सांगली : ज्या ज्या वेळी लाभाची पदे मिळवायची असतील त्या त्या वेळी मिरजेतील कारभारी मंडळी पक्ष भेद विसरून एकत्र येतात यालाच ‘मिरज पॅटर्न’ हे गोंडस नाव देऊन मिरजेतील राजकीय डावपेच करत असतात. याच धर्तीवर सर्व पक्षिय नगरसेवकांकडून एकत्र येऊन लोकसभेच्या निवडणुकीची राजकीय मांडणी मोडीत काढत विधानसभेला पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पाठीशी राहण्याचा इरादा रविवारी व्यक्त करण्यात आला.

लोकसभेवेळी भाजपचा उमेदवार मान्य नसल्याने आपण विशाल पाटील यांच्या पाठीशी राहिल्याचे भाजपच्या सुकाणू समितीचे सदस्य आणि महापालिकेच्या कारभारात दोन्ही सुपुत्रांना स्थायी सभापती मिळवून देण्यात ज्यांनी वजन वापरले ते सुरेश आवटी सांगतात, तर पालकमंत्री खाडे यांनी पक्षभेद विसरून विकास निधी दिल्याने त्यांचे कौतुक करत असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय मेंढे सांगतात. या नव्या राजकीय मांडणीने स्वपक्षातील विरोधकांना कात्रजचा घाट दाखवत पालकमंत्री खाडे यांनी महाविकास आघाडीलाही खरसुंडीच्या सिध्दनाथाच्या वाटेवरील भिवघाट दाखवला आहे.

आणखी वाचा-Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य काय? दिल्ली की महाराष्ट्र? भाजपासमोर यक्ष प्रश्न

मिरजेतील सर्वच पक्षातील माजी नगरसेवकांचा कारभार भल्या-भल्यांना कधी कळलाच नाही. सांगली शहर राजकीय केंद्र असले तरी अशा खेळी केल्या जातात की त्यात जेष्ठ नेत्यांचेही बर्‍याचवेळा हात पोळले आहेत. अगदी स्व.वसंतदादा पाटील यांच्या हयातीत १९७२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बापूसाहेब जामदार यांना पराभूत करत अपक्ष डॉ.एन. आर. पाठक यांना मिरजकरांची आमदार केले होते. महापालिका स्थापनेनंतर विकास आघाडीचा झेंडा घेउन आमदार जयंत पाटील यांनी सत्तांतर घडवून आणले. मात्र, त्यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी आघाडीच्या उमेदवाराचा स्थायी समितीत पराभव करून संजय मेंढे यांना सभापती करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि आमदार पाटील यांनी दिलेला आघाडीचा उमेदवार पराभूत केला होता. ज्या ज्या वेळी लाभाची पदे मिळविण्याची वेळ येईल त्या त्या वेळी पक्षिय विरोध खुंटीला टांगून एकत्र येण्याची ही किमया मिरजेच्या कारभार्‍यांनी इमानइतबारे पाळली आहे. त्याचाच हा परिपाक म्हणावा लागेल.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना २५ हजार मते कमी मिळाली. जिल्ह्याचे पालकत्व, मिरजेचे गेल्या तीन निवडणुकीत आमदार असतानाही भाजपला मतदान कमी झाले, याची कारणमीमांसा पक्षाने कधी केली नाही, अथवा उमेदवारांनीही केली नाही. भाजप विरोधात २५ हजार मते असल्याने विधानसभेला महाविकास आघाडीच्या आशा वाढल्या आहेत. आता हे मताधिक्य आपलेच आहे अशी समजूत करून महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा शिवसेना हे तीनही पक्ष उमेदवारीवर दावा करत असताना पालकमंत्री खाडे यांनी दिलेला राजकीय धक्का धोबीपछाडचा डाव म्हणावा लागेल.

आणखी वाचा- UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?

लोकसभेवेळी सुरेश आवटी यांच्या नेतृत्वाखाली, निरंजन व संदीप आवटी, आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे आदी माजी नगरसेवक विशाल पाटील यांच्यासाठी सक्रिय होती. आता मात्र, आम्ही भाजपचेच आहोत म्हणून पालकमंत्री खाडे यांच्या कंपूत सहभागी झाले आहेत. हे अपेक्षितच होते. मात्र, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय मेंढे, माजी महापौर किशोर जामदार यांचे पुत्र माजी नगरसेवक करण जामदार यांनीही पालकमंत्री खाडे यांच्या पाठीशी राहण्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला. पत्रकार बैठकीत तिखट प्रश्‍नांना उत्तरे देतांना त्यांची कोंडी झाली असली तरी कल दिसून आला आहे. यामुळे मिरज पॅटर्न हा पक्ष निष्ठेपेक्षा निधी निष्ठेवरच चालतो चालविला जातो हे यामुळे पुन्हा एकदा सिध्द झाले.