Ratan Tata Relations with politicians: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची भरभरून चर्चा होत आहे. उद्योग उभारतानाच रतन टाटा यांनी समाजसेवा, कला, क्रीडा या क्षेत्रांतील अनेकांना भरीव मदत केली. रोजगारनिर्मितीमध्ये टाटा समूहाचा मोठा वाटा आहे. १५ वर्षांपूर्वी रतन टाटा यांनी एक लाख रुपयांमध्ये चारचाकी वाहन देण्याची घोषणा करून वाहन क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. टाटा नॅनो या त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टनुसार फक्त एक लाखात भारतीय ग्राहकांना चारचाकी वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार होते. टाटा नॅनो या प्रकल्पासाठी जागा मिळविताना रतन टाटा यांना अनेक राजकारण्यांशी बोलावे लागले होते. याचा आढावा दी इंडियन एक्स्प्रेसने एका लेखात घेतला आहे.

टाटा नॅनो प्रकल्पाची घोषणा चमकदार होती; मात्र प्रत्यक्षात प्रकल्प उभारताना टाटा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आधी पश्चिम बंगालच्या सिंगूर येथे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी हा प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्यांना कम्युनिस्टांची प्रतिमा बदलून, राज्यात गुंतवणूक आणायची होती. मात्र, पुढच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी राज्यात सत्ता मिळवली आणि प्रकल्प बारगळला.

हे वाचा >> रतन टाटा यांना श्रद्धांजली देताना नको ते बोलून बसले; अब्जाधीशाला डिलिट करावी लागली पोस्ट

सिंगूरच्या जमीन अधिग्रहणावरून वाद निर्माण झाला. तृणमूलच्या वतीने आंदोलन उभे राहिले. टाटा यांना प्रकल्पाची सुरुवात लवकर करायची होती. त्यामुळे त्यांनी वाट न पाहता, इतर पर्यायांचा शोध सुरू केला. त्याच वेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतःची उद्योगप्रिय अशी प्रतिमा बनविण्यासाठी प्रयत्न करीत होते. रतन टाटा यांनी मोदींशी सुसंवाद साधून गुजरातच्या साणंद जिल्ह्यात प्रकल्प थाटला. वेळप्रसंगी राजकारण्यांशी चांगले संबंध ठेवून, नंतर त्यांच्यापासून अंतर राखण्याचे कौशल्य रतन टाटा यांनी दाखवले.

आज गुजरातचा साणंद जिल्हा हा ऑटोमोबाईल क्षेत्रातील हब झाला आहे. येथे १,१०० एकरहून अधिक जागेवर टाटा मोटार निर्मितीचा प्रकल्प आहे. टाटा मोटारींची ३० टक्के वाहननिर्मिती याच प्रकल्पातून होते. थोडक्यात बंगालच्या सिंगूरने जे गमावले होते, ते गुजरातच्या साणंदने कमावले, असे म्हणता येईल.

सर्वच पक्षांशी सुसंवाद

रतन टाटा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांशी चांगले संबंध कायम ठेवले. ऑक्टोबर २०२२ मध्ये रतन टाटा यांनी राहुल गांधी यांच्यासमवेत काश्मीरचा दौरा केला. तिथे तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेऊन काश्मीर विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्यातील मनुष्यबळ हीच काश्मीरची सर्वांत मोठी संपत्ती असल्याचे त्यावेळी टाटा म्हणाले होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये टाटा समूहाचे कार्य वाढविण्याची इच्छा रतन टाटा यांनी ओमर अब्दुल्लांसमोर व्यक्त केली होती. तसेच राहुल गांधींचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, काँग्रेस नेते गुंतवणुकदारांसाठी फक्त खिडक्याच नाही, तर दारही उघडे ठेवतात.

हे ही वाचा >> टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

एप्रिल २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी रतन टाटा यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचे त्यावेळी संघाकडून सांगण्यात आले होते. त्याआधी २०१६ मध्येही त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती.

फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने कडक पावले उचलली, असे विधान त्यावेळी रतन टाटा यांनी केले होते.

रतन टाटांच्या वडिलांनी लढवली होती निवडणूक

रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांनी १९७१ साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. शिवसेनेने यासाठी त्यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत ४० टक्के मतदान घेऊन नवल टाटा दुसऱ्या क्रमाकांवर राहिले होते. रतन टाटा यांनी मात्र कोणत्याही राजकीय पक्षाशी राजकीय जवळीक ठेवली नाही. याउलट गुंतवणूक करण्यासाठी ते सरकारशी वाटाघाटी करण्यात कुशल होते.

कोलकाता येथे २०१४ साली एका कार्यक्रमात बोलताना रतन टाटा म्हणाले की, माझे आदर्श जेआरडी टाटा यांच्याप्रमाणे मी राजकारणाशी संबंध ठेवत नाही. मी राजकीय व्यक्ती नसल्यामुळे कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही. ज्या व्यक्तीने कधीही कुणाला दुखावले नाही आणि ज्याने उद्योग क्षेत्रासाठी सर्वोत्तम योगदान दिले, अशी व्यक्ती होणे मला आवडेल.

रतन टाटा यांच्याशी निगडित वाद

व्यवसायात उच्च शिखर गाठलेल्या रतन टाटा यांना २०१० साली वादाचा सामना करावा लागला. नीरा राडिया टेप लीक प्रकरणात रतन टाटा यांच्यावर काही आरोप झाले. रतन टाटा यांच्या तथाकथित संभाषणाचा हवाला देऊन हे प्रकरण तेव्हा खूप गाजले. टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून, गोपनीयतेच्या अधिकाराखाली त्यांच्या टेप्स लीक करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली. २०२२ साली सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, राडिया टेप्स प्रकरणात कोणतेही गुन्हेगारी पुरावे आढळलेले नाहीत.