Haryana Assembly Election 2024: हरियाणामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या ५ ऑक्टोबर रोजी हरियाणात ९० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. मतदानाची तारीख जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारासाठी नेते ठिकठिकाणी सभा आणि मेळावे घेत आहेत. एकीकडे काँग्रेसने आणि दुसरीकडे भाजपाने हरियाणात सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी नेत्यांकडून मोठमोठी आश्वासन दिली जात आहेत. मात्र, असतानाच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी काढलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने व्यवस्थित हाताळाणी न केल्यामुळे आता भाजपाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांना प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्यासाठी हरियाणातील शेतकऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना भाजपाला काय प्रश्न विचारायचे? याबाबत सांगितलं जात आहे.

‘शेतकऱ्यांवर गोळ्या का चालवल्या? शेतकऱ्यांचा आंदोलनाचा मार्ग का रोखला?’, असे सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायचे असे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. अमरजीत सिंह मोहरी (वय ४४) यांनी बुधवारी अंबाला जिल्ह्यातील एका गावातील स्थानिक गुरुद्वारात आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रात हे प्रश्न उपस्थित आहेत. यावेळी शेकडो शेतकरी अपस्थित होते. दरम्यान, २०२२ मध्ये भारतीय किसान युनियन (शहीद भगतसिंग) ची स्थापना करणारे स्थानिक शेतकरी नेते मोहरी यांनी यावेळी म्हटलं की, “५ ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या हरियाणा निवडणुकीसाठी राजकारणी जेव्हा प्रचारासाठी येतात तेव्हा त्यांना हे वरील प्रश्न विचारा.”

हेही वाचा : सरकारची कानउघाडणी; अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पाळले नसल्याने निवडणूक आयोगाची नाराजी

दरम्यान, गेल्या १० दिवसांत प्रचारासाठी बाहेर पडलेल्या भाजपाच्या उमेदवारांवर अनेक शेतकरी संघटनांनी असेच प्रश्न विचारले आहेत. २२ सप्टेंबर रोजी उमेदवार पवन सैनी यांना घेराव घालण्यात आला होता. ते अंबाला येथील फतेहगढ गावात मते मागण्यासाठी गेले असता शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला ट्रॅक्टरने घेराव घालत प्रश्न विचारले होते. तसेच माजी गृहमंत्री आणि भाजपाचे अंबाला कँटचे उमेदवार अनिल वीज, विधानसभा अध्यक्ष आणि पक्षाचे पंचकुलाचे उमेदवार ज्ञानचंद गुप्ता, मुल्लाना उमेदवार संतोष सरवान, कालका उमेदवार शक्ती राणी, गुऱ्हाळा येथील उमेदवार कुलवंत बाजीगर, टोहानाचे देवेंद्रसिंग बबली, नरवणाच्या उमेदवार कृष्णा बेदी आणि भाजपाचे हांसीचे उमेदवार विनोद भयाना (हंसी) यांनाही अशाच संतप्त जमावाचा सामना करावा लागला.

या वर्षाच्या सुरुवातीला विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनावेली विशेषतः आंदोलकांपैकी एक असेलेले शुभकरण सिंह यांच्या मृत्यूवरून शेतकऱ्यांचा राग असल्याचं कारण शेतकरी सांगतात. दिल्लीत शेतकरी आंदोलन करणार होते. तिथे हरियाणा-पंजाब सीमा सील करण्यात आली होती. त्यावेळी मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा आणि पेलेट गनचा वापर केल्याचा आणि ड्रोन तैनात केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या आरोपावर पोलिसांनी सांगितलं होतं की, “त्यांनी फक्त अश्रुधुराचा वापर केला आणि इतर दावे नाकारले होते. मात्र, शेतकरी कार्यकर्त्यांचा असा दावा आहे की, अंबाला जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान पंजाब सीमेवर बॅरिकेड्स तोडण्यात किंवा अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्याचा इशारा दिला होता.”

हेही वाचा : Waqf Bill :भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा गंभीर आरोप, “वक्फ बोर्डाच्या ‘त्या’ सूचना आणि हरकतींमागे ISI, चीन..”

यासंदर्भात बोलताना शेतकरी कार्यकर्ते नवदीप जलबेरा एका प्रशिक्षण सत्रात म्हणतात की, “शेतकऱ्यांनी प्रश्न विचारण्याची आणि नारेबाजी करण्याची वेळ आली असताना त्यांनी संयम दाखवला पाहिजे. मला माहित आहे की, ‘दिल्ली चलो’ दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आम्ही नाराज आहोत. मात्र, आपण कोणत्याही परिस्थितीत संघर्ष टाळला पाहिजे. कोणालाही दुखापत होऊ नये. पण नेत्यांना प्रश्न विचारा. जर प्रश्न विचारणं शक्य नसेल तर घोषणा द्या.” तसेच मनजीत सिंह नावाच्या शेतकऱ्याने म्हटलं की, “जर नेते आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार असतील तर आम्ही त्यांना एमएसपी, धानाच्या किमतीत वाढ, गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ यावर प्रश्न विचारले पाहिजेत.” दरम्यान, शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारी ही प्रशिक्षण सत्रे समाजातील समस्यांवर बोलण्याचे ठिकाणही बनत आहेत. प्रशिक्षण सत्राचा समारोप करण्यापूर्वी मोहरी म्हणतात, “शेतकऱ्यांचा बंधूभाव कोणत्याही किंमतीत कायम ठेवला पाहिजे. एमएसपीच्या कायदेशीर हमीसाठी त्यांनी ३ ऑक्टोबरला रेल रोको पुकारला आहे.

दरम्यान, अंबाला, कुरुक्षेत्र, यमुनानगर आणि कैथल जिल्ह्यात अशी प्रशिक्षण सत्रे आयोजित केल्यामुळे शेतकऱ्यांचा संतापामुळे भाजपाची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर अंबाला शहरातील काँग्रेसचे उमेदवार निर्मल सिंग यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी सोमवारी सांगितले की, “काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांशी चर्चा करेल. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर शंभू सीमा खुली करण्याचा माझा पहिला प्रयत्न असेल.” तसेच याबाबत मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी बुधवारी सांगितलं की, “भाजपा हीच शेतकऱ्यांची खरी आशा आहे. हुड्डा सरकारच्या काळात काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून २ रुपयांचे धनादेश देण्यात आले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.”