अमरावती : अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍यातील वितुष्‍ट जुने असले, तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या तयारी दरम्‍यान त्‍यांच्‍यातील वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आला आहे. एका कार्यक्रमात रवी राणांनी बच्‍चू कडूंवर पुन्‍हा टीका केली, त्‍यावर बच्‍चू कडूंनी जोरदार प्रत्‍युत्‍तर दिले. सत्‍तारूढ महायुतीचे घटक असलेल्‍या या दोन नेत्‍यांमधील संघर्ष चांगलाच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार रवी राणा यांनी युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या अचलपूर मतदार संघातील एका कार्यक्रमात बच्‍चू कडू यांच्‍यावर टीका केली. बच्‍चू कडू यांनी गरिबांना कधीही रोजगार दिला नाही. केवळ नौटंकी केली. मंत्रिपदासाठी आम्‍ही कधी कुणासमोर लोटांगण घातले नाही. स्‍वत:चे घर भरले नाही. बच्‍चू कडू हे आंदोलन करतात, पण नंतर शांत बसतात. आम्‍ही शेतक-यांच्‍या प्रश्‍नासाठी पोलिसांच्‍या लाठ्या खाल्‍ल्‍या, तुरूंगात गेलो, असा दावा रवी राणांनी केला.

हेही वाचा : पक्षाला जनतेत पोहोचवण्यासाठी नितीश कुमारांची धडपड; एनडीएप्रवेशानंतरही बिहारसाठी ‘विशेष दर्जा’ची मागणी

त्‍यावर प्रत्‍युत्‍तर देताना आम्‍ही गुवाहाटीला गेलो नसतो, तर यांना सत्‍ता मिळाली असती का, असे सांगून बच्‍चू कडूंनी रवी राणांना टोला लगावला. काही दिवसांपुर्वी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्‍याचा प्रयत्‍न रवी राणांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी केल्‍यानंतर शिवरायांचा पुतळा बसविणे म्हणजे तो सन्मानानेच बसविला पाहिजे. हल्ली जय श्रीराम काही लोकांच्या मुखात आहे, तर श्रीराम आमच्या हृदयात आहे. हा दोघांमध्ये फरक असल्याचा टोला बच्चू कडू यांनी लगावला होता.

रवी राणा यांना युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यात मोर्चेबांधणी करायची आहे, तर बच्‍चू कडू यांना प्रहार जनशक्‍ती पक्षाच्‍या राज्‍यभरात विस्‍तार करण्‍याचे वेध लागले आहेत. बच्चू कडू यांचा एक महत्त्वाचा नेता त्यांची साथ सोडण्याच्या प्रयत्नांत असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी दोन महिन्‍यांपुर्वी केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा ठोकताच त्यांनी हा इशारा दिला आहे हे विशेष. बच्‍चू कडूंनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यापुढे आपल्या प्रहार संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

हेही वाचा : शेतकऱ्यांवर NSA अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयावर खट्टर सरकारकडून यू-टर्न; नेमके कारण काय?

बच्चू कडू लोकसभा निवडणुकीत आम्हाला पूर्ण ताकदीने सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे. आम्हीही त्यांना पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत साथ देऊ, अशी भूमिका रवी राणांनी मांडली खरी, पण दोन नेत्‍यांमधील संघर्ष आगामी काळात टोकदार होईल, याचे संकेत आता मिळू लागले आहेत. बच्‍चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदार संघावरील दावा न सोडल्‍यास राणा दाम्‍पत्‍याच्‍या अडचणी वाढण्‍यासोबतच भाजप आणि शिंदे गटावरही ताण येणार आहे. महायुतीत जागा वाटपाच्‍या वेळी मूल्‍य वाढवण्‍याचा प्रयत्‍न बच्‍चू कडूंचा आहे. विधानसभेच्‍या अधिक जागा मिळाव्‍यात यासाठी ते प्रयत्‍नशील आहेत.

हेही वाचा : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना किती पाठबळ मिळणार ? 

बच्‍चू कडू यांनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्‍यासाठी ५० खोके घेतले, असा आरोप रवी राणा यांनी वर्षभरापुर्वी केला होता, त्‍यामुळे संतापलेल्‍या बच्‍चू कडूंनी आव्‍हान दिले होते. उभय नेत्‍यांमध्‍ये चांगलाच वाद रंगला होता. अखेर मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मध्‍यस्‍थी करावी लागली होती. आता नवीन वाद कोणते वळण घेणार, याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati dipute between bachchu kadu and ravi rana started once again print politics news css