या ३८ मेगावाॕट सहवीज निर्मितीचा प्रकल्पही आहे. या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी विमानसेवेला अडथळा ठरते म्हणून ही चिमणी पाडून टाकण्याची मागणी होत आहे. त्यासाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून आंदोलन होत आहे. मात्र दुसरीकडे सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडली तर कारखाना कायमचा बंद होण्याच्या भीतीमुळे कारखान्याचे तब्बल २७ हजार शेतकरी सभासद आणि कामगार एकवटून चिमणी पाडायला विरोध करीत आहेत. त्यांचेही प्रतिआंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्यात सिध्देश्वर कारखान्याची चिमणी वाचवावी आणि सोलापूरच्या जुन्या विमानतळाला भक्कम पर्याय असलेल्या बोरामणी आंतरराष्ट्रीय काॕर्गो विमानतळाची उभारणी लवकर करावी, या मागणीसाठी सिध्देश्वर कारखान्याच्या शेतकरी सभासद व कामगारांनी विराट मोर्चाही काढला होता. या प्रश्नावरील आंदोलन व प्रतिआंदोलनाच्या निमित्ताने सिध्देश्वर कारखान्याचे धर्मराज काडादी आणि भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला आहे. वीरशैव लिंगायत समाजाचे स्थानिक नेतृत्व करण्याच्या ईर्षेतून हा सुप्त संघर्ष पाहायला मिळतो.

हेही वाचा… कसबा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण?

विमानसेवा आणि सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणी प्रश्नावर आमदार विजय देशमुख यांचा अपवाद वगळता भाजपचे जिल्हाध्यक्ष, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, शिवशरण पाटील, आमदार सुभाष देशमुख यांचे बहुतांशी समर्थक यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, दोन्ही काँग्रेसचे स्थानिक नेते, दोन्ही शिवसेना आदी सर्वपक्षीय समर्थन काडादी यांच्या बाजूने उभे राहिले आहे. काडादी यांनीही आयुष्यात प्रथमच आक्रमक पवित्रा घेत आमदार विजय देशमुख यांचा थेट नामोल्लेख टाळत नेतृत्व बदलण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा… भाजप नेत्यांच्या खेळीने मुंडे भगिनी अस्वस्थ

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या कुटुंबीयही आता काडादी यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहे. आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सिध्देश्वर काडादी घराण्याचे सामाजिक, औद्योगिक, सहकार, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून उल्लेखनीय योगदान आहे. सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणीला दुसरा पर्याय नाही. परंतु जुन्या विमानतळाला बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मजबूत पर्याय आहे. पण तरीही विमानसेवेच्या नावाखाली सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी काही पुढारी टपले आहेत. त्यातून कोणाच्या घराण्याचा फायदा साधता येईल तर कोणाच्या खासगी साखर कारखाला ऊस मिळेल. याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात वनक्षेत्र कमी झाले आहे, तर मग सोलापुरात काय अडचण आहे ? नगर जिल्ह्यात माळढोक पक्ष्याच्या संवर्धर्नासाठी सर्वाधिक वनक्षेत्र आरक्षित असतानाही विमानसेवा सुरू व्हावी म्हणून वन खात्याच्या जमिनीचा तिढा आम्ही सर्वांनी मिळून सोडविला. पण सोलापुरात दोन्ही खासदार आणि बहुसंख्य आमदार सत्ताधारी भाजपचे असूनही बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनक्षेत्र जमिनीचा तिढा का सुटत नाही, असा प्रश्नांची आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केंद्रात योग्य पाठपुरावा केल्यास बोरामणी विमानतळाच्या रखडलेली उभारणी मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा… पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदल मोहिमेत धुसफूस

यावेळी आमदार पवार यांनी काडादी यांच्यासमोर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अडथळे आणणाऱ्या मंडळींचा थेट नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेचे बाण आमदार विजय देशमुख आणि लोकमंगल साखर कारखान्याचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांच्या दिशेने गेल्याचे मानले जाते. यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची समीकरणेही दडल्याचेही बोलले जाते.