सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील युती, भाजपबरोबर मनसेची वाढत चाललेली सलगी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या रूपाने पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीची एकीकरणाची शक्यता अशा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (आरपीआय) आठवले गटामध्ये सध्या अस्वस्थता पसरली आहे. गेली पाच वर्षे भाजपसोबत पुणे महापालिकेमध्ये सत्तेचा वाटेकरी राहिलेल्या ‘आरपीआय’ला आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जागा वाटपामध्ये मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना हे स्पर्धक राहण्याच्या शक्यतेने ‘आरपीआय’ने उठावाची भूमिका घेतली आहे. आरपीआयने महापालिका निवडणुकीसाठी २० जागांचा आग्रह धरत आजवर राजकीय सोय म्हणून ‘आरपीआय’कडे पाहणाऱ्या भाजपला आतापासूनच कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.

‘आरपीआय’चे वेगवेगळे गट कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या वळचळणीला आहेत. त्यापैकी आठवले गट हा गेली पाच वर्षे भाजपसोबत पुणे महापालिकेमध्ये सत्तेचा वाटेकरी होता. मात्र, आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेची युती; तसेच भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात जवळीकता वाढत चालली असताना पुण्यातील ‘आरपीआय’मध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीच्या शक्यतेने भाजपच्यादृष्टीने आरपीआयच्या आठवले गटाचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे पुण्यातील आठवले गटाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी सत्तेत अधिक वाटा मिळण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: डॉ. राहुल पाटील : रचनात्मक कार्यातून राजकारण

गेल्या पाच वर्षांत भाजपने पुण्यातील ‘आरपीआय’ला सत्तेमध्ये वाटा दिला असला, तरी तिकीट वाटपामध्ये काही ठिकाणी दगाफटका केला होता. गेल्या निवडणुकीत ‘आरपीआय’ला भाजपने १६ जागा दिल्या. त्यापैकी एका ठिकाणी भाजपने पक्षाचे दोन एबी फॉर्म दिले. त्यामुळे संबंधित उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. दोन ठिकाणी तांत्रिक कारणांनी उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे प्रत्यक्षात १३ उमेदवारांनी निवडणूक लढविली. त्यापैकी पाच ठिकाणी आरपीआयचे उमेदवार निवडून आले होते.

निवडणुका जवळ आल्या की, जाती-पातीचे राजकारण जोर धरते. तेव्हा सर्वच राजकीय पक्षांना ‘आरपीआय’ कोणता तरी गट हा आपल्या सोबत असावा, याची प्रकर्षाने जाणीव होते. त्यानंतर ‘आरपीआय‘चा गट आपल्या पक्षात सामील झाल्याचे जाहीर करून संबंधित मते जोडण्यावर भर दिला जातो. पुण्यात गेल्या पाच वर्षांत भाजप सोबत आरपीआयचा आठवले गट होता. भाजपनेही त्यांना सत्तेमध्ये वाटा दिला. पाच वर्षे उपमहापौरपद देऊन ‘आरपीआय’ला सन्मान दिला. डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि सुनीता वाडेकर हे आरपीआयचे दोन उपमहापौर झाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे भाजपसोबत असल्याने आगामी महापालिका निवडणुकांमध्येही आठवले गटाला तिकीट वाटपात झुकते माप दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आता यावेळच्या निवडणुकांमध्ये राजकीय चित्र बदलले आहे.

हेही वाचा: खडसे-महाजन वाद विकोपाला; जुन्या प्रकरणांना नव्याने फोडणी

भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना असल्याने महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करताना या पक्षाला भाजपकडून प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे ‘आरपीआय’ला तिकीट वाटपामध्ये आणखी एक स्पर्धक निर्माण झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे यांच्यातील जवळीकता वाढत चालली असताना, नुकतीच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी खासदार गिरीश बापट यांची पुण्यात घेतलेली भेट हीदेखील नवीन राजकीय समीकरणाचे सुतोवाच असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे तिकीट वाटपात मनसेही आल्यास सत्तेतील वाटेकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्यामुळे ‘आरपीआय’मध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disquiet among rpi in wanchit bahujan aghaadi and uddhav thackeray shivsena prakash ambedkar ramdas athavale mns bjp pune print politics news tmb 01
Show comments