मुंबई : मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात भाजपचे ‘संकटमोचक’ अशी प्रतीमा तयार झालेले गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, दादा भूसे आदी मंत्र्यांचे पंख छाटले गेले आहेत. भाजप व राष्ट्रवादीने नवीन चेहऱ्यांकडे महत्त्वाची खाती सोपवून नवीन नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू मानले जातात. कोणताही राजकीय पेच वा तिढा निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी महाजन हे धावून जातात. अगदी अलीकडे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे अडून बसले असता महाजन यांनीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढली होती. यामुळेच महाजन यांना संकटमोचकाची उपमा दिली जाते. मावळत्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन अशी महत्त्वाची खाती भूषविली होती. त्याआधी फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा हे खाते होते.

आणखी वाचा-पश्चिम वर्‍हाडात पडझडीमुळे शिवसेनेमध्ये खदखद, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची दरी; स्वपक्षीय नेत्यांनाच विरोध

नवीन सरकारमध्ये महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ, तापी आणि कोकण महामंडळे हे विभाग व आपत्ती व्यवस्थापन ही खाती सोपविण्यात आली आहेत. आधीच्या खात्यांच्या तुलनेत महाजन यांचे पंख छाटले गेले आहेत. जलसंपदा खाते असले तरी हे खाते पूर्णपणे त्यांच्याकडे नाही. आपत्ती व्यवस्थापन ही खातेही फारसे महत्त्वाचे मानले जात नाही. महाजन यांच्या मंत्रिमंडळात समावेशावरून बराच खल झाला होता. पण फडणवीस यांनी महाजन यांच्या नावाचा आग्रह धरल्याची चर्चा होती. आधीच्या तुलनेत महाजन यांच्याकडे कमी महत्त्वाची खाती सोपवून त्यांचे महत्त्व कमी करण्यात आले आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागील सरकारमध्ये महसूल हे महत्त्वाचे खाते होते. काँग्रेस सरकारमध्ये विखे-पाटील यांनी कृषी, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती भूषविली होती. नवीन मंत्रिमंडळात जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दोनच विभाग सोपविण्यात आले आहेत. महाजन व विखे-पाटील यांच्यात जलसंपदा खात्याची विभागणी झाली आहे. एकूणच महाजन यांच्याप्रमाणेच विखे-पाटील यांचेही पंख छाटण्यात आले आहेत.

आणखी वाचा-Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?

बीडमधील सरपंचाच्या हत्येवरून सध्या वादात सापडलेले धनंजय मुंडे यांनाही अजित पवारांनी मोठा धक्का दिला आहे. कारण मागील सरकारमध्ये मुंडे यांच्याकडे कृषी हे अत्यंत महत्त्वाचे खाते होते. नवीन सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते सोपविण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय फटका आहे. मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशास विरोध झाला होता. धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच त्यांची चुलत भगिनी पंकजा मुंडे यांच्याकडेही पर्यावरण व पशूसंवर्धन ही तुलनेत कमी महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत. शिवसेनेचे दादा भूसे यांनी आधी कृषी, रस्ते विकास अशी खाती भूषविली होती. यंदा त्यांच्याकडे शालेय शिक्षण हे डोकेदुखी ठरणारे खाते आले आहे.

भाजपने मंत्रिमंडळात प्रथमच समावेश झालेल्या शिवेंद्रनराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे (ग्रामविकास), राष्ट्रवादीने माणिकराव कोकाटे (कृषी), बाबासाहेब पाटील (सहकार), मकरंद पाटील (मदत पुनर्वसन) अशी महत्त्वाची खाती सोपवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan radhakrishna vikhe patil dhananjay munde dada bhuse have less important cabinet post print politics news mrj