वर्धा : कर्नाटकातील पराभवानंतर भाजपमध्ये अप्रत्यक्ष का होईना, पण बंंडाचे सूर उमटायला लागले आहेत. कर्नाटकातील पराभव हा निष्ठावंतांना डावलल्याचा परिणाम असल्याचे सांगत भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे, कर्नाटकच्या निकालावर भाजपला आत्मचिंतनाची गरज नसल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच केले होते. आपल्याच प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याला छेद देणारे विधान केचे यांनी केल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. ‘लोकसत्ता’शी बोलताना केचे म्हणाले, कर्नाटकातील भाजपचा पराभव हा निष्ठावंतांना डावलल्याने झाला आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे कामे केलीत, अनेक वर्षे झटून पक्ष उभा केला, अशांना डावलल्याने ही परिस्थिती ओढवली. उपऱ्यांना प्राधान्य दिले. यातून पक्षाने बोध घेतला पाहिजे, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात पक्षाचे रोपटे ते वटवृक्ष अशी वाटचाल पाहणाऱ्या मोजक्यांपैकी केचे एक आहेत. केचे सर्वात निष्ठावंत असल्याचा दावा त्यांचे अनुयायी करतात. आता केचेंचेच पंख छाटण्याचे प्रयत्न होत असल्याचे त्यांचे समर्थक खासगीत सांगतात.

हेही वाचा – रायगडात बैलगाडी स्पर्धांमधून राजकारणाची गुंतवणूक, स्पर्धांना राजकीय आश्रय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी सुमित वानखेडे यांच्या आर्वी मतदारसंघात वाढत्या फेऱ्या केचेंना अस्वस्थ करीत आहेत. या क्षेत्रात कोट्यवधींच्या शासकीय योजना आणतानाच वानखेडे यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून होणारे त्यांचे प्रतिमासंवर्धन भाजप वर्तुळातच नव्हे तर सर्वच पक्षात चर्चेत आहे. बड्या नेत्याच्या आशीर्वादाखेरीज हे शक्य नसल्याचे सर्वच सांगतात. दोन दिवसांपूर्वी आर्वी तालुक्यातील तळेगावच्या जाहीर सभेत बोलताना आ. केचे यांनी प्रथमच वानखेडेंविरोधात अप्रत्यक्ष तोफ डागली. ते म्हणाले, नमस्कार केल्याने कोणी नेता होत नाही. जनतेसाठी झटावे लागते. आम्ही पहाटेपासून मतदारसंघात झटतो. या मतदारसंघात आता भाजपची हिरवळ दिसत आहे. या आयत्या हिरवळीवर उड्या मारू नका. २०२९ पर्यंत थांबा. नंतर आम्हीच तुम्हाला मतदारांपर्यंत घेऊन जाऊ. कोणी चार दिवसांचे येतात आणि गप्पा झाडतात. गेल्या निवडणुकीतही तेच घडले. आताही तेच घडत आहे. त्याला आम्ही पूरून उरतो, अशा शब्दात आ. केचे यांनी ठणकावले. या इशाऱ्यास वेगळी पार्श्वभूमी आहे.

हेही वाचा – काँग्रेससाठी पायलट यांच्यापेक्षा शिवकुमार अधिक बलाढ्य!

गत विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू सुधीर दिवे यांनी उपक्रमांचा धुमधडाका लावला होता. निवडणूक येताच उघडपणे तिकिटावर दावा केला होता. पण, केचेच लढले व विजयी झाले. पक्षात केचे हे गडकरी समर्थक समजले जातात. पूर्वी एका निवडणुकीत केचेंच्या प्रचारात गडकरी म्हणाले हाेते की, केचेंना निवडून दिल्यास त्यांना मंत्री करतो. केचेंवर गडकरींचा भक्कम हात तर आता वानखेडेंना फडणवीस यांचे समर्थन लाभत आहे. पक्षातील फडणवीस यांचे स्थान लक्षात घेऊन केचेंना पाया खालची वाळू सरकत असल्याचे जाणवले व त्यापोटीच त्यांनी चार अनुभवाचे बोल सुनावल्याची चर्चा आहे. भाजप नेतृत्वाने भाकरी फिरवण्याचे सूत्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वीकारल्याचा इतिहास आहे. आर्वी मतदारसंघात हे सूत्र अंमलात येणार, असे सांगितले जात आहे. म्हणून कर्नाटकातील प्रयोग आर्वीत न करण्याचा सल्ला देण्याचे धारिष्ट्य केचेंनी दाखविले आहे. हे धारिष्ट्य आणखी कमाल पातळी गाठते की पाण्याचा बुडबुडा ठरते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defeat in karnataka due to letting down loyalists says bjp mla dadarao keche print politics news ssb