गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार झालेले डॉ.नामदेव किरसान यांचा राजकीय प्रवास सरकारी अधिकारी ते खासदार असा आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोविंदपूर येथील अतिदुर्गम, जंगलव्याप्त वनग्राममध्ये त्यांचे बालपण गेले. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते शिकले. गांधी विचारांचा प्रभाव व शिक्षणामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. इंडियन ब्युरो ऑफ माईन्स विभागात लेखापाल या पदाची नोकरी मिळाली. पुढे एम.फिल व एलएलबी तसेच एलएलएम पदवी संपादन केल्यावर त्यांना नागपूरच्या धनवटे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. प्राध्यापक म्हणून सात वर्षे अध्यापन केल्यावर त्यांनी राज्यसेवा परीक्षेद्वारे उत्पादन शुल्क विभागात अधीक्षकपदाला गवसणी घातली. पदोन्नतीने ते उपायुक्त पदापर्यंत पोहोचले, पण राजकीय क्षेत्र त्यांना खुणावत होते. अखेर प्रशासकीय सेवेला २००८ मध्ये पूर्णविराम देत ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. चळवळीतून अंगी लढाऊ बाणा भिणलेला होताच यातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. अपयश आले, पण ते खचले नाहीत.

हेही वाचा…ॲड. गोवाल पाडवी (नंदुरबार, काँग्रेस); आदिवासींमधील नवीन नेतृत्व

डॉ.नामदेव किरसान यांनी २०१९ मध्ये सिरोंचा ते सालेकसा (गोंदिया) ही जनसंपर्क यात्रा काढली. दोन महिने चाललेल्या या यात्रेतून दीड हजार गावांना भेटी दिल्या. जिल्हा काँग्रेसच्या वतीने कुरखेडा ते गडचिरोली या पाच दिवशीय यात्रेसह जिल्ह्याच्या प्रश्नांवर गतवर्षी गडचिरोली ते नागपूर या १७५ किलोमीटरच्या पदयात्रेत डॉ. किरसान यांचा सक्रिय सहभाग होता.डॉ. किरसान हे वाणिज्य शाखेतून पदवीधर झाले, त्यानंतर एम. कॉम, एम. फिल, एमए, एलएलएम, पीएच.डी अशा पदव्या मिळवल्या. स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी २०१० मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठातून गांधी विचारावर व २०१८ मध्ये मॅनेजमेंट बिझनसमध्ये दोन पीएच.डी. पदव्या मिळवल्या. उच्चशिक्षित व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता अशी त्यांची ख्याती आहे.