लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, मोदी सरकार आपल्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहे. दरम्यान, भाजपाचे संस्थापक आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वडिलोपार्जित गाव अजूनही महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे कुटुंब आग्रापासून ८० किमी अंतरावर यमुनेच्या तीरावर असलेल्या बटेश्वर गावात राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगींनी आश्वासन दिले, पण ते अद्याप पूर्ण झालेले नाही

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्याच गावात राहणारे ७५ वर्षीय मंगलाचरण शुक्ला म्हणाले, “योगी आदित्यनाथ येथे ८ सप्टेंबर २०१८ रोजी वाजपेयीजींच्या अस्थिकलशाच्या विसर्जनासाठी आले होते आणि त्यांनी महाविद्यालयासह अनेक गोष्टींचे आश्वासन दिले होते. मात्र बहुतांश आश्वासने अपूर्णच राहिली. त्यांना फक्त २५ डिसेंबर त्यांची जयंती आणि १६ ऑगस्ट त्यांची पुण्यतिथी त्यावेळीच फक्त वाजपेयी आठवतात.

शिक्षणमंत्री जवळच्याच मतदारसंघातील आमदार आहेत

अटलबिहारी वाजपेयी यांचे वडील आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी कुटुंबासह ग्वाल्हेरला गेले होते. आणखी एक गंमत म्हणजे आदित्यनाथ सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय हे जवळच्या आग्रा येथील आमदार आहेत. बटेश्वरमध्ये बालपणीची अनेक वर्षे घालवलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी पंतप्रधान झाल्यानंतर एकदाच गावाला भेट दिली. त्यानंतर आग्रा ते इटावा मार्गे बटेश्वर या रेल्वे मार्गासह अनेक प्रकल्प सुरू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महाविद्यालयाची मागणी असली तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. या गावात सात हजार मतदार राहतात. जवळपासची कोणतीही शाळा १० वीच्या पुढे शिक्षण देत नाही आणि शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान १२ किमीचा प्रवास करावा लागतो.

रघुवीर निषाद ज्यांची पत्नी नेकासा देवी गावप्रमुख आहे त्या म्हणतात, “आमच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या सुविधांची गरज आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः वाजपेयींच्या स्मरणार्थ ‘कल्चरल कॉम्प्लेक्स सेंटर’चे उद्घाटन केले होते. त्यामुळे त्यांना आशा आहे की, कॉलेज देखील सरकार लवकर तयार करेल.”

भाजपाचे खासदारही हलगर्जी वृत्तीचे

बटेश्वर हा फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे, जिथून भाजपाचे विद्यमान खासदार राजकुमार चहर (एक जाट) पुन्हा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून ठाकूर रामनाथ सिकरवार यांना तर बसपाने रामनिवास शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, जाट समाजाचे रामेश्वर चौधरी आणि भाजपाचे फतेहपूर सिक्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूलाल चौधरी यांचे पुत्र हेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, ही भाजपासाठी चिंतेची बाब आहे. सिकरवार हे कारगिल युद्धातही लढले आहेत.

हेही वाचाः सरकारी पैशांचा अपव्यय ते नैराश्य; सूरत मतदारसंघातून माघार घेणाऱ्या आठ जणांनी काय कारणे दिली?

फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या इतर चारही विधानसभा जागा (आग्रा ग्रामीण, खेरागड, फतेहाबाद आणि बाह) भाजपाकडे आहेत. बटेश्वर हा बाह विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो, जिथे राणी पक्षालिका सिंह (ठाकूर) आमदार आहेत. गावात एक कौशल्य केंद्र चालवणारे सचिन वाजपेयी म्हणतात, “योगीजींनी जाहीर केलेले महाविद्यालय एका प्रभावशाली नेत्याच्या मालकीचे असलेल्या परिसरात इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. “आमच्या वारंवार विनंतीनंतर यूपी सरकारने जून २०२१ मध्ये दुसऱ्या महाविद्यालयाचा प्रस्ताव दिला होता, परंतु तो अद्याप मंजूर झालेला नाही.”

उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांचा उल्लेख करून सचिन सांगतात की, “जेव्हा ते मंत्री नव्हते, तेव्हा असे वाटत होते की ते आमच्यासाठी लढत आहेत. आता ते स्वतः उच्च शिक्षण मंत्री आहेत, पण त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला नाही.” मंगलाचरण शुक्ला हे राजस्थानमध्ये सरकारी शिक्षक होते, ते म्हणतात की, कॉलेजांव्यतिरिक्त येथील तरुणांना नोकरीसाठी काही औद्योगिक युनिट्सची गरज आहे. “खासदार चहरजी यांनी काही प्रकल्पांची घोषणा केली होती, परंतु नंतर ते म्हणाले की करोनामुळे निधी थांबला आहे आणि ते काहीही करू शकत नाहीत.” यूपीच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, प्रकल्पांची प्रक्रिया सुरू आहे. नुकतेच काही प्रश्न उपस्थित झाले होते आणि आम्ही त्यांचे निराकरण केले आहे. मात्र, प्रकल्प कधी सुरू होतील याची निश्चित कालमर्यादा मी सांगू शकत नाही.

हेही वाचा: लातूरात पुन्हा ‘मामुली’ चा प्रयोग !

अजय यादव आणि गौरव यादव जे दोघेही २० वर्षांचे आहेत. अग्निवीर अंतर्गत बदललेल्या सैन्य भरती प्रक्रियेमुळे अनेकांसाठी तो पर्याय कसा बंद झाला याबद्दल ते सांगतात. ते म्हणाले, “पूर्वी तुम्हाला येथे डझनभर तरुण सैन्य भरतीसाठी दररोज सकाळ संध्याकाळ सराव करताना आढळले असते. पण आता कोणीच नाही. आता आशा फक्त पोलीस आणि निमलष्करी दल आहेत, पण त्यांच्या परीक्षेचा पेपरही पुन्हा पुन्हा फुटतो. राज्य सरकारला परीक्षाही नीट पार पाडता येत नाही. राज्य सरकार भरती परीक्षाही नीट घेऊ शकत नाही. तरुणांनी आता कुठे जायचे? अशा परिस्थितीत भाजपाला मत का द्यावे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

रोजगार हा मोठा प्रश्न

असेही लोक आहेत जे आपला राग उघड व्यक्त करीत आहेत. बलवीर सिंग वर्मा संचालित कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून कामासाठी जवळच्या गावातून आले आहेत. दुसरीकडे विनोद सिंग म्हणतात, “माझे दोन मुलगे CTET शिक्षक भरतीसाठी पात्र झाले आहेत. परंतु २०१८ पासून यूपीमध्ये शिक्षकांसाठी कोणतीही रिक्त पदे अधिसूचित केलेली नाहीत. आमच्या प्रदेशातील काही उमेदवार बिहारमध्ये निवडले गेले आहेत आणि ते तेथे कार्यरत आहेत. लोकांना शेकडो किलोमीटर दूर शिक्षक म्हणून काम करावे लागते हे लज्जास्पद आहे.”

बटेश्वरच्या लोकसंख्येमध्ये निषाद (नाविक समुदाय) आणि यादव सर्वात प्रभावशाली आहेत. दोन्ही जाती ओबीसी आहेत आणि त्यांची संख्या प्रत्येकी १२०० च्या आसपास आहे. याशिवाय गोस्वामी, कुशवाह, ब्राह्मण, राजपूत, जाटव यांच्यासह दलितांची संख्याही मोठी आहे. यूपीमध्ये जाटही ओबीसी आहेत. अधिकृत सीएससीचे बलवीर सिंग मलिक वर्मा म्हणतात की, लोक ज्या मुद्द्यांवर बोलतात ते निवडणुकीत त्यांच्यासाठी निर्णायक ठरतील की नाही हे स्पष्ट नाही. ते म्हणाले, “माझ्या सेंटरमध्ये दररोज सुमारे ५० लोक येतात आणि अनेक गोष्टींबद्दल बोलतात. पण मला माहीत आहे की अनेक गोष्टी लक्षात ठेवून ते शेवटच्या क्षणी आपला विचार बदलतात.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former prime minister vajpayee village has been waiting for a college for decades despite the bjp government vrd
Show comments