भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत येथील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला. या पराभवावरून महायुतीतील तीन मुख्य घटक पक्षांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच या तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये असलेले मतभेद आणि असमन्वय लपून राहिलेला नव्हताच. पराभवानंतर हे वाद चव्हाट्यावर आले आहे. युतीतील नेते उघडपणे एकमेकांवर आगपाखड करू लागले आहेत. सर्वप्रथम भाजप नेते डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांना डिचवले. मुख्यमंत्री शिंदे केवळ भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रालाच निधी देतात आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतात, असे सांगत मुख्यमंत्री दुजाभाव करीत असल्याचा घणाघात फुके यांनी केला. शिवाय, मुख्यमंत्री केवळ आमदार भोंडेकर यांच्याच मतदारसंघाचे नाही तर इतरही मतदारसंघांचे आहे, असे सांगत फुकेंनी इतर मतदारसंघांना निधी देताना मुख्यमंत्री शिंदे यांचा हात आखुड का पडतो, असा सवालही उपस्थित केला.

हेही वाचा: ‘आता पाठिंबा नाही’ म्हणणाऱ्या बिजू जनता दलाने गेल्या दशकभरात कशाप्रकारे निभावली आहे भाजपाशी दोस्ती?

यानंतर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर थेट पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्यावर फोडले. त्यामागे भोंडेकर यांची अपूर्ण राहिलेली पालकमंत्री होण्याची सुप्त इच्छा आणि खदखद होतीच, हा भाग वेगळा. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत भोंडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराला अपेक्षित सहकार्य केले नव्हते, हेही तेवढेच सत्य. मात्र, भोंडेकर यांनी पालकमंत्र्यांवरच नाही तर डॉ. फुके यांच्यावरही निशाणा साधला. फुकेंमुळे अनेक जण पक्ष सोडून जातात. मी देखील भाजपमध्ये जाणार होतो, मात्र गेलो असतो तर फुके यांच्यामुळे वाद झाले असते, ते टाळण्यासाठीच भाजपमध्ये गेलो नाही, असे भोंडेकर यांनी सांगितले. शिवाय लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला, याचे आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाही भोंडेकर यांनी फुके यांना दिला.

हेही वाचा: लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी झाली निवडणूक; याआधी अशी निवडणूक कधी झाली आहे?

फुके आणि भोंडेकर यांच्यात कलगीतुरा रंगलेला असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिल्ह्यातील कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी यांची अनुपस्थिती महायुतीत आलबेल नसल्याचेच सांगून गेली. या कार्यक्रमाचे वेळेवर आणि रितसर निमंत्रण मिळाले नाही, असे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे सांगितले. महायुतीत स्थानिक पातळीवर वादाची ठिणगी पडल्याचे या संपूर्ण घटनाक्रमांवरून अधोरेखित झाले. आगामी विधानसभा निवडणूक पाहता महायुतीचे वरिष्ठ नेते स्थानिक नेत्यांमधील वाद कसा मिटवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.