नगरः आगामी विधानसभेची निवडणूक राज्यात महायुती व महाविकास आघाडी करूनच लढवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने नगर जिल्ह्यातील १२ जागांवरील सर्वपक्षीय इच्छुकांनी सध्या ‘थांबा आणि वाट बघा’ अशीच भूमिका घेतलेली आहे. महायुती व महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी, सर्वच पक्षात इच्छुक उदंड असल्याने जागावाटप कसे होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. जागा आपल्याच पक्षाला हवी, या मागणीसाठी बैठका, ठरावांचे जोर काढले जात आहेत अन् मुंबईत पक्षश्रेष्ठींकडे शिष्टमंडळे जाऊन धडकत आहेत. प्रत्यक्ष जागावाटप ठरेल त्यावेळी इच्छुकांतील चित्र काही वेगळेच असेल, अशी शक्यता वर्तवली जाते.

जागावाटपात विद्यमान आमदार आपल्या मतदारसंघावर प्रबळ दावा ठोकून आहेत, अशावेळी महायुती आणि आघाडीच्या मित्रपक्षातील दावेदारांत अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. गेल्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले आता आघाडी आणि महायुतीत एकत्र आले आहेत. त्यांच्या पुढील पेच अधिक गहिरा आहे. तरीही गेल्या निवडणुकीत जे चेहरे एकमेकांविरुद्ध लढले, तेच पारंपारिक चेहरे बहुतांशी ठिकाणी परस्परांविरुध्द असतील, केवळ त्यांचे पक्ष व चिन्हात बदल झालेला असेल, असेच सध्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

हेही वाचा : कुणी म्हणे मोदींचे कान आणि डोळे, तर कुणी म्हणे ‘सुपर सीएम’; निवृत्त झालेल्या ‘या’ अधिकाऱ्याची एवढी चर्चा का?

गेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १२-० चा नारा दिला होता. परंतु भाजपमध्ये पाडापाडीचे राजकारण रंगले आणि केवळ तीन जागा मिळाल्या. एकत्रित राष्ट्रवादीने सर्वाधिक ६ जागा जिंकल्या होत्या. फुटीनंतर शरद पवार व अजित पवार गटाचे प्रत्येकी ३ बलाबल झाले. त्यातील शरद पवार गटाचे नीलेश लंके खासदार झाल्याने त्यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या केवळ दोन जागा आहेत तर शिवसेनेतील ठाकरे गटाचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

हेही वाचा : एकेकाळी दलितांसाठी आशा ठरलेल्या बसपाचा ‘या’ कारणांमुळे जाणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

गेल्या निवडणुकीतील विजयाच्या आधारावर विधानसभांच्या जागांवर हक्क सागायचा तर काँग्रेस आणि शिवसेनेची परिस्थिती अवघड ठरेल. त्यांना उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. महायुतीत आजी-माजी आमदार आणि प्रबळ इच्छूक डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड (अकोले), आशुतोष काळे-स्नेहलता कोल्हे (कोपरगाव), मोनिका राजळे-चंद्रशेखर घुले (शेवगाव-पाथर्डी), बबनराव पाचपुते-राजेंद्र नागवडे (श्रीगोंदा) एकत्र असल्याने शह-काटशह रंगणार आहेत. महायुतीला संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आघाडीला मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात उमेदवार शोधावा लागतो आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांना विद्यमान जागा वगळता सक्षम उमेदवारांचा शोध घ्यावा लागतो आहे.

हेही वाचा : ओबीसी मतपेढीवर लक्ष ठेवूनच पंकजा मुंडे यांना आमदारकी ?

जागा वाटप ठरेल तेंव्हा संभाव्य प्रतिस्पर्ध्यांचे चित्र आणखी बदलेले असेल. तरी पारंपारिक लढतींची शक्यता अधिक, केवळ त्यांचे पक्ष, चिन्ह बदलले असेल. म्हणूनच सध्या ‘थांबा आणि पहा’ची भूमिका प्रमुख इच्छुकांनी स्वीकारलेली दिसते.