नगरः महायुतीतील घटक पक्षांचा पहिलाच मेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा होण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून घेतली गेली. या पूर्वतयारीच्या बैठकीतच घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी बाहेर पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीत फुटीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजितदादा गट) आमदारांची संख्या जिल्ह्यात अधिक असली तरी सर्व शक्तिकेंद्र मंत्री विखे यांच्याकडेच एकवटलेली आहेत. त्यातून घटक पक्षांऐवजी भाजपमधील नेत्यांकडून थेट विखे यांना लक्ष्य करण्यात आले. परिणामी आगामी निवडणुकीपूर्वी पक्षाअंतर्गत असंतोष थोपवण्याचे आव्हान विखेंपुढे उभे राहणार असल्याचेही मेळाव्यातून स्पष्ट झाले. त्यातून पुन्हा एकदा विखे यांच्या कार्यपद्धतीनुसार ते विरुद्ध इतर सर्व असे चित्र भाजपमध्येही पहावयास मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – हितेंद्र ठाकूर यांचे सूर जुळले !

महायुतीच्या मेळाव्यात भाजपपेक्षा मंत्री विखे आयोजकाच्या भूमिकेत होते. त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे हे पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी साखर, डाळ वाटपाची ‘मतपेरणी’ करत त्यांच्याविषयीचे नाराजीचे वातावरण दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यात नगर दक्षिण आणि शिर्डी असे दोन मतदारसंघ आहेत. त्यातील शिर्डी मतदारसंघ राखीव आहे. महायुतीच्या जागा वाटपात नगर दक्षिण भाजपच्या तर शिर्डीची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक आहे. शिर्डीमधून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, शिर्डीतील उमेदवारीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले इच्छुक आहेत.

मेळाव्यात जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी भाजपमधील खदखदीला वाट मोकळी करून दिली. लोकसभा निवडणुकीनंतर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका, अन्यथा लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घ्या, म्हणजे आमचे विधानसभा निवडणुकीचे काम सोपे होईल, असा टोला त्यांनी लगावला. शिवाय मंत्री विखे यांनी दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची शिफारस पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे करावी म्हणजे आमचे काम सोपे होईल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले आमदार राम शिंदे यांनीही गर्भित इशारा मंत्री विखे यांना दिला. पक्षाचे केंद्रीय मंत्री अमित शहा व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता धक्कातंत्र अवलंबले आहे, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये त्याचा अनुभव आला आहे, मागील रांगेत बसणारे आमदार मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे उमेदवारीबाबत कोणी भ्रमात राहू नये, आपणही मागच्या रांगेतून पुढे (विधान परिषद) आलो आहोत. असेच धक्कातंत्र उमेदवारीसाठी लागू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – निवडणुकीच्या तोंडावर टीडीपीला धक्का; जगनमोहन रेड्डींच्या पक्षात मोठ्या नेत्याचा प्रवेश!

या दोन्ही आजी-माजी आमदारांनी व्यक्त केलेल्या खदखदीला पूर्वइतिहास आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विखे पिता-पुत्र भाजपमध्ये आले. विखे यांनी १२-० असे चित्र राहील, असा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात भाजपला जिल्ह्यात मोठा फटका बसला. राम शिंदे, शिवाजी कर्डिले यांच्यासह भाजपच्या पराभूत आमदारांनी एकत्रितपणे पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विखे यांच्या विरोधात तक्रार करत पराभवाला विखे यांना जबाबदार धरले होते. पक्षाअंतर्गत चौकशी नियुक्त करण्यात आली, परंतु घडले उलटेच. त्यानंतर विखे यांचे पक्षातील वजन वाढले आणि त्यांना महसूलमंत्रीसारखे वजनदार पद आणि पालकमंत्रीपद मिळाले.

यथावकाश शिवाजी कर्डिले यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, राम शिंदे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली, मात्र इतर पराभूत उपेक्षितच राहिले. राम शिंदे व राधाकृष्ण विखे यांच्यातील संघर्ष कायमच धुमसता राहिला. भाजपचे विवेक कोल्हे यांनीही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य मिळवत विखे यांच्याकडून त्यांच्याच मतदारसंघातील गणेश साखर कारखाना हिसकावत परतफेड करण्याचा प्रयत्न केला. आणखी एक पराभूत उमेदवार माजी आमदार वैभव पिचड यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. महायुतीच्या पहिल्याच एकत्रित मेळाव्यातून व्यक्त झालेले भाजपअंतर्गत चित्र विखे यांना लक्ष करणारे होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disapproval of vikhe patil functioning from bjp itself in the ahmednagar print politics news ssb
Show comments