केंद्रीय मंत्री व भाजपाचे नेते गिरीराज सिंह हे बिहारमधील बेगुसरायमधून पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १३ मे रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात या मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे. २०१९ मध्ये गिरीराज सिंह यांनी कन्हैया कुमारचा पराभव केला होता, तेव्हा तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून उभा होता. या निवडणुकीमध्ये गिरीराज सिंह यांची लढत इंडिया आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अवदेश कुमार राय यांच्यासोबत होणार आहे. गिरीराज सिंह यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध विषयांवरची मते व्यक्ती केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न : तेजस्वी यादव नवरात्रीमध्ये मासे खात असतानाचा व्हिडीओ सध्या वादाचा मुद्दा ठरला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यावर टीका केली आहे. एकीकडे तेजस्वी यांनी नवरात्रीपूर्वी मासे खाल्ल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने या वादात उडी घेत भाजपावर टीका केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, मासे खाणे हा बंगाली लोकांच्या धार्मिक प्रथेचाही भाग आहे. भाजपाला भारतातील विविधता नष्ट करायची असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर तुमचे काय मत आहे?

ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी हे चिंताग्रस्त आहेत. ते हताश झालेले आहेत. भारतात भाषा आणि संस्कृती भौगोलिक विविधतेनुसार बदलत जाते, हे त्यांना माहित नाही. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान इत्यादी उत्तर भारतातल्या राज्यांमधील संस्कृती ही बंगाल आणि तमिळनाडूच्या संस्कृतीहून वेगळी आहे. बंगालमध्ये मासे खाणे हा तिथल्या लोकांच्या संस्कृतीचा भाग आहे. मात्र, तेजस्वी यादव बिहारचे आहेत. इथे धार्मिक प्रथेनुसार नवरात्रीमध्ये मासे खाणे वर्ज्य आहे.

हेही वाचा : केरळमधील ‘व्हायरल’ टीचर अम्मा आहे तरी कोण? काय आहे कम्युनिस्ट पक्षाची रणनीति?

प्रश्न : अग्निवीर या योजनेला विरोध करून, विरोधक रोजगार कसा देणार आहेत, असे विधान तुम्ही अलीकडेच केले आहे. परंतु, अग्निवीर योजनेच्या टीकाकारांचे असे म्हणणे आहे की, ही योजना फक्त चार वर्षांसाठी तरुणांना नोकरीवर ठेवते. त्यातील फक्त २५ टक्के तरुणांना सैन्यात कायमस्वरूपी नोकरी दिली जाते.

अग्निवीर योजना काय आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्ही या योजनेशी जोडल्या गेलेल्या तरुणांशी बोलले पाहिजे. ‘अग्निवीर’ योजनेमध्ये एका व्यक्तीची सैन्यात गरज असेल तर तिथे चार जणांना घेतले जाते. चार ते पाच वर्षांसाठी त्यांना तिथे ठेवले जाते. त्या सर्वांनाच प्रशिक्षण देण्यात येते आणि नंतर चारपैकी एका तरुणाला कायमस्वरूपी नोकरी दिली जाते. आता यातील प्रशिक्षित झालेले उर्वरित तीन जण नागरी उड्डाण, बँकिंग आणि इतरही अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी पात्र आहेत. चार वर्षांनंतर बाहेर पडतानाही त्यांना चांगले पॅकेज मिळते. सैन्यात निवडलेल्या चारपैकी फक्त एकाची आवश्यकता होती आणि त्यामुळे त्याला कायमस्वरूपी नोकरी दिली गेली. मात्र, अतिरिक्त तिघांनी घेतलेल्या प्रशिक्षणामुळे तेदेखील नोकरीसाठी प्रशिक्षित होतात, हे समजून घेणे फार आवश्यक आहे.

प्रश्न : अयोध्येत राम मंदिर बांधले गेले आहे. मात्र, काशी व मथुरेमध्ये सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादावर तुमचे काय मत आहे?

हे फक्त माझे मत नाही, तर संपूर्ण देशाचे मत आहे. काँग्रेसने जर फाळणी आणि स्वातंत्र्यानंतर लगेचच हा वाद सोडवला असता, तर इतके दीर्घकाळ न्यायालयीन खटले चालले नसते. पाकिस्तानमध्ये आपल्या मंदिरांची तोडफोड केली जात आहे. तिथे कुणीही त्याचा जाब विचारायला जात नाही. काशी, मथुरा व अयोध्या हा भारतातील सनातनी लोकांचा मुद्दा आहे. काँग्रेसने या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

प्रश्न : विरोधी पक्षांनी आता काशी व मथुरा येथील मंदिरांसाठी दोन्ही समुदायांमध्ये सामंजस्य करार करावा आणि लोकांना कायदेशीर खटल्यापासून दूर ठेवावे, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

तुष्टीकरणाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्यांकडूनच ही दिरंगाई करण्यात आलेली आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणात गुंतलेल्या राजकीय पक्षांपेक्षा अशी सामंजस्याची भूमिका घेणारे मुस्लीम खूपच कमी होते. केवळ मतांसाठी म्हणून त्यांनी हे मुद्दे ताटकळत ठेवले. त्यामध्ये मुख्य भूमिका काँग्रेसचीच होती. त्याशिवाय इतरही काही प्रादेशिक पक्षांनी आपल्या मतांच्या राजकारणासाठी हे मुद्दे वापरून घेतले.

प्रश्न : २०१९ मध्ये कन्हैया कुमारने तुमच्याविरोधात भाकपकडून निवडणूक लढवली होती. यावेळी तो ईशान्य दिल्लीमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढतो आहे. त्याच्या उमेदवारीबाबत तुमचे काय मत आहे?

काँग्रेस आता दिवाळखोर झाली आहे. त्यांचे स्थानिक नेतेदेखील दिवाळखोर झाले आहेत. म्हणूनच ते ‘तुकडे-तुकडे गँग’मधील लोकांना निवडत आहेत. त्यांच्याकडे कुणीच नसल्याने ते नाकारल्या गेलेल्या लोकांवर विसंबून आहेत.

प्रश्न : विरोधकांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही ती राज्यात केली आणि आता ते तुमचे सहकारी आहेत. या मुद्द्यावर तुमची काय भूमिका आहे?

आम्ही जातनिहाय जनगणनेच्या विरोधात नाही. आम्ही तिच्या कधीच विरोधात नव्हतो. मात्र, पंतप्रधान मोदींनी लोकशाही मजबूत करण्यासाठी शेतकरी, युवा, महिला व गरीब या चारच गटांवर लक्ष केंद्रित केले आहे.

प्रश्न : हाफीज सईदच्या निकटवर्तीय असलेल्या दहशतवाद्याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा संशय पाकिस्तानने व्यक्त केला आहे. याबाबत तुमचे काय मत आहे?

आमच्या बिहारमध्ये एक म्हण आहे – चोरों को सारे नजर आते हैं चोर! (चोरांना सगळे चोरच वाटतात.) भारतातील दहशतवादाला पाकिस्तानने नेहमीच खतपाणी घातले आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानमधून इथे पाठविण्यात आलेल्या सर्वांना आम्ही पाणी पाजले आहे. आता त्यांच्याच देशात भरपूर दहशतवादी आहेत. तुम्ही जे पेरले आहे, तेच उगवणार नाही का? पाकिस्तानमध्ये अंतर्गत यादवी माजली आहे. त्यामुळे त्यांना आपले स्वत:चे वास्तव स्वीकारता येत नसल्याने ते भारताला दोष देत आहेत.

हेही वाचा : “मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल

प्रश्न : भाजपा स्वत:ला विचारधारा असलेला पक्ष म्हणवून घेतो. मात्र, काँग्रेससहित इतर पक्षांतले अनेक लोक आजही भाजपामध्ये येत आहेत. तुम्ही ज्या पक्षांवर एकेकाळी सडकून टीका करत होता, तेच पक्ष आज तुमचे सहकारी झाले आहेत. या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ कसा लावायचा?

भारतात वेगवेगळ्या समुदायांचे लोक राहतात. संन्यासी झालेल्याची जात विचारायची नाही, असा आपला धर्म सांगतो. जो गंगेत विसर्जित होतो, तो स्वत:च गंगा होतो.

प्रश्न : बिहारमधील निवडणुकीचे मुख्य मुद्दे कोणते आहेत आणि निकाल काय लागेल, असे तुम्हाला वाटते?

आमचा मुख्य मुद्दा विकास हाच आहे. विकासाशिवाय दुसरे काहीही नाही. लालू प्रसाद यादव हे आमचे मुख्य विरोधक आहेत. लूट, हिंसा व जंगलराज या गोष्टींचे ते प्रतीक आहेत. त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात तरुणांना कधीच रोजगार दिला नाही. आता त्यांचे सुपुत्र असा दावा करीत आहेत की, त्यांनी १७ महिन्यांच्या सत्ताकाळात तरुणांना रोजगार दिला आहे. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या पाच खात्यांमधून त्यांनी तरुणांना किती नोकऱ्या दिल्या, हे ते सांगू शकत नाहीत. त्यामुळे तुष्टीकरण नव्हे तर फक्त विकास हाच एनडीएचा मुद्दा आहे. आम्ही तुष्टीकरणाचे राजकारण संपवून टाकू.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giriraj singh interview issue of kashi mathura and ayodhya lok sabha election 2024 vsh
Show comments