यवतमाळ : एकेकाळी कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दशकापासून समाजाचा एकही नेता विधानसभेत न गेल्याने या समाजात सर्वच पक्षांबद्दल असंतोष पसरला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाने तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणबी समाजाच एकसंघ नसल्याची ओरड निकालानंतर होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वणी, यवतमाळ, पुसद, दिग्रस या मतदारसंघामध्ये कुणबी समाजाची मते अधिक आहेत. यापैकी पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ने मराठा समाजाचे शरद मैंद यांना उमदेवार दिली. वणी येथे शिवसेना उबाठाने संजय देरकर यांना उमदेवारी दिली. संजय देरकर हे विजयी झाले. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचे ७५ हजारांवर मतदान आहे. मात्र प्रहार वगळता महाविकास आघाडी किंवा महायुतीने येथे कुणबी उमेदवाराचा विचार केला नाही. १९५२ ते २०२४ पर्यंत नऊ वेळा कुणबी समाजाचा उमेदवार या मतदारसंघात निवडून आला. १९९५ मध्ये राजाभाऊ ठाकरे हे भाजपच्या तिकीटवर निवडून आलेले कुणबी समाजातील अखेरचे आमदार ठरले. त्यानंतर १९९९ पासून आजपर्यंत येथे कुणबी समाजाचा उमेदवार निवडून आला नाही.

आणखी वाचा-अमरावती जिल्‍ह्यातील मातब्‍बर बंडखोरांना मतदारांनी नाकारले

कुणबी समाजाचे मतदार सर्वाधिक असुनही या समाजाला प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने यवतमाळ विधानसभा मतदार संघात कुणबी मराठा समाजाने तिसरा पर्याय म्हणून प्रहाच जनशक्ती पक्षाचे उमेदवार बिपीन चौधरी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्व शाखेय कुणबी समाजाने सहविचार सभाही घेतली. मात्र निकालानंतर कुणबी समाज एकसंघ राहिला नसल्याचे सपष्ट झाले. बिपीन चौधरी हे पाचव्या क्रमांकावर राहिले. त्यांना केवळ दोन हजार १०६ मते पडली. कुणबी समाज यावेळी काँग्रेसच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला. त्यामुळे समाजच संघटित नाही तर समाजाचे राजकारण कसे टिकेल, असा संताप कुणबी समाजाच्या काही नेत्यांनी व्यक्त केला.

बिपीन चौधरी यांनी या निवडणुकीत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायम कटिबद्ध असल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले होते. त्यामुळे मराठा समाज त्यांच्या बाजूने उभा राहिल, अशी अपेक्षा असताना या समाजानेही त्यांना दूर ठेवले. मराठा समाजासाठी प्रतिज्ञापत्र दिल्याने जे कुणबी ओबीसी प्रवर्गात आहेत, त्यांची नाराजी चौधरी यांनी ओढवून घेतल्याचे मतपेटीतून दिसत असल्याची चर्चा कुणबी समाजात आहे. शिवाय या प्रतिज्ञापत्रामुळे ते ओबीसी घटकाच्या मतांपासूनही दुरावल्याचे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदविले आहे. प्रहार पक्षाने कुणबी समाजाची मोट बांधण्याचा केलेला प्रयत्न कुणबी समाजामुळेच फसला, अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे.

आणखी वाचा-Delhi Election 2025 : महाराष्ट्र आणि झारखंडच्या निकालांनंतर केजरीवाल सतर्क; भाजपाला शह देण्यासाठी ‘आप’चा मास्टर प्लान

भाजपच्या मतविभाजनासही यावेळी येथे कोणताच पक्ष उपयोगी पडला नसल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. दिग्रस मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे हेसुद्धा पराभूत झाले. पुसदमध्ये शरद मैंद हेही पराभूत झाले. उमरखेड, आर्णी, राळेगाव हे राखीव मतदारसंघ असल्याने येथे विधानसभेत जाण्यास कुणबी समाजाला प्रत्यक्ष संधी नाही. परंतु, या मतदारसंघातील कुणबी, मराठा, ओबीसी समाजाने यावेळी महायुतीला पंसती दिल्याने अनेक नेत्यांनी या निवडणुकीत कुणबी समाजाचे धृवीकरण करण्यासाठी केलेले प्रयत्न फसल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Existence of kunbi and maratha communities in yavatmal is at stake attempts at polarization in assembly elections failed print politics news mrj