नितीन पखाले

भटके विमुक्त, बंजारा व ओबीसींचे नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शिवसेनेच्या मित्रत्वाला ‘जय महाराष्ट्र’ करत रविवारी ‘आम आदमी पार्टी’ (आप) मध्ये प्रवेश केला. हरिभाऊ राठोड यांनी ‘झाडू’ हाती घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे कशी राहतील, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा- निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर पुढे जाऊ – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

हरिभाऊ राठोड यांचा संपूर्ण राजकीय प्रवास अस्थिर राहिला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘आप’मध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत रिपाइंचे तत्कालीन उपाध्यक्ष धनराज वंजारी, यवतमाळचे भाई अमन यांनीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश केला. राठोड हे ‘मास लीडर’ म्हणून ओळखले जातात. भटके विमुक्त, बंजारा, ओबीसी यांच्यासाठी ते कायम आंदोलन, मोर्चे काढत असतात. राठोड यांना कायम सत्तेच्या परिघात राहायला आवडते, अशी टीका त्यांच्यावर नेहमीच केली जाते. यवतमाळमध्ये सध्या आपची काहीही ताकद नाही. मात्र तरुणाई अरविंद केजरीवाल यांची चाहती आहे. त्यामुळे हरिभाऊ राठोड यांनी योग्य नियोजन केल्यास ‘आप ‘ हा भाजप, शिवसेना, काँग्रेसला पर्याय ठरू शकतो. हरिभाऊ राठोड भाजपकडून दोन वेळा खासदार राहिले. मनमोहन सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर सभागृहात गैरहजर राहून राठोड यांनी भाजपला तोंडघशी पाडले. त्यांनतर भाजपने राठोड यांना बेदखल केले.  
त्य

वेळी राठोड यांनी काँग्रेसचा हात धरला. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात राठोड यांनी दावेदारी करू नये म्हणून काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन राठोड यांना विधान परिषदेवर पाठविण्यात मोलाची भूमिका बजावली. राठोड यांच्या सहा वर्षाच्या काळात काँग्रेसला त्यांचा किती फायदा झाला, हा संशोधनाचा विषय ठरावा. २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर हरिभाऊ राठोड हे शिवसेनेत गेले. शिवसेनेचे मित्र पक्ष म्हणून त्यांच्या अनेक सभा त्यावेळी झाल्या. मात्र आता राज्यात पुन्हा सत्तांतर झाले आणि पुढील राजकीय भवितव्यासाठी हरिभाऊ राठोड यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. ‘आप’ने विदर्भासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी दिली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्था , नगर पालिका, महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा निवडणूक ‘आप’ महाराष्ट्रात संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा- विधान परिषदेने विधेयक रोखले तरी मंजूरीत अडथळा नाही, शिंदे सरकार विधान परिषदेत अल्पमतात असल्यानेच पेच

हरिभाऊ राठोड यांचा प्रवास

राजकारणात येण्यापूर्वी राठोड हे मंत्रालयात लेखाधिकारी होते. युतीच्या पहिल्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे खासगी सचिव म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर संघटन कौशल्य आणि वक्तृत्व यामुळे त्यांनी अल्पावधीत स्वतःची छाप पाडली. याच दरम्यान हरिभाऊ राठोड यांनी बंजारा क्रांती दलाची स्थापना केली. त्यांच्यातील कौशल्य हेरून गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने राठोड यांना  यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांचा पराभव करून हरिभाऊ राठोड खासदार झाले. त्यानंतर १९९९ मध्ये भाजपने राठोड यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. मात्र २००४ मध्ये पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. हरिभाऊ राठोड दुसऱ्यांदा खासदार झाले. २००८-०९ च्या दरम्यान अणुकराराच्या मुद्यावरून मनमोहनसिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर ते सभागृहात गैरहजर राहिल्याने भाजपची नाचक्की झाली. पुढे ते काँग्रेसमध्ये गेले व विधानपरिषद आमदार झाले. त्यानंतर शिवसेनेशी घरोबा केला व आता ‘आप’ मधून सुरू केलेली त्यांची नवी ‘इनिंग’ किती प्रभावी ठरते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Story img Loader