छत्रपती संभाजीनगर : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मागील आठवड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी भाजपचे उमेदवार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. भाजप गेवराई विधानसभा मतदार संघाच्या बदल्यात आष्टी-पाटोदा-शिरूरवर दावा करत असून, त्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून हालचाली सुरू आहेत.

गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार हे पक्षापासून दूर असून, भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव कुठेच नाही. उमेदवारी मिळवण्यासाठी पवार प्रयत्नातही नसून, ते हाती तुतारी घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. भाजप गेवराईवरील दावा सोडून आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघावर सांगेल, असे राजकीय आडाखे बांधले जात असून, भाजपकडून बीड-धाराशिव-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेवरील आमदार सुरेश धस यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार धस हे त्यांच्या चिरंजीवांसाठीही प्रयत्न करत असून, दोघांपैकी कोण लढेल, का दोघांपैकी एक तुतारी हाती घेईल, याविषयी मतदार संघात चर्चा सुरू असते. सुरेश धस हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. भाजप, राष्ट्रवादी व पुन्हा भाजप, असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे.

हेही वाचा : विदर्भातील भाजपचा माजी मंत्री राष्ट्रवादीकडून लढणार, विद्यमान आमदाराची अडचण

आमदार सुरेश धस यांनी मागील आठवड्यात मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर गेवराई व आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाचा निर्णय अधांतरी असताना मंगळवारी आमदार सुरेश धस यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीविषयी आमदार सुरेश धस यांच्या निकटवर्तीयांकडून दुजोरा मिळाला आहे. मात्र, लढणार कोण, भाजपला जागा सुटणार की राष्ट्रवादीलाच सुटेल, याविषयीचा अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार बाळासाहेब आजबेंसमोर पेच

भाजपकडून मतदार संघ खेचून घेण्यासाठी जोर लावला जात असल्यामुळे आष्टी-पाटोद्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार बाळासाहेब आजबेंसमोर पेच निर्माण झाला आहे. मतदार संघातील दोन ते तीन मराठा नेते तुतारी हाती घेऊन आजबेंसमोर आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत. मतदार संघ कुणाला सुटतो, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : गणेश नाईकांच्या खेळीने दोन्ही शिवसेनेची कोंडी

आष्टीत बंडखोरी अटळ ?

आष्टी-पाटोदा मतदार संघात यावेळी बंडखोरी अटळ मानली जात आहे. आमदार सुरेश धस हे त्यांच्या चिरंजीवासाठी प्रयत्नात आहेत. भाजप नेते भीमराव धोंडे हेही उमेदवारी मिळवण्यासाठी खटपट करत आहेत. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे मतदार संघ कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असून, जागा महायुतीतील कुठल्या पक्षाला सुटते, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणालाही जागा सुटली तरी बंडखोरी अटळ मानली जात आहे.