Delhi Election 2025 Rahul Gandhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या प्रचारादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार टीका झाली. आगामी काळात हे दोन्ही पक्ष व त्यांचे नेते इंडिया आघाडीच्या एखाद्या बैठकीला उपस्थित राहतील तेव्हा हीच टीका गुंतागुंतीची ठरू शकते. या टीकेमुळे भविष्यातील आघाडीसमोर अडचणी येऊ शकतात. परंतु, ही टीका दोन्ही बाजूंसाठी अपरिहार्य होती. दिल्लीत पुन्हा एकदा सत्ता मिळवणे हे काँग्रेसचे धोरण आहे. १९९८ ते २०१३ अशी सलग १५ वर्षे काँग्रेसकडे दिल्लीची सत्ता होती. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीची कमान दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे आपकडून सत्ता परत मिळवण्यासाठी १२ वर्षे राजधानी ज्यांच्या हाती होती अशा पक्षावर व त्यांच्या नेत्यांवर टीका करणं, त्यांनी केलेल्या चुका जनतेसमोर मांडणं काँग्रेससाठी क्रमप्राप्तच होतं. त्यानुसार काँग्रेसने निवडणुकीत निकराने लढा दिला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १४ जानेवारी रोजी दिल्लीतील त्यांच्या पहिल्या प्रचारसभेत आप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. परंतु, प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी गिअर बदलला. तसेच त्यांनी थेट केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केजरीवाल हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं वक्तव्य केलं. दिल्लीच्या मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळालं नसलं तरी राजधानीत त्यांचा मतदारवर्ग आहे. अजूनही काँग्रेसला राजधानीत ३२ ते ३८ टक्के मते मिळू शकतात, असे त्यांच्या नेत्यांना वाटते. मात्र, आपने काँग्रेसचा मतदारवर्ग आपल्या बाजूने वळवला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
काँग्रेससमोर ‘आप’कडे गेलेला मतदारवर्ग परत मिळवण्याचं आव्हान
काँग्रेसने या निवडणुकीत सातत्याने आपवर हल्लाबोल करण्यामागची कारणे एका काँग्रेस नेत्याने इंडियन एक्सप्रेससमोर विषद केली. ते म्हणाले, भाजपाने काँग्रेसचा मतदार आपल्याकडे वळवलेला नाही. त्यांचा वेगळा मतदारवर्ग आहे, जो मर्यादित आहे. तसेच फार प्रयत्न करून त्यातील खूपच कमी लोक काँग्रेसकडे वळू शकतात. मात्र आपला मतदान करणारे नागरिक हे २०१५ पर्यंत काँग्रेसला मतदान करत होते. आम्हाला आमचा बेस परत मिळवायचा आहे. आपकडे गेलेला आमचा मतदार परत आणायचा आहे.
केजरीवालांकडून गांधी कुटुंब लक्ष्य, राहुल गांधींचाही संताप
मात्र, आप नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात थेट गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. ही बाब काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला पटलेली नाही. तसेच आपने अलीकडेच बेईमान नेत्यांची कथित यादी प्रसिद्ध केली, त्यात भाजपासह काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो देखील होते. तेव्हापासून राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्या राजकारणाच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काँग्रेस नेत्यांनी भाजपा व आपला दलितविरोधी व आरक्षणविरोधी म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, “यांच्या (भाजपा व आप) पक्षांमध्ये, पक्षाच्या धोरणांमध्ये दलित, मागासवर्गीय व धार्मिक अल्पसंख्याकांना कुठलेही स्थान नाही. त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वात वंचित घटकांना स्थान दिलेलं नाही. त्यामुळे हे लोक भविष्यात वंचितांना सत्तेत वाटेकरी करून घेणार नाहीत.
“काँग्रेसच्या पुनरागमनासाठी आपला राजकीय समीकरणांमधून काढणे गरजेचे”
एका काँग्रेस नेत्यांने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की भाजपा व काँग्रेस हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. आम्हाला एकमेकांची ताकद व दुबळ्या बाजू माहिती आहेत. मात्र, अलीकडच्या काळात आप ही नवी ताकद उदयास आली आहे. अशा स्थितीत काँग्रेसला सत्तेत परतण्यासाठी आपला या राजकीय समीकरणातून बाहेर काढावे लागेल.