सुहास सरदेश्मुख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजीनगर: जलयुक्त शिवार योजनेत नदीचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी जलक्षेत्रात काम करणारी मंडळी भाजप समर्थक मंडळी आता जायकवाडी जलाशयात ८.६ अब्ज घनफूट पाणी सोडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने कमालीची नाराज आहे. विशेषत: उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर व नाशिक जिल्ह्यातील नेत्यांपुढे बोटचेपेपणाची भूमिका घेत असल्याने त्यांच्यावरोधात आता रोष व्यक्त होऊ लागला आहे.

मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने शुक्रवारी गोदावरी पाटबंधारे मंडळ कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. सर्व कायदे नियम मराठवाड्याच्या बाजूने असताना समन्यायी पाणी वाटप होत नसल्याने राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहेत.

आणखी वाचा-गोपीचंद पडाळकर यांची विधानसभा आमदारकीची तयारी सुरू

काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष समन्यायी पाणी वाटपाच्या प्रक्रियेत बोटचेपेपणा समान पातळीवर आल्याची टीका या वेळी मराठवाडा पाणी परिषदेचे नरहरी शिवपुरे यांनी केली. हीच भूमिका फडणवीस यांनी कायम ठेवली तर त्यांना त्याचे राजकीय परिणामही भोगावे लागतील, असे सुनावण्यात आले. जलक्षेत्रात कायद्याचे राज्य हवे म्हणून आम्ही प्रयत्न केले. जलयुक्त शिवार योजनेत उत्साहाने काम केले. आता जलक्षेत्रातच नियम धाब्यावर बसवले जात आहे. कायदा पायदळी तुडवला जात असल्याचे शिवपुरे यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. पाणी अभ्यासक शंकरराव नागरे म्हणाले, ‘ नगर- नाशिकमधील नेत्यांविषयी जलपसंपदा मंत्र्यांचे प्रेम आता अनाकलनीय झाले आहे. त्यांना जपताना मराठवाडा नाराज झाला तरी चालेल अशी फडणवीस यांनी भूमिका घेतली आहे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.’

आणखी वाचा-‘उत्तर प्रदेशमध्ये कोणाशीही युती नको’, काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका; इंडिया आघाडीत बिघाडी?

छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी पाटंबंधारे महामंडळाच्या कार्यालयासमोर शुक्रवारी करण्यात आलेल्या आंदोलनात भारतीय किसान मोर्चाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. शिवपूरे म्हणाले की, आम्ही रचनात्मक काम करणारी कार्यकर्ते मंडळी आहोत. पण सरकारने आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर येण्याची वेळ आणली आहे. ही वेळ येऊ नये अशी इच्छा होती. पण मराठवाड्यावर अन्याय होणार असेल तर त्या विरोधात उतरायला हवे म्हणून हे आंदोलन हाती घेतले आहे.

कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे म्हणाले, ‘ आता पक्ष विरहित आंदोलन करुन जायकवाडीत पाणी सोडून घेण्याची वेळ आली आहे. जसे नगर- नाशिक मधील नेते एकत्र येऊन दबाव आणतात तसा दबाव मराठवाड्यातून निर्माण होत आहे. आम्हीही एकत्र येऊ आणि पाणी सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करू.’

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute between sambhajinagar nagar and nashik increased over water print politics news mrj