Delhi Vidhan Sabha Election Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या अनेक बलाढ्य नेत्यांचा पराभव झाला आहे. यात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा समावेश आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपा उमेदवार पर्वेश वर्मा यांनी केजरीवालांचा तीन हजार १८६ मताधिक्याने पराभव केला. तर जंगपुरा मतदारसंघातून भाजपाचे तरविंदर सिंह मारवाह यांनी सिसोदिया यांना पराभूत केलं. याआधी अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक जिंकली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मात्र, यावेळी भाजपाचे पर्वेश वर्मा यांनी त्यांना पराभवाची चव चाखायला लावली आहे. विशेष बाब म्हणजे २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत आपचे प्रमुखांनी याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव करून दिल्लीची सत्ता काबिज केली होती. २०१५ मध्ये केजरीवाल यांनी ६४.१४% मताधिक्य मिळून ही जागा जिंकली. तर २०२० मध्ये या मतदारसंघात त्यांना ६१.१% मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघात तिरंगी लढत झाली. काँग्रेसने या जागेवरून काँग्रेसने या जागेवरून शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली होती.
आणखी वाचा : Mohan Singh Bisht: मुस्लिमबहुल मुस्तफाबादमधून विजयी होणारे भाजपा नेते मोहन सिंह बिश्त कोण आहेत?
मात्र, अटीतटीच्या भाजपाचे उमेदवार पर्वेश वर्मा विजयी झाले. केजरीवाल यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर संदीप दीक्षित हे मतमोजणीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले पर्वेश वर्मा यांच्या गळ्यात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते. पक्षाने जर मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाचा विचार केला, तर मला ते आवडेल, असं वर्मा म्हणाले होते. ८ फेब्रुवारीनंतर पक्ष जो निर्णय घेईल, ते मला मान्य असेल, असंही वर्मा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं होतं.
मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा ‘आप’चा आरोप
नवी दिल्लीतील मतदासंघात अरविंद केजरीवाल आणि परवेश वर्मा यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. भाजपाने मतदारसंघातील याद्यांमध्ये फेरफार केली आणि आचारसंहिता लागू करताना मतदारांना आकर्षक भेटवस्तू दिल्या, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता. मात्र, पक्षाने ४७ वर्षीय पर्वेश वर्मा यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. पक्षासाठी आक्रमक प्रचार करताना वर्मा यांनी सत्ताधारी आम आदमी पार्टीला लक्ष केलं. त्यांनी दिल्लीतील मतदारांना नवनवीन आश्वासनंही दिली होती.
यमुना नदीला साबरमती नदीच्या काठासारखे नदीकाठ तयार करणे, झोपडपट्टीवासीयांना घरे आणि त्यांना पायाभूत सुविधा पुरवणे, राज्यात ५० हजार सरकारी नोकरभरती करणे, तसेच प्रलंबित विकासकामे पूर्ण करून राष्ट्रीय राजधानीला प्रदूषणमुक्त करणे, अशा आश्वासनांचा यामध्ये समावेश होता. प्रचारादरम्यान, भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी वर्मा यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानलं होतं. ‘दिल्ली का मुख्यमंत्री कैसा हो, पर्वेश वर्मा जैसा हो’, असा जयघोष भाजपाच्या सभांमध्ये तसेच प्रचाररॅलीत धुमत होता.
भाजपाचे पर्वेश वर्मा कोण आहेत?
पर्वेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. त्यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्ली विधानसभा अध्यक्ष योगेंद्र शास्त्री यांचा पराभव केला होता. मे २०१४ मध्ये वर्मा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा खासदार झाले. १ सप्टेंबर २०१४ पासून पर्वेश वर्मा हे दिल्लीतील नगरविकास स्थायी समितीचे सदस्य. अहवालानुसार, ७ नोव्हेंबर १९७७ रोजी जन्मलेल्या पर्वेश वर्मा यांचे एकूण उत्पन्न १०.७२ कोटी रुपये आहे. त्यांनी एमबीएपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळवला होता विजय
गेल्या तीन दशकांपासून पर्वेश वर्मा हे भाजपाबरोबर जोडले गेले आहेत. त्यांनी दोनवेळा पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. याशिवाय ते मेहरौलीचे आमदारही राहिलेले आहेत. गेल्या २७ वर्षांपासून भाजपाला दिल्लीत सत्तेची चव चाखता आली नव्हती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी पर्वेश वर्मा यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपवली. जानेवारीच्या मध्यापासून वर्मा यांनी दिल्ली भाजपाच्या प्रचाराला सुरुवात केली होती. त्यापूर्वी काही आठवडे त्यांनी नवी दिल्लीतील झोपडपट्टीतील मतदारांना भेट देऊन त्यांच्या गरजा जाणून घेतल्या होत्या.
त्यावेळी वर्मा म्हणाले होते, “झोपडपट्टी बहुल भागातील अनेक नागरिकांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. त्यांना वीजबिलही मोफत नाही हे मी उघडपणे सांगेल. ज्यांना स्वच्छ पाणी आणि शून्य वीजबिल येत असेल, त्यांनी अरविंद केजरीवाल यांना मतदान करावं. तर ज्यांना अजूनही समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्यांनी कृपया भाजपाला मतदान करावं. आमचं सरकार सत्तेत आल्यास दिल्लीतील सर्व मतदारसंघातल्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या जाईल”, असं आश्वासनही वर्मा यांनी दिलं होतं.
‘आप’ने केला होता मते विकत घेतल्याचा आरोप
डिसेंबर २०२४ मध्ये आम आदमी पार्टीने परवेश वर्मा यांच्यावर मते विकत घेण्याचा आरोप केला होता. महिलांना प्रत्येकी ११०० रुपये देऊन वर्मा यांनी मते विकत घेतली, असं आपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना वर्मा म्हणाले होते की, मी फक्त माझ्या वडिलांच्या एनजीओद्वारे गरीब लोकांना मदत करत आहे. आपचे नेते माझ्याविरोधात खोटा अपप्रचार करत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. वर्मा यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील खर्चाचा मुद्दाही उपस्थित केला होता. भाजपा नेत्यांनी त्याला केजरीवालांचा ‘शीशमहाल’ म्हणून संबोधलं होतं.
हेही वाचा : Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी? कोण आहेत प्रताप सरनाईक?
निवडणूक जिंकल्यानंतर पर्वेश वर्मा काय म्हणाले?
निवडणूक जिंकल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पर्वेश वर्मा म्हणाले, “या विजयाचे श्रेय मी पंतप्रधान मोदींना देतो आणि दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. दिल्लीतील मतदारांचे , लाखो कष्टकरी कामगारांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार… हा खरोखरच त्याचा विजय आहे. नव्याने स्थापन होणारे सरकार राजधानीच्या विकासासाठी काम करेन”. मुख्यमंत्रिपदाबद्दल माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, “आमच्या पक्षात विधिमंडळ पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवतो आणि नंतर पक्ष नेतृत्व त्याला मान्यता देते. त्यामुळे पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असेल.”
पर्वेश वर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार?
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर पर्वेश वर्मा यांचे पक्षातील महत्व आणखीच वाढलं आहे. दिल्लीतील भाजपा नेते आणि कार्यकर्ते त्यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानत आहेत. निवडणूक प्रचारातही भाजपा कार्यकर्त्यांनी ‘दिल्ली का मुख्यमंत्री कैसा हो, पर्वेश वर्मा जैसा हो’, अशा घोषणा दिल्या होत्या. दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर वर्मा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यांच्याशिवाय, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपाकडे अनेक चेहरे आहेत. ज्यामध्ये बांसुरी स्वराज, मनोज वाजपेयी आणि रमेश बिधुरी यांचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.