चंद्रपूर : दहा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सतत निष्ठा आणि पक्ष बदलवणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन चंद्रपुरातून उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये गटबाजी बघायला मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांचा गट उघडपणे जोरगेवार यांचे समर्थन करीत आहे, तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या प्रवेश व उमेदवारीला विरोध केला आहे.

मागील दहा वर्षात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, महाविकास आघाडी, महायुती, असा राजकीय प्रवास केला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षात घेण्यास कोणीच तयार नाहीत. महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांनी त्यांची कोंडी केली आहे.

हे ही वाचा… खासदार भुमरे कुटुंबाकडे मद्यविक्रीचे किती परवाने?

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते जोरगेवार यांच्या विरोधात उभे ठाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडून नकार मिळताच जोरगेवार यांनी अहीर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे निदर्शनास येताच मुनगंटीवारांनी दिल्ली गाठली आणि याला विरोध दर्शवला. विशेष म्हणजे, २००९ मध्ये अहीर यांनीच जोरगेवार यांच्या भाजप प्रवेश आणि उमेदवारीला तीव्र विरोध केला होता, तर मुनगंटीवार यांनी त्यावेळी जोरगेवार यांनाच उमेदवारी द्यावी, यासाठी एकाकी किल्ला लढविला होता. दोन नेत्यांतील भांडणात नागपूरचे नाना शामकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली असून तेव्हा विरोध करणारे अहीर आज जोरगेवार यांच्या समर्थनात, तर त्यावेळी समर्थन करणारे मुनगंटीवार आज विरोधात उभे ठाकले आहेत.

पक्षाचे सामान्य कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांना उमेदवारी द्यावी, आयात आमदाराला उमेदवारी दिली तर सामान्य कार्यकर्ता पक्षासोबत राहणार नाही, भविष्यात कुणी पक्षात येणार नाही, असा युक्तिवाद मुनगंटीवार करीत आहेत. पाझारे यांच्या समर्थनार्थ तसेच जोरगेवार यांना भाजपामध्ये प्रवेश देऊ नये, या मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी धडकले. अहीर समर्थक कार्यकर्ते व पदाधिकारी मादत्र जोरगेवार यांचे उघडपणे समर्थन करीत आहेत.

हे ही वाचा… भाजप विदर्भातील आणखी तीन विद्यमान आमदारांना डच्चू देणार

भाजपमध्ये प्रथमच अशाप्रकारे विरोध व गटबाजी बघायला मिळत आहे. यामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत. निवडणूक जिंकणे याला महत्त्व देण्यासोबतच तळागाळातील गरीब कार्यकर्त्याला देखील महत्त्व द्या, अशी विनवणी कार्यकर्ते नेत्यांना करीत आहेत.