BJP vs AAP Delhi Election 2025 : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७० पैकी तब्बल ४८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं, त्यामुळे जवळजवळ तीन दशकांनंतर दिल्लीच्या तख्तावर आता भाजपाचा झेंडा फडकणार आहे. या विजयामुळे विविध सामाजिक गटांमध्ये पक्षाची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढली आहे. परंतु, राजधानीतील भाजपाचा विजय हा केवळ एक योगायोग नव्हता, तो एक काळजीपूर्वक नियोजन केलेल्या रणनीतीचा परिणाम होता, ज्यात योग्य उमेदवारांची निवड, लक्ष केंद्रित केलेले प्रचार आणि चांगला पर्याय म्हणून केलेल्या मजबूत दाव्यांचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीची तयारी करताना भाजपाने राजधानीत यशस्वीरित्या एक व्यापक सामाजिक युती उभारली, ज्याला उच्चवर्णीयांसह इतर मागासवर्गीय मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. दुसरीकडे गेल्या दशकभरापासून राजधानीवर वर्चस्व गाजवणाऱ्या आम आदमी पार्टीने दलित आणि मुस्लीम मतदारांचा आधार आपल्याकडे टिकवून ठेवला. मात्र, पक्षाला मिळालेल्या मताधिक्यात किंचित घट झाल्याचं दिसून आलं.

दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना लोकनीती-सीएसडीएस संस्थेने भाजपा आणि आम आदमी पार्टीने बांधलेल्या सामाजिक गठबंधांचे सर्वेक्षण केले होते. यात दोन्ही राजकीय पक्षांनी कोणकोणत्या मतदारांवर अधिक लक्ष्य केंद्रित केलं, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. राजधानीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशाचं श्रेय प्रामुख्याने पक्षाच्या उच्चवर्णीय मतदारांना दिलं जात आहे.

आणखी वाचा : Delhi Election Result 2025 : दिल्लीत दलित मतदारांनी भाजपाला का नाकारलं? यामागचं कारण काय?

राजधानीत वाढली भाजपाची मतं

भाजपाने सर्व जाती समुदायातील विशेषत: ब्राह्मण ६६ टक्के, वैश्य ६६ टक्के, पंजाबी खत्री ६७ टक्के आणि राजपूत ६० टक्के यांसारख्या उच्च समुदायातील मतदारांची सर्वाधिक मते मिळवली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उच्च जातीय समुदायातील लोकांनी भाजपाला पसंती दिली आहे. त्यांचा सततचा पाठिंबा पक्षावरील त्यांचा विश्वास दर्शवतो आहे. भाजपाला गुर्जर आणि यादव वगळता इतर मागासवर्गीय मतदारांचाही ५५ टक्के पाठिंबा मिळाला आहे.

विशेष बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत या मतदारांचा भाजपाला कमी प्रमाणात पाठिंबा होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला पसंती दर्शवली आहे. भाजपाने १५ टक्के मुस्लीम आणि २५ टक्के वाल्मिकी समुदायाचादेखील पाठिंबा मिळवला आहे. परंतु, ही टक्केवारी पक्षाचा पाया कमकुवत करणारी आहे. कारण, या मतदारांची सर्वाधिक पसंती आम आदमी पार्टी आणि काँग्रेसला आहे.

आपच्या मतदारांमध्ये का घसरण झाली?

‘आप’ला समर्थन देणाऱ्या मतदारांमध्ये वाल्मिकी मतदार ६७ टक्के, जाटव मतदार ५९ टक्के आणि मुस्लीम मतदार ६५ टक्के आहेत. या मतदारांवर ‘आप’ची सर्वाधिक भिस्त असल्याने इतर जातींमध्ये पक्षाचे आकर्षण मर्यादित झाले आहे. याचा सर्वाधिक फायदा भाजपाला झाला असून उच्चवर्णीयांच्या मनात त्यांचे स्थान आणखीच मजबूत झाले आहे.

दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. त्यामागचं कारण म्हणजे पक्षातील स्थानिक नेत्यांच्या भूमिका आणि केंद्रीय नेतृत्व असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामुळे सर्व प्रमुख समुदायांमध्ये काँग्रेसला फक्त एक अंकी मते मिळाली आहेत. यामुळेच राष्ट्रीय राजधानीत पक्षाच्या मतांची टक्केवारीही मोठ्या प्रमाणात घसरली आहे.

उच्चवर्णीय, ओबीसी आणि गैर-वाल्मिकी दलित मतदारांच्या महत्त्वपूर्ण गटांकडून भाजपाला मोठे समर्थन मिळालं आहे, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानीच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला असून भाजपाचे मतदार वाढले आहेत. दलित आणि मुस्लीम मतदारांवर ‘आप’चा जास्त विश्वास मोठ्या मताधिक्यावरील भाजपाच्या वर्चस्वाचा सामना करण्यासाठी अपुरा ठरल्याचं दिसून आलं आहे.

राजधानीत भाजपाला कोणकोणत्या समुदायांची मते?

लोकनीती-सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला ६६ टक्के ब्राह्मण मतदार, ६६ टक्के वैश्य मतदार, ६७ टक्के पंजाबी खत्री मतदार आणि ६० टक्के राजपूत मतदारांनी समर्थन दिलं आहे. याशिवाय पक्षाला जाट मतदार ४५ टक्के, गुज्जर मतदार ४४ टक्के, यादव मतदार ४७ टक्के, इतर मागासवर्गीय (ओबीसी) मतदार ५५ टक्के, जाटव मतदार ३४ टक्के, वाल्मिकी मतदार २५ टक्के, दलित मतदार ४१ टक्के, मुस्लीम मतदार १५ टक्के, शीख मतदार ४५ टक्के आणि इतर मतदारांचा ४५ टक्के पाठिंबा मिळाला आहे.

आम आदमी पार्टीच्या पाठिशी कोणकोणते मतदार?

भाजपानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आणि २२ जागांवर पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. ‘आप’ला मिळालेल्या मताधिक्यात २६ टक्के ब्राह्मण मतदार, ३३ टक्के राजपूत, २५ टक्के वैश्य, २६ टक्के पंजाबी खत्री, ४४ टक्के जाट, ४९ टक्के गुज्जर, ५० टक्के यादव मतदार, ३८ टक्के इतर मागासवर्गीय (ओबीसी), ५९ टक्के जाटव, ६७ टक्के वाल्मिकी, ५३ टक्के दलित, ६५ टक्के मुस्लीम, ४५ टक्के शीख आणि ५० टक्के इतर समुदायातील मतदारांचा समावेश आहे. पक्षाला मिळालेली सर्वाधिक मते जाटव, मुस्लीम आणि दलित मतदारांची असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.

हेही वाचा : Political News : भाजपामध्ये अंतर्गत वाद, मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या मंत्र्याला कारणे दाखवा नोटीस; हरियाणात काय घडतंय?

काँग्रेसला दिल्लीत कोणकोणत्या मतदारांचा पाठिंबा?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून पक्षाला सलग तिसऱ्यांदा भोपळाही फोडता आलेला नाही. पक्षाला मिळालेल्या मताधिक्यात पाच टक्के ब्राह्मण मतदार, पाच टक्के राजपूत, सात टक्के वैश्य, पाच टक्के पंजाबी खत्री, पाच टक्के जाट मतदार, पाच टक्के गुज्जर, एक टक्का यादव, पाच टक्के इतर मागासवर्गीय, पाच टक्के जाटव मतदार, नऊ टक्के वाल्मिकी, तीन टक्के दलित, १६ टक्के मुस्लीम, १० टक्के शीख आणि सहा टक्के इतर मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक मुस्लीम आणि शीख मतदार काँग्रेसच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

भाजपाने दिल्लीचे तख्त कसं काबीज केलं?

विशेष बाब म्हणजे, राजधानीत १६ टक्के मुस्लीम मतदारांनी काँग्रेसला पसंती दिली. भाजपालाही १४ टक्के मुस्लीमांनी मतदान केल्याचं समोर आलं आहे. सर्वाधिक ६५ टक्के मुस्लीम मतदारांनी आम आदमी पार्टीला समर्थन दिलं आहे. एकंदरीत भाजपाने ओबीसी आणि उच्चवर्णीय मतदारांच्या बळावरच दिल्लीचं तख्त काबीज केल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे, त्यामुळे काँग्रेस आणि ‘आप’ आगामी काळात भाजपाकडे गेलेल्या या मतदारांना पुन्हा कसं परत खेचून आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.