Congress Failure Reasons Haryana Assembly Election 2024 Result : एग्झिट पोल्सचे अंदाज आणि राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष पाहून यावेळी हरियाणात काँग्रेस पक्ष सत्तेत येणार, असा अंदाज काँग्रेसचे नेते व्यक्त करत होते. मात्र आज (८ ऑक्टोबर) मतमोजणी होत असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडाही पार केला. त्यामुळे भाजपा विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसचे नेते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निकालाबाबत भाष्य करणार नाही, असे सांगत आहेत. मात्र काँग्रेस बहुमतापासून दूर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जे यश मिळवले होते, त्यापेक्षा आता ते पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. काँग्रेसने लोकसभेच्या १० जागांपैकी पाच जागांवर विजय मिळविला होता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे गणित कुठे चुकले? याचा घेतलेला हा आढावा.

काँग्रेस संघटनेत दुफळी?

निकाल येण्याआधीच काँग्रेस पक्षात पराभवाचे खापर फोडण्याची स्पर्धा रंगल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसला यानिमित्ताने आता काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. काँग्रेसने ही निवडणूक भुपिंदरसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. मतदानाच्या आधी आणि नंतर भुपिंदरसिंह हुड्डा आणि खासदार कुमारी शैलजा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून जाहीर वाद झाले होते. उमेदवार निवडीमध्ये भुपिंदरसिंह हुड्डा यांचा मोठा वाटा होता.

हे वाचा >> Haryana Exit Poll: सत्ता टप्प्यात दिसताच काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच; पद एक, दावेदार अनेक

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने ३१ जागांवर विजय मिळविला होता. यावेळी काँग्रेस पक्ष दुपारी दीड वाजेपर्यंत ३४ जागांवर आघाडीवर दिसत होता. याचाच अर्थ २०१९ पेक्षा काँग्रेसच्या स्थितीत फार बदल झालेला नाही. यावेळी विजय आपलाच होणार या आत्मविश्वासामुळे काँग्रेसचे राज्यातील नेते मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर वाद घालताना दिसले. त्याचा फटका त्यांना बसल्याचे आता सांगितले जात आहे.

अपक्ष उमेदवारांनी मतदान घेतले

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार काँग्रेसने भाजपापेक्षा अधिक मते घेतली आहे. (दुपारी दीड वाजेपर्यंत) तरीही त्यांना यश आले नाही. याचे कारण अनेक जागांवर अपक्ष आणि इतर पक्षाच्या उमेदवारांनी विजयी मतदान खेचून नेल्यामुळे त्याचा फायदा भाजपाला झाला. अर्थातच स्थानिक पक्षांनाही याचा फटका बसला असून त्यांच्या फार जागा निवडून आलेल्या नाहीत.

एकेकाळी हरियणामध्ये सत्ता भोगलेल्या आयएनएलडी पक्षाने आणि बसपाने केवळ एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर चार मतदारसंघात अपक्ष आघाडीवर आहेत.

जाटांच्या विरोधात एकत्रिकरण

काँग्रेसने हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली जाट समुदायाच्या मतांवर डोळा ठेवला होता. तर भाजपाने जाट वगळता इतर समाजांना एकत्र केले. निवडणूक प्रचारात भाजपाच्या काही नेत्यांनी जाटशाही या शब्दाचा उल्लेख केला होता, अशी बातमी एनडीटीव्हीने दिली आहे. काँग्रेसचा विजय झाला असता तर जाट समाजाचे पुन्हा राज्यावर वर्चस्व राहिले असते, असा एक संदेश यातून गेला. त्यामुळेच इतर समाजाचे भाजपाच्या पारड्यात मतदान गेले, असा अंदाज व्यक्त होत आहे.

हे ही वाचा >> चेहरे पडले, जल्लोष थांबला, हरियाणात काँग्रेसची पिछेहाट; भाजपाने बहुमताचा आकडा केला पार

भाजपाची पडद्यामागून रणनीती

भाजपाने पडद्यामागे राहून जमिनीवर आपले काम चालू ठेवले होते. सरकारी योजना लोकांपर्यंत नेल्या. त्याचा त्यांना लाभ मिळाला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवडणूक रणनीतीची जबाबदारी देण्यात आली होती. सध्याचे निकाल पाहता त्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडल्याचे दिसत आहे. भाजपाने यावेळी तिसऱ्यांदा सत्ता खेचून आणली आहे.

भाजपाचे शहरी वर्चस्व

दोन टर्म सत्ता असताना दशकभरात भाजपाने शहरी भागात आपला मतदारवर्ग तयार केला. गुरुग्राम आणि फरीदाबादमध्ये भाजपाला याचा फायदा झाला. काँग्रेसला ग्रामीण भागातून चांगले समर्थन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तितके मतदान झाले नाही.