दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कोल्हापूर महानगर अध्यक्ष निवडीवरून वाद विरतो न विरतो तोवर आता पदाधिकारी निवडीवरून आजरा तालुक्यात चक्क कार्यालयालाच टाळे ठोकले आहे. नाराज कार्यकर्त्यांचा सारा रोख उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर दिसून येत आहे.

गेल्या दहा वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा प्रभाव ठळकपणे दिसू लागला आहे. मोदी लाट आल्यानंतर कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या दोन जागांवर कमळ फुलले होते. पण मागील निवडणुकीमध्ये या जागा टिकवणे भाजपला अशक्य झाले. विशेष म्हणजे याच काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोल्हापुरात होते. त्यांच्याकडे महसूल सह अन्य महत्वाची खाती होती.

आणखी वाचा-एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात लोकसभेसाठी भाजप आग्रही?

याच काळामध्ये जिल्ह्यात शिवसेनेचे सहा व भाजपचे दोन आमदार असे मोठे संख्याबळ महायुतीकडे होते. पाच वर्षे मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष असतानाही भाजपला संघटना विस्तारण्यात, निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण करण्यात, पक्षाचा पातळीवर ताकद निर्माण करण्यात अपयश आले. पुढे कोल्हापुरातील वातावरण पाहून चंद्रकांत पाटील यांना कोथरूड, पुणे येथे निवडणूक लढवावी लागली. तेव्हा पासून त्यांचे कोल्हापूरकडे बरेच दुर्लक्ष झाले आहे. आठवड्यातून एकदा यायचे आणि जुजबी कार्यक्रम, गाठीभेटी उरकायच्या यावर त्यांचा भर राहिला आहे. यामुळे पक्ष वाढणार कसा असा प्रश्न आहे.

अशा धामधुमीतच पक्षाची सूत्रे नव्याने आलेल्या लोकांकडे गेली आहेत. त्यातून जुने आणि उपरे अशा वादाला तोंड फुटले आहे. कोल्हापुरातील भाजपमध्ये राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांच्यासह महाडिक परिवाराने लक्ष घातले आहे. अलीकडे पक्षाचा कार्यक्रम, नियोजनामध्ये त्यांचा वावर वाढला आहे. दहीहंडीसाठी जमणारे त्यांचे समर्थक भाजपच्या आंदोलन, कार्यक्रमात का दिसत नाही, अशी कुजबूज भाजप कार्यालयात सुरू असते. त्याला आतील आणि बाहेरचे या वादाची किनार आहे.

आणखी वाचा-कर्नाटक : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर, बड्या नेत्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका!

आजरा, चंदगड मधील धुसफूस

जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर होताच सुप्त असणारे मतभेद उसळून आले आहेत. आजरा तालुक्यात असाच निष्ठावंत आणि उपरे वाद झडत आहे. सहकार क्षेत्रात प्रभाव असलेले अशोक चराटी यांचे समर्थक अनिरुद्ध केसकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यावर संताप व्यक्त करीत तालुक्यातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी चक्क पक्ष कार्यालयाचा फलक उतरवला. दरवाजाला टाळे लावले. त्यावरील कमळ चिन्ह पुसून काढत संताप व्यक्त केला. माजी तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, अरुण देसाई, प्रा. सुधीर मुंज,नाथ देसाई आदींनी ‘ भाजपचे ४० वर्ष काम करत असतानाही निष्ठावान कार्यकर्त्यांना स्थान न देता आयारामांना महत्त्व दिले जात आहे. त्यांच्याकडून पक्ष हायजॅक केला जात आहे,’ असा आरोप केला. तथापी , आरोप करणारे अनेक वर्ष काम करताना अन्य कार्यकर्त्यांना स्थान देत नव्हते. त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा असल्याने पक्ष वाढला नाही, असे दुसऱ्या बाजूकडून सांगितले जात आहे. तर, चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपशी एकनिष्ठ शिवाजी पाटील हा एकनिष्ठ उमेदवार दिला असता तर जिंकलो असतो. त्यांचा पराभव होण्यामागे कोण आहे? असा प्रश्न उपस्थित करून पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे बोट दाखवून आजरा तालुक्यातील भाजपचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असल्याने त्यांचा काटा काढण्यासाठी जिल्ह्यातून राजकीय खेळी झाल्याचा आरोपही आता या निमित्ताने उघडपणे होऊ लागला आहे.

आणखी वाचा-‘भाजपा, संघाचा बजरंग दलाशी दुरान्वये संबंध नाही’ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचे विधान!

कोल्हापुरातील वादाची जखम

कोल्हापूर शहरात माजी अध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव,अशोक देसाई व विजय जाधव हे चौघेच पक्ष चालवतात,असा आक्षेप घेतला जातो. चंद्रकांत पाटील हे त्यांना पाठीशी घालतात, असा आरोप समाज माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांनी उघडपणे केला होता. तथापि पक्षाच्या एका गटाच्या म्हणण्यानुसार हे चौघेच जास्त सक्रिय असतात, अशी मांडणी झाली होती. अलीकडे, नवीन अध्यक्ष विजय जाधव यांच्याकडे सूत्र सोपवली आहेत. महानगर अध्यक्ष निवडीमध्ये निष्ठावंत अजित ठाणेकर यांना डावल्याने अंतर्गत नाराजी आहे. ठाणेकर हे नितीन गडकरी यांचे समर्थक असल्याने त्यांचा काटा काढला गेला असल्याचाही पक्षांतर्गत आरोप होत आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव हे महिला पदाधिकाऱ्यांना अपमान वागणूक देत असल्याची तक्रार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करत दाद मागण्यात आली होती. याबाबत निवेदनही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पाठवले होते. तेव्हा पाटील यांनी हा घरातला वाद घरातच मिटवू, चार दिवसात बसून बोलू ,असे आश्वस्त केले होते. त्याला वर्ष होत आले तरी याबाबतची बैठक झाली नसल्याने या वादाची जखम अजूनही ओली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disagreement within bjp in kolhapur office was locked by officials print politics news mrj
Show comments