AAP vs BJP Dalit vote share 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून भाजपाने २७ वर्षांचा सत्तेचा दुष्काळ संपवला. मात्र, दलित मतदारांवर पक्षाला फारसा प्रभाव टाकता आला नाही. राजधानीतील अनुसूचित जातींच्या १२ राखीव मतदारसंघांपैकी आम आदमी पार्टीने तब्बल आठ जागांवर विजय मिळवला, तर भाजपाला केवळ चार जागांवरच विजय मिळवता आला. याशिवाय दिल्लीतील ज्या मतदारसंघात दलित मतदारांची संख्या सर्वाधिक आहे, तिथे भाजपाला फारसं यश मिळालं नाही. राजधानीतील ३६ विधानसभा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, म्हणजेच निम्म्याहून जास्त जागांवर दलित मतदारांचा प्रभाव आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भाजपाला या ३६ जागांपैकी २१ जागांवरच विजय मिळवता आला आहे. त्यापैकी आठ जागा अशा आहेत, जिथे दलित समुदायाचे मतदार २० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत, तर २५ टक्क्यांपेक्षा जास्त दलित मतदार असलेल्या तीनच मतदारसंघात भाजपाला विजय मिळवता आला आहे. त्याचवेळी आम आदमी पार्टीने २० टक्क्यांपेक्षा जास्त दलित मतदार असलेल्या भागात १० जागा जिंकल्या आहेत, तर २५ टक्क्यांपेक्षा जास्त दलित मतदार असलेल्या सात जागांवर ‘आप’ला चांगलं यश मिळालं आहे. त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त होती, तिथे आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने भाजपाचा ३९२ मतांनी पराभव केला आहे.
आणखी वाचा : Political News : भाजपाच्या यशाचं गुपित काय? दिल्लीतील जनतेने केजरीवालांना का नाकारलं?
दलित मतदारांवर आम आदमी पार्टीचा प्रभाव
एकंदरीत दलितांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टीने भाजपापेक्षा जास्त यश मिळवलं आहे. दरम्यान, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने ७० पैकी तब्बल ६२ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता, तेव्हा भाजपाला दलित मतदारांचा प्रभाव असलेल्या ३६ जागांपैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला होता. यामध्ये रोहतास नगर मतदारसंघाचा समावेश होता, जिथे दलित मतदारांची एकूण संख्या १९.९ टक्के इतकी होती. यंदाच्या निवडणुकीतही भाजपाने या मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने अनुसूचित जातींच्या सर्व १२ राखीव मतदारसंघांत दणदणीत विजय मिळवला होता. ज्यामध्ये बवाना, सुलतानपूर मजरा, मंगोलपुरी, करोल बाग, पटेल नगर, मादीपूर, देवली, आंबेडकर नगर, त्रिलोकपुरी, कोंडली, सीमापुरी, गोकलपूर या मतदारसंघाचा समावेश होता. यावेळी भाजपाने मंगोलपुरी, त्रिलोकपुरी, मादीपूर आणि बवाना या राखीव जागांव्यतिरिक्त, वजीरपूर, राजेंद्र नगर, नांगलोई जाट आणि नरेला या जागांवर विजय मिळवला आहे.
कोणकोणत्या मतदारसंघात दलितांची संख्या सर्वाधिक?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सुलतानपूर माजरा विधानसभा मतदारसंघात दलित मतदारांची एकूण संख्या ४४ टक्के आहे. त्यानंतर करोलबाग ४१ टक्के, गोकलपूर ३७ टक्के, मंगोलपुरी ३६ टक्के, त्रिलोकपुरी ३२ टक्के, आंबेडकर नगर ३१ टक्के, सीमापुरी ३१ टक्के, मादीपूर २९ टक्के, कोंडली २७ टक्के, देवली २७ टक्के, बवाना २४ टक्के आणि पटेल नगर मतदारसंघात २३ टक्के दलित मतदार आहेत. या १२ मतदारसंघांव्यतिरिक्त, राजिंदर नगर २२ टक्के, वजीरपूर २२ टक्के, तुघलकाबाद २२ टक्के, बल्लीमारन २२ टक्के, नांगलोई जाट २१ टक्के आणि नरेला विधानसभा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या २१ टक्के आहे.
इतर १८ मतदारसंघांमध्ये दलित मतदारांची संख्या २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्यावेळी भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी केवळ आठ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये रोहिणी मतदारसंघ सहा टक्के दलित मतदार, करावल नगर आठ टक्के, लक्ष्मी नगर नऊ टक्के, गांधी नगर ११ टक्के, बदरपूर १२ टक्के, विश्वास नगर १३ टक्के आणि घोंडा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या १३ टक्के होती. २०१५ मध्ये भाजपाने रोहिणी, विश्वास नगर आणि मुस्तफाबाद मतदारसंघात विजय मिळवला होता. या मतदारसंघातही दलित मतदारांची संख्या कमीच होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने वझीरपूर, राजिंदर नगर, नांगलोई जाट आणि नरेला या राखीव मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे; तर मंगोलपुरी, त्रिलोकपुरी, मादीपूर आणि बवाना मतदारसंघातही पक्षाला चांगलं यश मिळालं आहे.
भाजपाला आजवर दलित मतदारांचा पाठिंबा नाहीच?
१९९३ मध्ये भाजपाने पहिल्यांदा राजधानीत सत्तास्थापन केली होती. त्यावेळी ७० पैकी तब्बल ४९ जागा जिंकून भाजपाने प्रचंड बहुमत मिळवलं होतं. यामध्ये दलित मतदारांचा प्रभाव असलेल्या १३ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला होता. राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार, दिल्लीतील दलित मतदारांवर याआधी काँग्रेसची पकड होती. त्यांच्या पाठिंब्यानेच पक्षाने सलग तीनवेळा राजधानीवर राज्य केलं. १९९८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला राजधानीतील १५ जागांवर विजय मिळवता आला होता. त्यामध्ये दलित मतदारांचा प्रभाव असलेला एकही मतदारसंघ नव्हता. २००३ मध्ये जेव्हा भाजपाने २० जागा जिंकल्या, तेव्हा त्यामध्ये दोन अनुसूचित जाती राखीव मतदारसंघांचा समावेश होता. २०१३ मध्येही भाजपाला दोनच राखीव मतदारसंघांमध्ये विजय मिळवता आला. २०१३ मध्ये दलित मतदारांनी ‘आप’ला पसंती दिली आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर व्हावं लागलं. तेव्हापासून आम आदमी पार्टीने राजधानीतील दलित मतदारांवर आपली छाप सोडली आहे.
दलितांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपाचे प्रयत्न
दरम्यान, दलित मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपाने वेगवेगळे प्रयत्न केले. यंदाच्या निवडणुकीत १२ राखीव मतदारसंघांव्यतिरिक्त भाजपाने बल्लीमारन आणि मतिया महल या दोन जागांवर दलित उमेदवार दिले होते. मात्र, आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी या दोन्ही मतदारांचा दारुण पराभव केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दलित मतदारांचे सर्वेक्षण करणाऱ्या ‘नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित ऑर्गनायझेशन्स’चे अध्यक्ष अशोक भारती यांनी सांगितलं, “भाजपाने दलित मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या होत्या. या योजना लोकप्रिय असल्याने दलित मतदार प्रभावित झाले आणि त्यांनी ‘आप’ची कास सोडून भाजपाला पाठिंबा देण्याचं ठरवलं, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं.”
हेही वाचा : Who is Parvesh Varma : अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे ‘जायंट किलर’ पर्वेश वर्मा कोण आहेत?
काँग्रेसच्या अपप्रचारामुळे हे घडतं आहे – भाजपा
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार संविधानाला अजिबात धक्का लावणार नाही, हे भाजपा नेत्यांनी दलित मतदारांना पटवून सांगितलं. दुसरीकडे अरविंद केजरीवाल हे दलितांना प्रभावित करण्यास अयशस्वी झाले आणि त्यामुळेच आपला सत्तेपासून दूर व्हावं लागलं”, असंही अशोक भारती म्हणाले. राजधानीतील एकमेव राखीव लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायव्य दिल्लीचे भाजपा खासदार योगेंदर चंडोलिया म्हणाले, “बहुतेक राखीव विधानसभा जागांवर भाजपाला अपेक्षित यश न मिळणं हा काँग्रेसने अनेक दशकांपासून केलेल्या खोट्या अपप्रचाराचा परिणाम आहे. शहरातील दलित समुदायामध्ये आम्ही मजबूत आधार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळेच पक्षाला चार राखीव मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. परंतु, हे देखील खरं आहे की काँग्रेसच्या नकारात्मक प्रचारामुळे भाजपा आपल्यासाठी काहीच काम करणार नाही असं दलित समुदायातील मतदारांना वाटतं,” असंही चंडोलिया म्हणाले.
भाजपा दलित मतदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?
“अनुसूचित जाती समुदायातील लोकांसाठी फक्त आमचाच पक्ष काम करतो असं काँग्रेसच्या नेत्यांना भासवायचे आहे. त्यामुळेच ते भाजपाविरोधात खोटा अपप्रचार करीत आहेत. आमचा पक्षही मागासवर्गीयांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे हे सांगण्यात आम्ही आतापर्यंत अयशस्वी झालो, अशी खंत चंडोलिया यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजपाचे सरकार आल्यानंतर आम्ही आंबेडकरांची अनेक स्मारके बांधली आहेत. काही लोकांना हे अजूनही पूर्णपणे समजलेलं नाही. मात्र, या मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहू”, असा विश्वासही योगेंदर चंडोलिया यांनी व्यक्त केला.