अकोला : निवडणुका आल्या की जातीय तणाव निर्माण होण्याचे समीकरणच अकोला शहरासह जिल्ह्यात तयार झाले आहे. मे २०२३ मध्ये मोठी दंगल घडल्यानंतर सोमवारी पुन्हा शहरातील हरिहरपेठ भागात किरकोळ कारणावरून दोन समाजामध्ये मोठा वाद झाला. जातीय वादाचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील पडण्याची शक्यता असून याचा राजकीय लाभ व हानी कुठल्या पक्षाला होणार? यावरून चर्चा सुरू झाली आहे. अकोला पश्चिम मतदासंघावर याचा निश्चित परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

अकोला जिल्ह्याच्या एकात्मतेला दंगलीचा कलंक लावण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून सातत्याने होतो. राज्यात अकोला जिल्ह्याची ओळख ही अत्यंत संवेदनशील. गृहविभागाच्या दप्तरी तशी नोंदच आहे. क्षुल्लक कारणावरून हिंसाचाराची ठिणगी पाडत जातीय तेढ आणि तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेकदा झाला. त्यातून राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचा काहींचा खटाटोप असतो. अकोला शहरामध्ये १३ मे २०२३ रोजी समाजमाध्यमावरील एका आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून मोठी दंगल उसळली होती. त्यात एकाचा बळी गेला, तर १० जण जखमी झाले होते.

आणखी वाचा-नवी मुंबईत महायुतीला धक्का; विजय नहाटांच्या हाती तुतारी ?

या प्रकरणी पोलिसांनी १५० हून अधिक आरोपींना अटक केली होती. त्यानंतरही जुने शहर भागात अनेक वेळा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच आता अवघ्या महिना-दीड महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुने शहरातील हरिहरपेठ भागात ऑटो व दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून अशांतता पसरली. दगडफेक व तीन वाहनांची जाळपोळ झाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात धुसफूस सुरू होती. तणावाचे प्रसंग देखील उद्भवले. सोमवारी जुने शहरात त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अकोट येथे गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेकीची घटना देखील घडली होती. शहर व जिल्ह्यातील ताण-तणावाच्या घटनांना आता राजकीय रंग चढले आहेत.

संवेदनशील जुने शहर हा भाग अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात सर्वधर्मीय राहत असून मुस्लीम मतदारांची संख्या ३० टक्क्यांवर आहे. ‘अकोला पश्चिम’ तब्बल २९ वर्षांपाासून भाजपचा बालेकिल्ला असून ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे. या मतदारसंघात काँग्रेसने २०१९ मध्ये मुस्लीम उमेदवार देत भाजपला कडवी झुंज दिली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा १२ हजारावर मतांनी भाजपची पीछेहाट झाली. ‘अकोला पश्चिम’ची जागा राखण्याचे आव्हान भाजपपुढे असून काँग्रेस देखील जोमाने कामाला लागली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर जुने शहरातील जातीय तणावाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचे जाणकार सांगतात. याचा विशिष्ट पक्षाला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय समीकरण देखील बदलण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा-हरयाणाच्या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपला बळ

जुने शहर भागात तिसऱ्यांदा अशी घटना घडली. हिंदू-मुस्लिमांनी शांतता राखण्याचे आवाहन आहे. समाजात तेढ निर्माण करणारे असामाजिक तत्व, अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. -आमदार रणधीर सावरकर, प्रदेश सरचिटणीस, भाजप.