जयेश सामंत
नवी मुंबई : राज्यात सत्तेत असूनही अस्वस्थ असलेल्या भाजप नेत्यांमध्ये नवी मुंबईतील पक्षाचे नेते गणेश नाईक यांचीही भर पडू लागली असून मंगळवारी वाशी येथे त्यांनी आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्यात महापालिकेतील अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेताना लवकरच जनआक्रोश मोर्चा काढण्याचा त्यांनी दिलेला इशारा हा एकप्रकारे हा ठाण्याहून नवी मुंबई महापालिकेचा कारभार हाकणाऱ्या कारभाऱ्यांविरोधात आहे का अशी चर्चा आता शहरात जोमाने चालू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या स्थापनेपासून नवी मुंबईत नाईक यांची एकहाती सत्ता राहिली आहे. या महापालिकेतील शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यत अनेकांनी नाईक कृपेने एकेकाळी ‘अच्छे दिना’ची अनुभूत घेतली आहे. असे असताना आपणच एकेकाळी उपकृत केलेल्या या अधिकाऱ्यांवर डाफरण्याची वेळ नाईकांवर का आली, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा-शिर्डीतील ऐनवेळच्या उमेदवारीची परंपरा ठाकरे गट यंदाही कायम राखणार?

नवी मुंबईतील राजकारणाचे अनभिषीक्त सम्राट अशी गणेश नाईकांची ओळख राहिली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबईवर त्यांची २५ वर्ष एकहाती सत्ता राहिली आहे. ते म्हणतील ती पुर्वदिशा असा आजवर येथील कारभार राहिला. राज्याचा मुख्यमंत्री कुणीही असो नवी मुंबई महापालिकेतील नाईकांचा वरचष्मा कायम राहिला. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर मात्र हे गणित बदलू लागले. या सरकारच्या काळात नगरविकास विभागाचे मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आणि इतके वर्ष नवी मुंबईपासून लांब राहीलेल्या शिंदे यांना येथील महापालिकेत चंचुप्रवेशाची संधी मिळाली.या काळात महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली. त्यामुळे तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, त्यानंतर आलेले अभिजीत बांगर यांचीही कार्यपद्धती शिंदे म्हणतील अशीच राहिली. महापालिकेतील कंत्राटी कामे, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, धोरणात्मक निर्णय, नव्या प्रकल्पाची आखणी शिंदे यांना सांगूनच होऊ लागली. या काळात नवी मुंबई महापालिकेचा कारभार एकनाथ शिंदे आणि राजन विचारे म्हणतील तशाच पद्धतीने सुरु होता. त्यामुळे या काळात आयुक्तांसोबत बैठकांचा धडाका लावणारे नाईक विरोधकांच्या भूमिकेतच दिसले. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही नाईकांचा हा विरोध आणि अधिकाऱ्यांना दमता घेणे थांबले नसल्याने नवी मुंबई महापालिकेवरील ठाण्याचा प्रभाव अजूनही कायम असल्याची चर्चा पुन्हा एकदा चालू झाली आहे.

आणखी वाचा-पालघर भाजपमधील हेवेदावे मिटेनात

नाईक विरोधात का ?

राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्याने मुंबई महानगर पट्टयातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे समर्थक आणि निकटवर्तीयांचा वावर गेल्या काही काळापासून वाढला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोक्याच्या ठिकाणी पाठविण्यात येणारे अधिकारीही शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेले राजेश नार्वेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने गणेश नाईकांचा शब्द पुन्हा येथे प्रमाण मानला जाईल अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी युतीच्या राजकारणातही येथील महापालिकेवर आपली पकड कमी होऊ दिलेली नाही. शहरात सुरु असणारी कोट्यवधी रुपयांची कंत्राटी कामे, नव्याने हाती घेण्यात येणारे उड्डाणपूल, पाणी वितरण व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा मोठा प्रकल्प, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राची आखणी, सीसीटीव्ही अशा सर्व मोठ्या आणि प्रभावी कामांमध्ये ठाणेकरांचा प्रभाव लपून राहीलेला नाही. महापालिकेने मध्यंतरी एमआयडीसी पट्टयात २०० कोटींची कामे काढली. या कामांवर मुख्यमंत्री समर्थक असलेल्या नवी मुंबईकर नेत्याने आपला ताबा ठेवला. नाईकांना सोडून शिंदेवासी झालेला एक माजी प्रभावी नगरसेवक ५० कोटींच्या आसपासच्या कामांचा ताबेदार झाला आहे. वाशीतील सिडकोच्या जुन्या इमारतींच्या पुनर्वसनावर शिंदे यांच्या समर्थकाची मोहर उमटली आहे. महापालिकेचा शहरविकास विभागाची टिप्पण वरुन मंजुर होऊनच येतात. अशा परिस्थितीत नाईकांना वर्षानुवर्षे साथ देणाऱ्या माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये कमालिची अस्वस्थता असून ही अस्वस्थता गणेशदादांच्या वागण्याबोलण्यातूनही प्रतिबिंबीत होत असल्याची चर्चा आता आहे.

आणखी वाचा-अकोल्यात कावड आणि पालखी महोत्सवातून मतांची पेरणी

नाईकांचे उपकृत आता झाले परके ?

नाईकांनी मंगळवारी वाशी येथे घेतलेल्या जनसंवाद कार्यक्रमात त्यांनीच एकेकाळी उपकृत केलेल्या अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले. महापालिकेतील अभियांत्रिकी विभागामार्फथ मंजुर होणाऱ्या कामांवर ठराविक ठेकेदारांचा आणि ठाण्याहून आयात केलेल्या कंत्राटदारांचा वरचष्मा दिसू लागल्याने नाईकांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी नाईकांनी वेगळ्या माध्यमातून मंगळवारी बोलून दाखवली शिवाय जनअक्रोश मोर्चाचा इशाराही दिला. नवी मुंबईकरांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी घेतलेला हा संवाद कार्यक्रम त्यामुळे आक्रोशमय ठरला.

नवी मुंबईकरांच्या प्रश्नासाठी लढण्याचे आणि वेळप्रसंगी आक्रमक होण्याची गणेश नाईक यांची वृत्ती काही आजची नाही. नवी मुंबईकरांचे हक्काचे पाणी पळविले जात असेल, शहरातील हिरव्याकंच झाडांची कत्तल केली जाणार असेल आणि शहरवासियांच्या हिताची कामे अडवली जात असतील तर गप्प बसणे हे गणेश नाईकांच्या रक्तात नाही. नवी मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही संवादही साधू आणि वेळ आलीच तर आक्रोशही करु हा नाईकांचा बाणा आहे. -सुरज पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी भाजप

गणेश नाईकांचा प्रवास संवादापासून आक्रोशापर्यत का होत आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सत्तापदी असताना हम करे सो कायदा असा कारभार करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाने आळा बसला आहे. टक्केवारीची गणित जुळत नाही आणि अधिकाऱ्यांवर दादागिरी करता येत नाही. या अस्वस्थेतेतून आलेला हा अक्रोश नाही ना याचा विचार करायला हवा. -किशोर पाटकर, संपर्क प्रमुख शिवसेना नवी मुंबई

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh naik against chief minister eknath shinde print politics news mrj
Show comments