जळगाव : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये कोणीच आनंदात नव्हते. खुद्द भाजपचे लोक नाराज होते. एकनाथ शिंदे हे स्वत: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही जागांवर डोळा ठेवून आहेत. भाजपविरोधात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांनाही तेच पैसा पुरवत आहेत, असा आरोप शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजप आणि संघाने आपण कोणाला मोठे करीत आहोत, याचा विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा >>> एकगठ्ठा मतांसाठी ‘साखर’पेरणी; सर्वपक्षीय उमेदवारांच्या यादींमध्ये ‘साखरसम्राटां’चा जोर; २४ कारखानदार रिंगणात

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आदित्य ठाकरे यांची पाचोऱ्यात जाहीर सभा झाली. ठाकरे यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहील, उलट आम्ही आणखी वाढीव रक्कम देऊ. त्यासह ‘सुरक्षित बहीण’ योजना आणू, असे ठाकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला आणि सोयाबीनला भाव नाही. जीएसटी मात्र वाढला आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

‘गद्दारांना गाडण्याची वेळ’

आमचा संविधानाचा, लोकशाहीचा लढा अजून संपलेला नाही. दोन वर्षांपासून न्यायालयात न्याय मिळालेला नाही. गद्दारांना गाडण्याची वेळ आता आली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात हिंदू-मुस्लीमांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न होईल. मात्र, तुम्ही अपप्रचाराला आणि आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. राज्यात आज कोणतेच उद्याोग येण्यास तयार नाहीत. सर्व रोजगार अदानी गुजरातला घेऊन चालले आहेत. त्यामुळे तरुण वर्ग भटकत आहे, आंदोलन करीत आहे, असे ठाकरे म्हणाले.