Gujarat Vav Assembly Bypoll Election : महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ व २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीबरोबर देशातील विविध राज्यातील लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक देखील घेण्यात येत आहे. यामध्ये गुजरातमधील वाव विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने स्वरूपजी ठाकोर यांना उमेदवारी दिली आहे. स्वरूपजी ठाकोर यांना काँग्रेसच्या गेनीबेन ठाकोर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, भारतीय जनता पक्षाने स्वरूपजी ठाकोर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं आहे.

वाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने गुलाबसिंग राजपूत यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. मात्र, वाव विधानसभा मतदारसंघात हे ठाकोर मतदारांचं प्राबल्य आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून स्वरूपजी ठाकोर यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. या मतदारसंघाच्या आमदार गेनीबेन ठाकोर या लोकसभेची निवडणूक लढवत त्या खासदार झाल्या. त्यामुळे वाव विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी १३ नोव्हेंबरला मतदार पार पडणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या भाजपा आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापलं असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या गेनीबेन ठाकोर या एकमेव खासदार आहेत. त्या आमदार असताना त्यांचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघाला भाजपा सुरुंग लावण्याची शक्यता आहे. तर भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसनेही मोठी रनणीती आखल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : अकोटमध्ये काँग्रेसचा गणगणे परिवारावर विश्वास, ॲड.महेश यांना दुसऱ्यांदा, तर कुटुंबात सातव्यांदा तिकीट; गठ्ठा मतदार लक्षात घेता माळी समाजाला प्रतिनिधित्व

दरम्यान, डिसेंबर २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत १८२ पैकी १५६ जागा जिंकून भाजपा सलग सातव्यांदा सत्तेवर आलं. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला केवळ १७ जागा जिंकता आल्या. थाराडमधील काँग्रेसचे तत्कालीन आमदार गुलाबसिंग राजपूत हे भाजपाच्या शंकर चौधरी यांच्याकडून पराभूत झाले होते. वाव मतदारसंघात काँग्रेसच्या तत्कालीन आमदार गेनीबेन ठाकोर यांनी भाजपाचे उमेदवार स्वरूपजी ठाकोर यांचा १५,६०१ मतांनी पराभव करून आपली जागा राखली. थाराड आणि वाव या दोन्ही जागा बनासकांठा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत. या मतदारसंघातून गेनीबेन ठाकोर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या रेखाबेन चौधरी यांचा ३०,००० मतांनी पराभव केला.

भाजपाने राज्यातील लोकसभेच्या २६ पैकी २५ जागा जिंकल्या तर गेनीबेन बनासकांठा ही जागा जिंकून काँग्रेसच्या एकमेव खासदार ठरल्या. विशेष म्हणजे वाव पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने गुलाबसिंग राजपूत यांना उमेदवारी दिली, तर भाजपाने स्वरूपजी ठाकोर यांना उमेदवारी दिली. २०२२ च्या निवडणुकीत हे दोघेही उमेदवार पराभूत होत होते. आता गुलाबसिंग राजपूत हे क्षत्रिय (उच्चवर्णीय) आहेत, तर स्वरूपजी ठाकोर हे ठाकोर (ओबीसी) समाजातील आहेत. वाव हा मतदारसंघ उत्तर गुजरातमधील एक ग्रामीण मतदारसंघ आहे. ज्यावर ठाकोर आणि चौधरी (OBC) जाती गटांचे प्राबल्य आहे. ब्राह्मण आणि दलित समाजातील मतदारांची संख्याही लक्षणीय आहे.

हेही वाचा : काँग्रेस नेत्यांमध्ये वाद, पक्षश्रेष्ठींचे ‘वेट अँड वॉच’; चंद्रपूर, बल्लारपूर, वरोऱ्यातील उमेदवारांची घोषणा लांबणीवर

दरम्यान, वाव पोटनिवडणुकीत ठाकोर आणि बिगर ठाकोर मतदारांमध्ये ध्रुवीकरण होऊ शकते, असे काही निरीक्षकांचे मत आहे. तसेच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलं की, “गेनीबेन यांची लोकप्रियता ठाकोरांची मते काँग्रेसकडे खेचून आणेल. गेनीबेन यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडे १२ आमदार उरले असून विधानसभेत त्यांची संख्या सर्वात कमी आहे. पक्षाच्या मूळ १७ जागांसह पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकले नाही. गेनीबेन ठाकोर यांच्यासाठीही महत्त्वाच्या असलेल्या या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. वाव ही जागा आपल्या बालेकिल्ल्यात राहावी, यासाठी जुना पक्षही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम आदमी पक्षाने पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुलाबसिंग राजपूत यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा काँग्रेसने ताकद दाखवून रॅलीचे आयोजन केले होते. ज्याला गोहिल, गेनीबेन आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अमित चावडा यांनी संबोधित केले होते. आपल्या भाषणात ते म्हणाले होते की, “अहंकारी आणि जनविरोधी भाजपाच्या विरोधात काँग्रेस लढेल.” काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांचा आरोप आहे की, “भाजपाने बनासकांठमध्ये नेहमीच भेदभाव केला. गेनीबेन ठाकोर यांच्या नेतृत्वाखालील २०१७-१८ च्या आंदोलनामुळे ज्यांना मदत मिळाली त्या मुद्यांसह जिल्ह्यातील नर्मदा कालव्याच्या दुरुस्तीच्या कामासाठीचे मुद्दे आम्ही पोटनिवडणुकीच्या प्रचारात मांडणार आहोत”, असं मनीष दोशी यांनी म्हटलं. दरम्यान, आणखी एका काँग्रेस नेत्याचा दावा आहे की, भाजपामधील अंतर्गत भांडणामुळे पक्ष जिंकेल. त्यांच्याकडे (भाजपा) एका जागेसाठी ३२ दावेदार होते, तर आमच्याकडे फक्त चार होते.